नैसर्गिक प्रक्रिया तसेच मानवी कृती यांमुळे सजीवांना अपायकारक ठरणाऱ्या आणि ठरू शकतील अशा घटना जैविक, रासायनिक, यांत्रिक, पर्यावरणीय अथवा प्राकृतिक कारकांपैकी कोणत्याही कारकामुळे मानव, इतर सजीव अथवा पर्यावरण यास अपायकारक व हानिकारक ठरणाऱ्या स्थितीस पर्यावरणीय आपत्ती म्हणतात. मानवी समाजाची किती प्रमाणात हानी होते, यानुसार पर्यावरणीय आपत्तीची तीव्रता ठरविली जाते. अशा स्थितीमुळे पर्यावरणाची गुणवत्ता ढासळते. पर्यावरण आपत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या कारकांनुसार त्यांचे पुढील दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते : (१) नैसर्गिक आणि (२) मानवकृत.

पर्यावरणीय आपत्ती

नैसर्गिक आपत्तीमध्ये भौमिक ‘अंतर्जात’ आपत्ती आणि वातावरणीय अथवा बहिर्जात आपत्ती यांचा समावेश होतो. भौमिक आपत्तीस पृथ्वीचे अंतर्जात बल कारणीभूत ठरते. भूपृष्ठाखाली खोलवर ही घटना घडते. यात ज्वालामुखी उद्रेक, भूकंप आणि भूमिपात इत्यादींचा समावेश होतो. भूकवचाखालील औष्णिक स्थितीमुळे या घटना घडतात. त्यामुळे भूकवचाचा समतोल बिघडतो. या आपत्तीमुळे मानवी जीव व इतर सजीवांना मोठ्या प्रमाणात धोका पोहोचतो. मानवी वस्ती, धरणे, मालमत्ता इत्यादींची हानी होते. पर्यावरणाची गुणवत्ता घटते. या प्रकारच्या आपत्तींना प्रतिबंध घालता येत नाही. तसेच त्यांचे पूर्वव्यवस्थापन करता येत नाही. मात्र, काही वेळा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे त्याबाबत पुर्वानुमान करता येते.

वातावरणीय आपत्ती सामान्यपणे हवा व हवामानाशी संबंधित असतात. वातावरणीय प्रक्रियांमुळे वातावरणात प्रचंड बदल होऊन वातावरणीय आपत्ती येते. परिणाम घडवून आणणारी कारके दृश्य स्वरूपात नसली तरी हवामानतज्ज्ञांमार्फत त्यांची उपकरणाद्वारे नोंद घेता येते. वातावरणीय आपत्तीचे दोन वर्ग केले जातात : (१) अपसामान्य घटना : यात चक्रीवादळे, विजा पडणे, गारांची वादळे, अग्नी इत्यादींचा समावेश होतो. अपसामान्य बहिर्जात आपत्तीमुळे वादळे होऊन सुपीक जमिनीत क्षार साठून ती ओसाड आणि पडीक होते, मानवाला आणि इतर सजीवांना धोका पोहोचतो. (२) संचयी वातावरणीय आपत्ती : यात पूर, अवर्षण, शीतवृष्टी, उष्णलहरी इत्यादींचा समावेश होतो. संचयी वातावरणीय आपत्तीमुळे (उदा., पूर, अवर्षण यांमुळे) मानवी जीवन, मालमत्ता तसेच नैसर्गिक पर्यावरण यांची हानी होते. अशा नैसर्गिक वातावरणीय आपत्तींचे वैज्ञानिक पुर्वानुमान करू शकतात. त्यामुळे सुरक्षेचे उपाय योजून अशा आपत्तींचे परिणाम टाळता येऊ शकतात. धरणे, जलाशय व निर्वनीकरण यांमुळेही काही वातावरणीय आपत्ती संभवतात. या मानवकृत आपत्ती आहेत. त्यासाठी पर्यावरण प्रभाव मूल्यांकनानुसार मानवी कृतींचे मूल्यमापन करणे गरजेचे असते.

मानवी कृतींमुळे पर्यावरणाची अवनती होते व मानवी समाजाची भरून काढता न येणारी हानी होते. मानवकृत पर्यावरण आपत्तींचे पुढीलप्रमाणे तीन वर्ग करता येतात ; (१) प्राकृतिक आपत्ती : यात मानवी कृतींमुळे घडून येणारे भूमिकंपन, भूमिपात, मृदाक्षरण इत्यादींचा समावेश होतो. (२) रासायनिक आपत्ती , यात विषारी रसायने आणि वायू, अणुस्फोट, सागर तेलगळती, वायुगळती इत्यादींमुळे उद्भवणाऱ्या आपत्तींचा समावेश होतो. (३) सामाजिक आपत्ती : यात लोकसंख्या विस्फोट, नैतिकता व धार्मिक मूल्यांची अवनती, रसायने व युद्धात जैविक अस्त्रांचा वापर, बहुमजली इमारतींची रचना इत्यादींमुळे उद्भवणाऱ्या आपत्तींचा समावेश होतो.

निरनिराळ्या पर्यावरणीय आपत्तींमुळे जी संकटे ओढवतात त्यांपासून संरक्षण व्हावे, पर्यावरण अवनती कमी व्हावी व मानवासह इतर सजीवांच्या जीवास धोका होणार नाही यासाठी मानवाने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. मानव स्वत: एक सामाजिक व नैसर्गिक पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहे. या आपत्तींना सामोरे जाण्यासाठी तो सर्व तऱ्हेने सक्षम व्हावा, यासाठी विविध योजना शासकीय व अशासकीय स्तरावरील विविध संघटना, संस्थांमार्फत केल्या जातात. मागील काही वर्षांत पर्यावरणीय आपत्ती व्यवस्थापनाला विशेष महत्त्व आले आहे आणि पर्यावरणीय आपत्ती कशा टाळता येतील याकडे कल वाढत आहे. प्रदेश, राज्य, राष्ट्र यांच्या सीमांतर्गत व सीमाबाह्य क्षेत्रातदेखील आपत्तीग्रस्त स्थिती निवारण्याचे प्रयत्न वाढत आहेत.

पर्यावरणी आपत्ती व्यवस्थापनात समस्या निराकरण प्रक्रियेला महत्त्वाचे स्थान आहे. आपत्तीचा धोका ओळखणे, जोखमीचे मूल्यांकन व नियंत्रण करणे, त्यांचे मूल्यमापन करणे व त्याचा आढावा घेणे हा पर्यावरणी आपत्ती व्यवस्थापनाचा एक भाग आहे.