आजच्या जीवनामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. ह्या बदलांमुळे विद्यार्थी गोंधळून गेलेला आहे. पालकांच्या आणि शिक्षकांच्या मोठ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थी दडपला गेला आहे. त्यामुळे स्वत:ला समजून घेण्याची क्षमता विकसित होण्यास त्यास अडसर निर्माण होत आहे. व्यक्तिचा सर्वांगिण विकास करणे हे शिक्षणाचे अंतीम उद्दिष्ट मानले जाते. त्या सर्वांगिण विकासामध्ये मानसिक क्षमतांचा जास्तीत जास्त उपयोग करून शिक्षण अधिकाधिक जीवनकेंद्रित करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधता येतो. व्यक्तिविकास हा चारित्र्यनिर्मितीशी निगडीत असतो. चारित्र्याची उत्तमप्रकारे जडणघडण होण्यासाठी मानवाला महत्त्वपूर्ण जीवन कौशल्यांची आवश्यकता आहे. म्हणूनच जीवन कौशल्यांचा विकास शिक्षणातून होणे गरजेचे आहे. यास मानसशास्त्रीय कौशल्य (Psychological Skill) म्हणूनही ओळखले जाते.

जागतिक आरोग्य संघटनेने १९९९ मध्ये पुढील दहा जीवन कौशल्यांचा पुरस्कार केला :

  • ‘स्व’ची जाणीव : व्यक्तीची स्वत:च्या शारीरिक व मानसिक अवस्थांची जाण असण्याची क्षमता म्हणजे ‘स्व’ची जाणीव. या क्षमतेमुळे व्यक्तीला स्वत:च्या आवडी-निवडी, भावना व वृत्ती यांच्याबद्दल स्पष्टपणे विचार करता येतो. तसेच व्यक्तीला आपल्या जीवनाचा व अस्तित्त्वाचा खरा अर्थ समजून येतो.
  • समानानुभूती : दुसऱ्याच्या भूमिकेत शिरण्याची क्षमता अथवा दुसऱ्या व्यक्तीला तिच्या दृष्टिकोनातून जाणून घेण्याची प्रामाणिक जिज्ञासा म्हणजे समानानुभूती. म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण आहोत असे समजून तिचा दृष्टिकोन जाणून धेण्याची कुवत होय.
  • समस्या निराकरण : अनेक पर्यायांचा विचार करून त्यांतील योग्य तो पर्याय निवडणे व आपली समस्या सोडविणे म्हणजे समस्या निराकरण होय. जीवनात आपल्याला पदोपदी समस्यांना तोंड द्यावे लागते. आपल्या समस्या आपण कितपत परिणामकारकपणे आणि कार्यक्षमतेने सोडवू शकतो, यावर आपल्या जीवनातील यश अवलंबून असते.
  • निर्णयक्षमता : निर्णयक्षमता ही अशी प्रक्रिया आहे की, ज्यामध्ये व्यक्ती किंवा व्यक्तीगट एखाद्या प्रसंगाच्या किंवा समस्येच्या संदर्भात माहिती गोळा करतो. मिळालेल्या माहितीचे पृथक्करण करून योग्य पर्यायाची निवड निश्चित करतो. व्यवहार्य दृष्टिकोनातून पाहता येाग्य वेळी योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहे. ते जीवनाच्या दर्जावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करते. जीवन कौशल्य शिक्षणासाठी हे मुलभूत कौशल्य आहे.
  • परिणामकारक संप्रेषण : स्वत:च्या विचारांची शाब्दिक अथवा अशाब्दिक पद्धतीने प्रभावीपणे अभिव्यक्ती करता येणे म्हणजेच परिणामकारक संप्रेषण कौशल्य होय. आपण आपले विचार किती प्रभावीपणे व्यक्त करतो आणि ते दुसऱ्यांपर्यंत पोचवतो ही बाब आपल्या जीवनातील यश निश्चित करते. अपेक्षित असलेल्या पद्घतीने त्याचा संदेश ज्या वेळी स्वीकारला जातो, त्या वेळी परिणामकारक संप्रेषण घडते. परिणामकारक संप्रेषण ही द्विमार्गी प्रक्रिया आहे. यामध्ये प्रेषक आपला संदेश प्रेषित करतो आणि प्राप्तकर्त्यास अशी खात्री करण्याची संधी असते की, पाठवणाऱ्याचा जो उद्देश होता त्याचप्रमाणे त्याला तो संदशे समजला आहे.
  • व्यक्ती व्यक्तींमधील सहसंबंध : व्यक्ती व्यक्तींमधील आदर, प्रामाणिकपणा, विश्वास यांवर परस्परसंबंध अवलंबून असतात. समजूतदारपणा, सहकार्य या आधारांवर परस्परांशी नाती जुळविली जातात. जेव्हा आपल्याला परस्पर संबंधाचे महत्त्व व फायदे जाणवतात, तेव्हा खरे परस्परसंबंध निर्माण होतात.
  • सर्जनशील विचार : काही तरी नवीन, उपयुक्त व असाधारण निर्माण करण्याचा विचार म्हणजे सर्जनशील विचार होय. जेव्हा एखादी व्यक्ती आजपर्यंत अस्तित्वात नसलेली एखादी गोष्ट शोधून काढते, तेव्हा त्यामध्ये सर्जनशीलता दिसून येते. ज्या वेळी एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करण्याची नवीन रीत शोधून काढते किंवा अस्तित्वात असलेल्या प्रक्रियेचा नवीन गोष्टीच्या निर्मितीसाठी पूर्णपणे वापर करते, तेव्हा सर्जनशीलता अस्तित्वात येते.
  • चिकित्सक विचार : एखाद्या विषयाची विशिष्ट माहिती स्वीकारण्यापूर्वी अनेक लहानलहान प्रश्नांच्या साह्याने त्या विषयाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची विचार प्रक्रिया म्हणजे चिकित्सक विचार होय. चिकित्सक विचार हे तर्कशुद्ध विचार करण्याच्या क्षमतेची निर्मिती होय.
  • भावनांचे समायोजन : भावना हा शब्द कोणताही क्षोभ, मानसिक स्थैर्याचा भंग, सहनशीलता अथवा मनाची प्रक्षुब्धावस्था यांच्याशी संबंधित आहे. भावना समारात्मक असो की, नकारात्मक जर त्यांना विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊ दिले, तर त्या अपायकारक ठरतात.
  • ताणतणावाचे समायोजन : एखादे कार्य करीत असतांना अनेक समस्या उद्भवतात व दडपण येते. जेव्हा अशी परिस्थिती नि‌र्माण होते, तेव्हा सामान्यपणे लोक तणावग्रस्त होतात. एखादी व्यक्ती दीर्घकाळ तणावाखाली राहिली, तर त्याचे पर्यावसान शारीरिक तसेच मानसिक स्वरूपाच्या अनेक समस्यांमध्ये होते. म्हणून ताणतणावाची यशस्वीपणे हाताळणी करण्याकरिता शिक्षणाची आवश्यकता आहे.

सर्व स्तरांतील अभ्यासक्रमांतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या वरील दहा जीवन कौशल्यांचा विकास होणे अपेक्षित आहे. अभ्यासक्रमाची रचना करतांना त्यांचा प्रामुख्याने विचार केला जात आहे.

वैशिष्टे :

  • व्यक्तींमध्ये असलेल्या आंतरिक शक्ती आणि गुणवैशिष्ट्यांची जाणीव होण्यास मदत करणे आणि आवश्यकतेनुसार त्यांच्यात बदल घडवून आणण्यास प्रेरित करणे.
  • दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी व समस्या यांवर विचारपूर्वक निर्णय घेऊन त्यांमधून योग्य यशस्वी मार्ग काढण्यास समर्थ करणे.
  • परिसरातील माहिती, ज्ञान, इतरांचे चांगले विचार इत्यादी आत्मसात करून त्यानुसार स्वत:चे मत बनविण्यास, ते योग्यप्रकारे मांडण्यास आणि इतरांशी प्रभावी संवाद साधण्यास सक्षम करणे.
  • परिस्थितीची जाणीव करून घेऊन योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे.
  • इतरांबद्दल कोणत्याही प्रकारे द्वेष, मत्सर, दूषित विचार मनात न बाळगता त्यांच्याबद्दल आदर, प्रेम, सहानुभूती बाळगून समाजहिताची वृत्ती निर्माण होण्यास तसेच एकमेकांप्रती वैयक्तिक व सामाजिक संबंध निकोप ठेवण्यास प्रवृत्त करणे.
  • परिसरातील घटना, कृती, प्रसंग इत्यादींबाबत सहज व विचारपूर्वक निर्णय घेण्याची, तसेच ताणतणावविरहित जीवन जगता येण्याची क्षमता निर्माण करणे. त्याचप्रमाणे सखोल माहितीच्या आधारे घटनांचा विचार करून त्यावर तर्क, निष्कर्ष काढण्याची क्षमता निर्माण करणे.
  • आपल्या स्वत:च्या सुखदु:खाच्या प्रसंगात सहभागी होण्यास प्रवृत्त करणे.
  • एखादी कृती, विचार हे पारंपारिकपणे मांडण्यापेक्षा त्यामध्ये नावीन्य, सोपेपणा, उत्साह निर्माण करून ते वेगळेपणाने मांडण्यास साह्य करणे इत्यादी.

विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य व्यक्तीला जीवन आणि शिक्षण यांची सांगड घालतांना जीवन कौशल्यांचा उपयोग होत असून त्यामध्ये आणखी मोठ्याप्रमाणात विकास होणे अपेक्षित आहे. यशस्वी जीवन जगण्यासाठी विचारपूर्वक शिक्षणाची, प्रशिक्षणाची व कौशल्य विकसनाची अत्यंत गरज आहे. तसेच जीवन कौशल्यांमुळे जीवन जास्तीतजास्त कार्यक्षमपणे व यशस्वीपणे जगता येते. विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण हे जीवनकेंद्रीत केले पाहिजे. विद्यार्थ्यांचा बोधात्मक, भावात्मक व कार्यात्मक एकंदरीत सर्वांगिण विकास होण्यासाठी जीवन कौशल्यांचा विकास शाळांमध्ये, वर्गांमध्ये योग्य त्या वातावरण निर्माण करण्याची गरज असते.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ मध्ये भारतीय शिक्षण पद्धतीत संभाव्य बदलावर काळानुरूप भर देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक वर्ष २००९ पासून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात दहा जीवन कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे. आजच्या आधुनिक युगात व्यक्तीला प्रभावीपणे जीवन जगण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाद्वारे जीवन कौशल्यांच्या अध्यापनाची आवश्यक आहे.

समीक्षक – रघुनाथ चौत्रे

This Post Has 3 Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा