जव्हारणं (विधिनाट्य) : महाराष्ट्रातील पारधी समाजातील महत्त्वपूर्ण विधी. पारधी जमातीत जव्हारणं हे वैशिष्ट्यपूर्ण विधिनाट्य त्यांच्या सामाजिक व धार्मिक जीवनाचे अविभाज्य अंग आहे. जंगली जत्रा,जोगणं,देवदेव किंवा जव्हारणं अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या विधीला पारध्यांच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात फारच महत्त्व असते. त्यांचे हे विधिनाट्य असते. घरात सुखशांती लाभावी, चोरीत यश मिळावे, वर्षांत पीकपाणी आले तर चांगली सुगी व्हावी, पहिला वंश जन्माला यावा, शेतकरी आणि पोलीस यांच्यापासून संरक्षण व्हावे, चोरी करताना बचाव व्हावा, कोर्टातून निर्दोष मुक्तता व्हावी,कारागृहातून मुक्तता व्हावी, जातपंचायतीमध्ये पंचांनी आपल्या बाजूने निर्णय द्यावेत, चोरीत चांगले घबाड मिळावे अशा विविध उद्देशपूर्ती झाल्या तर तीन, पाच, सात किंवा अकरा बकऱ्यांचा बळी देऊन नवसपूर्तीसाठी जव्हारणं विधी पारधी श्रद्धायुक्त भावनेने पार पाडतात. तसेच मेलेल्या माणसाची सतत आठवण आली, देव स्वप्नात आला आणि त्याने बोकडं मागितली, साक्षात्कार झाला तर पारधी कसल्याही परिस्थितीत प्रसंगी कर्ज काढून अगर एखादे ठिकाणी चोरी करून मिळविलेल्या पैशातून हा विधी केल्याशिवाय राहत नाहीत. या विधिनाट्याप्रसंगी वापरण्यात येणारी भांडी, वस्त्रे आणि अन्य विधीसाहित्य देवाचे समजण्यात येते. इतरवेळी त्यांचा वापर करण्यात येत माही. विशेष बाब म्हणजे या विधीमध्ये स्त्रियांना कटाक्षाने दूर ठेवण्यात येते. त्यांनी दूर कोणत्या दिशेला थांबावे याचेही संकेत असतात. देवाच्या नावाने अर्पण केलेल्या बकऱ्याला महिलेने गवत टाकायचे नाही. त्याची सोडबंध करायची नाही. पूर्वीच्या काळी स्त्रीला मान होता, पण तिनं नवऱ्याची, जातीची फसवणूक केल्याने तिला जातीनं शिक्षा केली. तेव्हापासून स्त्रीला मान नाही असे सांगितले जाते. विधीच्या वेळी पूर्व बाजूस दूर बसून स्त्रिया आपल्या भाषेमध्ये भक्तिपर व रंजनपर गीतं गातात. बाटलेल्या अगर दोषी समजलेल्या पुरुषाला स्त्रियांइतकेच दूर ठेवले जाते. या विधीप्रसंगी बकऱ्याचा नैवेद्य सोयरे घेत नाहीत. नैवेद्य स्वीकारला तर ते बाटले गेल्याचे समजतात. ज्याच्या घरी विधी आहे त्याने दंड दिल्यानंतर हा दंड पाचही कुळीतील व्यक्तींना देण्यात येतो. मग पाचही कोलीतील लोक जेवण घेतात. मात्र दंड स्वीकारलेल्या व्यक्तीला आपल्या घरी होणाऱ्या देवकार्याच्या वेळी सोयऱ्यांना पुन्हा असाच दंड द्यावा लागतो.
वर्षामध्ये एकदा,दोनवेळा, प्रसंगी तिसऱ्यांदाही हा विधी करण्यात येतो. देवाची जत्रा केला नाही तर कुटुंबाला सुख लागत नाही.चिंतिलेल्या कामात यश मिळत नाही. हा आपला जातीविधी केला नाही तर आपण धर्मबुडवे अशी त्यांची पक्वी समजूत असल्यामुळे सुशिक्षित समजलेल्या पारध्यांनाही हा विधी टाळता येत नाही. विधी टाळला तर समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागते. प्रसंगी जातिबहिष्कृतही करण्यात येते. जव्हारणं हा पारध्यांतील एक यातुशक्तियुक्त पवित्र विधी असतो. या विधीत कायद्याने चोर, गुन्हेगार ठरविलेले पारधी भगतही सहभागी होत असल्यामुळे पारधी समाज जंगलात जव्हारणं विधी पार पाडतात. पोलिसांच्या भीतीमुळे तसेच चोरीबाबतीतही देवाचा कौल घ्यावयाचा असल्यामुळे अन्य जमातीतील व्यक्तींना या विधीत सहभागी करून न घेण्याचा संकेत कटाक्षाने पाळण्यात येतो.
पारधी आपल्या जीवनात काही अनुभव गोष्टी मानतात. अशुभ घटकांबाबतच्या त्यांच्या पक्क्या समजुती आहे. स्त्रीने नवऱ्यास किंवा अन्य पुरुषाला चप्पल, लुगडे,गोवरी फेकून मारली तर तो पुरुष बाटला असे समजण्यात येते. कुत्रे फडफडणे, कुत्र्याने दारात ढुंगण घासत सरकत जाणे, सासूने विहिरीत मानवी मूत्र, कुत्रे टाकणे, कुत्रा, गाढव, बैल यांचे मांस अंगावर घरासमोर टाकणे, चोरी करायला निघताना शिंक येणे, मांजर आडवी जाणे अशा घटना पारध्यांत अशुभ व बाडगेपणाच्या समजण्यात येतात. यातून मुक्त होण्यासाठी जव्हारणं हा विधी करून देवाकडून घुडी घेऊन पवित्र होण्याशिवाय पारधी समाजात अन्य मार्ग नसल्याची त्यांची पक्की धारणा असल्यामुळे त्यांना हा विधी करावा लागतो. हा विधी केला नाही तर बाटगेपणामुळे कुटुंबाला वाळीत टाकण्याची भीती असते. अशा विविध कारणांनी पारधी हा विधी करतात.
प्रदेशपरत्वे आणि जाती, पोटजातीपरत्वे या जोहारणं या विधिनाट्याच्या स्वरूपात व सादरीकरणात मौखिक संहितेमध्ये बदल होत असतो. पारधी भगत चार वाजता किंवा सायंकाळच्या सुमारास राहत्या घराच्या अगर पालाच्या पश्चिम दिशेला देवाचे राल ठोकून जोहारणं विधिनाट्याला प्रारंभ करतो. हे पाल पूर्व पश्चिम दोन बांबू (मेढी) उभे करून त्यावर आढे किंवा दोराच्या साहाय्याने कापडाचे पाल तयार करण्यात येते. पारधी पक्क्या घरात वास्तव्यास असला तरी या विधीसाठी स्वतंत्र देवाचे पाल ठोकावे लागते. पालाच्या पश्चिमेकडील खांबाजवळ (बेळू) मातीचा गोल आकाराचा ओटा करतात. त्यावर पाणी टाकून नवे वस्त्र अंथरण्यात येते. पश्चिमेकडील खांबावर विधीवत् झेंडा उभारण्यात येतो. याला ‘झंडो लगाडावलो’ असे म्हणतात. त्याशिवाय पुढील विधी होत नाही. नंतर गोलाकार जागी अंथरलेल्या वस्त्रावर नागवेलीची पाने ठेवतात. भगत गाठोड्यातील अगर बंद पेटीतील देव काढून पानावर त्यांची मंत्रोच्चारांसह प्रतिष्ठापना करतो. टाकाच्या रूपातील देवदेवतांची उजव्या बाजूने मानाप्रमाणे प्रतिष्ठापना करण्यात येते. यामध्ये पहिला मान दादोजी (सूर्यदेव) नंतर कुलदेवता आणि नंतर अन्य देवदेवता अशी प्रतिष्ठापना करण्यात येते. यात शेवटी आपल्या घरातील मयत झालेल्या थोरल्या पुरुषाच्या टाकाचा मान असतोच. कुळ्यांप्रमाणे देवदेवतांची प्रतिष्ठापना करण्यात येते. आपल्या कुलदेवतेनंतर वास्तव्य असलेल्या भूप्रदेशातील तसेच नवसाला देवकार्य असलेल्या घरातील पुरुष व सोयरे नारळ वाढवतात. त्याची संख्या पाचपासून दहापर्यंत असते. पूर्वी देवाला नरबळी देण्यात येत होता, असे पारधी भगत सांगतात. विधीसाठी लागणारी पानं त्याच दिवशी आणावी लागतात.
पारधी जमातीत जव्हारणं विधिनाट्यात पाच कुळ्यांमध्ये वाघजाई अंबाबाई तुकाई यमाई भवानीमाता देवदेवतांची अशा क्रमाने मांडणी करतात. देवदेवतांच्या प्रतिष्ठापना केल्यानंतर पालाचे पुढील बाजूच्या उत्तर दिशेला तीन दगडांची चूल पेटवून विस्तवाचा निखारा खापराच्या डाखळीत घेतात. त्या निखाऱ्यावर कापूर, गुगुळ टाकून देव्हाऱ्यावरील देवतांना उजव्या बाजूने धुपारती करतात. याला पारधी ‘भोग देणे’ म्हणतात. त्यानंतर पुरुषमंडली देवदेवतांची नावं घेऊन गव्हाचे पीठ मळतात.प्रत्येक देवाला प्रत्येकी पाच या प्रमाणात नैवेद्य करून देवतांना अर्पण करतात.याला ते ‘चवाळी’ म्हणतात. देवदेवतांना नैवेद्य दिल्यानंतर देवासाठी आणलेली जी नवसाची तीन, पाच, सात बकरं असतील, ती देवाच्या पालासमोर उभी करतात. देवकार्य असलेल्या घरातील भगत आपल्या मनातील इच्छा देवासमोर बोलून दाखवतो व बोकडांच्या डोक्यावर,अंगावर पाणी शिंपडतो. ज्या देवाला बोकड वाहिलेले असते, त्याच देवाचे नाव घ्यावयाचे असते. बोकडाने दोन्ही कान फडकावून आपली मुंढी उजव्या बाजूने फिरवून सबंध अंग झाडले तर ‘बोकडा लिदो, गुढी देय्यो’ म्हणत उजवी घुडी मिळाल्याचा आनंद भगत टाळ्या वाजवून व्यक्त करतात आणि त्याचवेळी देवाने आपले मागणे मान्य केले असे समजण्यात येते.
भगत पारधी भाषेत देवापुढे जे मागणं मागतो त्यामध्ये मुलगा, मुलगी होऊ दे, इडापीडा टळू दे, न्यायालयातील खटल्याचा निकाल माझ्या बाजूने लागू दे तसेच चोरी करण्यात, ड्राफ करण्यात यश मिळू दे, अशी जाहीरपणे मागणी करतात. (ड्राफ करणे म्हणजे एखाद्याला आमच्याकडे बांधकामात सोन्याची नाणी मिळाली आहेत, असे सांगून त्याचा विश्वास संपादन करून त्याला लाखो रुपयास फसवणे.) या विधीत कोणी बाह्य जातीचा माणूस नसतो, त्यामुळे श्रद्धायुक्त भावनेने भगत आपल्या मनातील इच्छा मुक्तपणे बोलून दाखवतो. याबरोबरच आजारातून वाचला, चोरी करताना पकडता पकडता वाचला किंवा बाटलेपणातून स्त्री-पुरुष मुक्त होण्यासाठीही अशी गुढी लावून बोकडाचे माध्यमातून या विधीत कौल घेतला जातो. याचवेळी ‘वधावा व झापीलेवान’ विधी करण्यात येतात. वधावा यालाच गुजविधी व झापीलेवान म्हणजे तेलातून पुऱ्या काढण्याचा विधी संपन्न होतो. नंतर सर्व पारधी बोकडाभोवती फेर धरतात.मध्यरात्रीपर्यंत नृत्य करतात. भगत देवदेवतांना देवकार्यात सहभागी होण्याचे आवाहन करतो. यावेळी म्हणण्यात येणारे गीत गायन नसते, तर यातुशक्तीने भारलेला मंत्रोच्चार असल्याची त्यांची समजूत असते.
दुसरे दिवशी देवपालाच्या पुढील बाजूस (पूर्वेकडे) गोल मातीचं रिंगण करतात.त्यावर पाणी मारतात. रात्री देवासमोर नैवेद्य म्हणून ठेवलेल्या ‘चवाळ्या’ उचलून मातीच्या रिंगणामध्ये मुडपून ठेवतात. पालाचे पश्चिम बाजूकडील सर्व देवदेवतांचे चांदीचे टाक भगत उचलून उजव्या बाजूने पूर्वीच्याच क्रमाने त्यांची प्रतिष्ठापना करतो. देवासमोर बकऱ्यांची दावण असते.बोकडांच्या शिंगांना कणकेचे गोळे बसवून किंवा ढाकण बसवून त्यात कापूर जाळतात. त्याला ‘धूपरेखन’ म्हणतात. बोकडाच्या अंगावर पाणी शिंपडण्यात येते. हा विधी सर्व नवसाच्या बोकडांकडून कौल दिला नाही तर त्या बोकडाचा बळी देत नाहीत. ज्या देवाने नावाने बोकड वाहिला तो देव भगतावर रुष्ट झाला असे समजण्यात येते. पुन्हा गुन्हा-चूक मान्य करून कौल घेण्यात येतो. नंतर मोठा बोकड देवासमोर उभा करतात. त्याला पारधी ‘बोकडा चाचरक लावानो’ असं म्हणतात. नंतर बोकडाच्या कानाचे मानेच्या दिशेने माप घेतात. कान संपतो तिथे रक्तशीर असते, तिथे सुरीने गोल कानळी कापतात. बोटाने दोन शिरा कापून त्यातील रक्त ओंजळीत घेऊन प्रतिष्ठापना केलेल्या सर्व देवांना रक्ताभिषेक घालतात. सर्व देव रक्तात माखल्यानंतर दुसरी शीर कापतात. प्रथमतः घरातील देवसंचारित भगत रक्त पितो. नंतर बाकीचे भक्त रक्त पिऊन नृत्य करायला लागतात. देवाचा जयजयकार करतात. याच क्रमाने सर्व बकऱ्यांचा बळी दिला जातो. बकरे एकदम गतप्राण होत नसल्यामुळे शेवटी भगत नाकतोंड दाबून त्याचा अंत घडवितात. यावेळी देवदेवता संचारीत नृत्यगान करणाऱ्या भगताचा वैशिष्ट्यपूर्ण पोशाख असतो. ‘चरना’ नावाचा पारंपरिक पोशाख भगताने परिधान केलेला असतो. या विधीमध्ये मुलं, पुरुष सहभागी होतात. नंतर देवकार्य असलेल्या घरातील माणसं आणि सोयरे सर्व बकरी कापतात, सोलतात. मुंढी,वझिड्या,आतडी,कातडी पहिल्या दिवशी खात नाहीत. भगतांचे दात सळसळ करतात पण खाण्याचा अधिकार नाही. पहिला मान देवाचा. नंतर दुसरे दिवशी भगतांचा असतो. नंतर बळी दिलेल्या बोकडाचे काळीज व मांस विस्तवावर भाजतात. त्यावर दूध,तूप घालून हा नैवेद्य देवदेवतांना अर्पण करण्यात येतो. तसेच बकऱ्याच्या मुंढी, धुंडी (कमरेजवळची हाडे, मांस), करोई (बरगडीजवळचा मांसल भाग) देवापुढे ठेवतात. मात्र विधीनंतर सोयरे मंडळी जेवत नाहीत. त्यावेळी देवकार्य करणारा भगत (घरातला देवकार्य करणारा माणूस) दंड भरतो. पंच ठराव करतात. ही रक्कम पाच कुळ्यांत वाटून घेतल्या जाते. तिसरे दिवशी देवासमोर ठेवलेली मुंडी, धुंडी व करोईचे वाटे करून सर्व सोयरे, भाऊबंद यांना देण्यात येतात. आदल्या दिवशी ज्यांनी जेवण केले त्यांनाच हा देवाचा प्रसाद मिळतो. तीन दिवस सुरू असले्ल्या या विधीमध्ये स्त्रियांना मात्र कसलेच स्थान नसते. विधीच्या ठराविक म्हणजे पूर्व-उत्तर या दिशेला विशिष्ट अंतरावर स्त्रिया बसलेल्या असतात.
जव्हारणं या विधीनाट्यामध्ये गुंजविधीला (वधावा) एवढे महत्त्व असते की, हा गुंजविधी केल्याशिवाय जव्हारणं हा विधी पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. देवपालासमोर देवदेवतांची विधिवत् प्रतिष्ठापना केल्यानंतर जव्हारण्यासाठी देवदेवतांची मान्यता घेण्यासाठी हा विधी करण्यात येतो.जव्हारणं विधिनाट्यातील झापीलेवान (उकळत्या तेलातून पुऱ्या काढणे) एक महत्त्वपूर्ण विधी होय. पारधी समाजातील स्त्री-पुरुषावर समाजातील पुरुषाने अगर स्त्रीने दोष लावला असेल त्याच्या सिद्धतेसाठी उकळत्या तेलातून पैसा किंवा पुऱ्या काढण्याचा विधी करण्यात येतो. जव्हारणं विधीचे आयोजन करणाऱ्या भक्तालाही आपले निरपराधित्व आणि पावित्र्य सिद्धतेसाठी दिव्य करावे लागते. त्याशिवाय जव्हारणं विधीची सिद्धता होत नाही
जव्हारणं विधीप्रसंगी नवसाच्या किंवा देवदेवतांना वाहिलेल्या बकऱ्यांना आणि देवदेवतांना कोरं (विटाळापासून पवित्र करणे) करण्याचा विधी संपन्न होत असताना देवकार्य आरंभिलेल्या भगताच्या अंगामध्ये दैवीसंचार सुरू होतो. त्यावेळी भगतांनी आपल्या अंगात चरणा धोती चढवलेली असते. पायात घुंगरं बांधलेली असतात. ढोल, ताशा किंवा हलगी अशी वाद्य सुरू होताच अंगात वारं संचारलेला भक्त मंत्रोच्चार करत नृत्य करू लागतो. नृत्य करता करताच भगत सूर्यदेव, कुलदेवता, ग्रामदेवता, शिवारदेवता आणि पूर्वजांना जव्हारणं विधीत सहभागी होण्याचे आवाहन करतो.
देवसंचारित भगत नृत्य करता करताच पहिल्या बोकडाजवळ येऊन बोकडाचा कान मानेजवळ नेऊन तेथील जागी सुऱ्याने गोलाकार काप घेतो. बोकडाच्या मानेतील एक रक्तशीर कापून रक्त ओंजळीमध्ये घेऊन पानावर किंवा चवाळ्यावर ठेवलेल्या देवदेवतांना रक्ताभिषेक घालतो.त्यावेळी वाद्यवृंद मोठ्या उत्स्फूर्तपणे व श्रद्धायुक्त भावनेने उद्यपीत होऊन वाद्य वाजवितात. जोहारणं विधीतील हा सर्वांत भावस्पर्शी असा क्षण असतो. त्यानंतर भगत बोकडाची दुसरी रक्तशीर कापून बोकडाचे रक्त पिण्यास सुरुवात करतो आणि त्याचवेळी त्याचे नृत्यगानही सुरू असते. नंतर इतर भगत नृत्य करून रक्त पिण्याचा विधी वार पार पाडतात. यावेळी भगत ज्या देवतेला बोकड वाहिला, त्या देवीचे व ती देवी ज्या कुळीची देवता असते, त्या कुळीचे नाव घेत असतो. सर्व बकऱ्यांचा याच पद्धतीने बळी दिला जातो. रक्ताभिषेकाचा पहिला मान दादाजी या नावाने संबोधण्यात येणाऱ्या सूर्यदेवतेचा व त्यापाठोपाठ कुलदेवता आणि नंतर अन्यदेवता व पूर्वजांचा असतो. देवदेवतांच्या रक्ताभिषेकानंतर भगत व घरातील पुरुष, मुलं रक्त पिऊन ढोलाच्या साथीने नृत्य करतात.
पारध्यांचे सबंध जीवनच या विधिनाट्यातून आविष्कृत होते. पारधी समाजातील व्यक्ती मिळेल त्या मार्गाने वर्षांकाठी जी कमाई करते, त्यातील बरीच कमाई जातीतील अलगड व कोर्टकचेरीच्या कामात खर्च होते. उर्वरित किंवा त्याहीपेक्षा अधिक रक्कम जोहारणं या विधिप्रसंगी खर्च होते. हा कुलाचार नैमित्तिक स्वरूपाचा विधी असल्यामुळे प्रसंगानुरूप हा विधी करण्यात येतो. या विधीतील देवदेवतांचा ओटा, ढोलाच्या साथीने भगत म्हणत असलेली गाणी, भगताने देवकार्यात सहभागी होण्यासाठी देवदेवतांना केलेले आवाहन, विनोदी चुटके, सांगण्यात येणाऱ्या स्फुट लोककथा उपस्थित पारधी मनोभावे ऐकत असतो. यावेळी भगत पारूशी भाषेत जिला वाघरी किंवा पारध्यांची भाषा म्हणतात. या भाषेत मंत्रोच्चार करत असतो. या विधीच्यावेळी भगतांकडून उच्चारल्या जाणाऱ्या लोकवाङ्मयात दैवी शक्ती असते किंवा मंत्रसामर्थ्य असते. तसेच या विधीसाठी वापरण्यात येणारी प्रत्येक वस्तू भारलेली असते. तिच्यात यातुशक्ती येते अशी पारध्यांची समजूत आहे. हा विधी करण्यामागील कारणे आणि धारणा विचारात घेतल्या तर या विधिनाट्याचे पारध्यांच्या जीवनात असणारे स्थान आणि त्यातून प्रकटणारे पारध्यांचे एकूणच समाजजीवन समजण्यास मोठी मदत होते. या विधिनाट्याच्यावेळी अनेक उपविधी करण्यात येतात. या विधीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदय होण्यापूर्वी बकऱ्यांचा बळी दिला जातो. हा विधी अंगावर शहारे आणणारा असतो. झालेली उपलब्धी, तसेच होणारी उपलब्धी किंवा घडलेल्या गुन्ह्याच्या स्वरूपावर बळी देण्यात येणाऱ्या बकऱ्यांची संख्या ठरविण्यात येते. पूर्वी देवाच्या नावानं नरबळी देण्याची प्रथा होती, पण आता बकऱ्यांचा बळी दिला जात असल्याचे अनेक भगत सांगतात.
संदर्भ :
- प्रभुणे गिरीश, पारधी, राजहंस प्रकाशन, पुणे, २००६.
- माने लक्ष्मण, विमुक्तायन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, १९९७.
- मोरजे डॉ. गंगाधर, लोकसाहित्य एक स्वतंत्र अभ्यासक्षेत्र, दास्ताने रामचंद्र आणि कंपनी, पुणे, १९८५.
- वाडकर, डॉ. धोंडिराम, विधिनाट्य, स्फूर्ती प्रकाशन मंच, अहमदनगर, १९९६.