भान, महाराज किसन : ( ९ नोव्हेंबर १९४७ – २६ जानेवारी २०२० )महाराज किसन भान यांचा जन्म काश्मीरमध्ये झाला. त्यांचे औपचारिक शिक्षण श्रीनगरमधील स्थानिक मिशन शाळेत झाले. आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे येथे पदवी शिक्षण घेतल्यानंतर दिल्ली विद्यापीठात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे जाण्यापूर्वी त्यांनी आहारविज्ञान, बालरोग, बाल जठरांत्र रोग (paediatric gastroenterology), व बालरोग सांसर्गिक आजाराबद्दल विशेष शिक्षण घेतले होते. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, चंदिगड येथून पूर्ण झाले. त्यांचा संशोधनाचा विषय बालकांच्या अतिसार (Childhood Diarrhoea) असा होता. अतिसार झाल्यावर देण्यात येणार्या जलसंजीवनीवरील झिंक न्यूनता असलेल्या रूग्णांच्या उपचारावर त्यांनी विशेष संशोधन केले होते. परंतु त्यांनी केलेल्या रोटाव्हायरसवरील कामामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली.
भान यांनी अतिसारासाठी (डायरिया) रोटोव्हॅक ह्या लसीची सर्वप्रथम भारतात स्थानिक स्तरावर निर्मिति केली. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिलेल्या इतर दोन लसी (प्रतिडोस) ज्या बाजारात २५०० रुपयांत होत्या, त्या त्यांनी केवळ १८० रुपयांत उपलब्ध केल्या (तिन्ही डोस). सर्वत्र जगात आणि भारतात बहुतेकवेळा पाच वर्षांखालील मुलांमध्ये तीव्र अतिसार होण्याचे मुख्य कारण रोटाव्हायरस असते आणि लसीकरण हा त्यासाठी सर्वात चांगला प्रतिबंधात्मक उपाय आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात पाच वर्षांखालील सुमारे २,१५,००० तर भारतात ४७,००० मुले दरवर्षी अद्यापही अतिसारामुळे मृत्यू पावतात. रोटोव्हॅक लस भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन, एनआयएच, नॉर्वेच्या रिसर्च काउन्सिल आणि भारत-बायोटेक या विविध संस्थांच्या सहकार्याने बनवली गेली होती. रोटोव्हॅकची रचना ही जगात क्वचितच पाहिलेली अशी संस्थागत सहकार्याची साक्ष होती जेथे सरकारी, स्वयंसेवी संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था व खाजगी संस्था यांनी एकत्र येऊन ही जीवनरक्षक लस विकसित केली. भारतात ही लस सर्वप्रथम २०१६ मध्ये वापरण्यात आली, जागतिक आरोग्य संघटनेने २०१८ मध्ये तिला मान्यता दिली आणि २०१९ मध्ये भारत सरकारने सर्व भारतीय मुलांना रोटा व्हायरस लसीकरण देण्याची योजना जाहीर केली. ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नालजी इंस्टिट्यूटच्या संचालक गगनदीप कांग यांच्या म्हणण्यानुसार हा प्रकल्प अत्यंत महत्वाकांक्षी तर होताच, पण तितकाच किचकट देखील होता, कारण क्लिनिकल चाचण्यांच्या प्रक्रियेत बाळांचा समावेश होणार होता. भान यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हा प्रकल्प व्यवस्थित पूर्ण होऊ शकला व रोटोव्हॅक लस तयार करण्यात त्यांना यश लाभले.
ते १९७४-७६ पर्यंत नवी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलाचे रजिस्ट्रार होते, १९७६-७८ दरम्यान वरिष्ठ सल्लागार म्हणून अफगाणिस्तानातील काबूल येथील बालआरोग्य संस्था येथे व नंतर चंदिगड, येथील पोस्ट-ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये लेक्चरर होते. १९७८-७९ साली, ते दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत रुजू झाले. ते विविध अकादमींचे फेलो होते. उदा., भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी, अकादमी ऑफ सायन्सेस, अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस व थर्ड वर्ल्ड अकादमी ऑफ सायन्स.
बायोटेक क्षेत्रात भान यांचे योगदान केवळ लस बनवण्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी २००५-२०१२ च्या दरम्यान डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे (डीबीटी) सचिव म्हणून अनेक नवीन उपक्रम सुरू केले. भारताच्या बायोटेक प्रोग्रामचे रूपांतर करण्यात आणि संबंधित बायोटेक उत्पादनांच्या विकासासाठी उद्योग-शैक्षणिक सहकार्य सक्षम करण्यासाठी त्यांनी असंख्य संस्था स्थापन केल्या, त्यातून त्यांच्यातील उत्तम प्रशासकाचे दर्शनही घडले. त्यांनी बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स काउन्सिल (BIRAC) सुरू केले. ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंस्टिट्यूट (THSTI) ही संस्था जी लस आणि संसर्गजन्यरोग, बालरोगशास्त्र, बायोडिझाइन आणि औषध विकासासाठीचे केंद्र आहे, त्याची स्थापना त्यांच्या पुढाकारानेच झाली. आयएव्हीआय–इंडिया, सह डीबीटी आणि टीएचएसटीआई यांनी एचआयव्हीची लस तयार केली आणि या सहकार्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्यासाठी केवळ या संस्था उभारणे पुरेसे नव्हते. तर जनतेच्या आरोग्याशी निगडीत गंभीर मुद्दे हाताळण्यासाठी ह्या संस्थांचे इतर प्रमुख शैक्षणिक संस्था, जसे एम्स, आयआयटी-दिल्ली, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ इत्यादींच्या सहकार्याची प्रक्रिया अधिक बळकट करुन त्यांचा संबंध जोडणे हा उद्देश होता. इतर योगदानांपैकी, यूएस-आधारित बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि यूके-आधारित वेलकम ट्रस्ट सहभागीदारी स्थापित करून आंतरराष्ट्रीय निधी आणण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. वेलकम ट्रस्ट व डीबीटी इंडिया अलायन्स – ही संस्था भारतातील आरोग्य आणि बायोमेडिकल विज्ञानातील संशोधनास निधी देते यासाठी भान यांनी प्रयत्न केले.
भान यांनी अतिसाराच्या उपचारात झिंकचा उपयोग केला, ओआरएसचे नवीन प्रकार विकसित केले व ईकोलाय जिवाणूची अधिक आक्रमक प्रजाती शोधून काढली. त्यांच्या अध्यक्षतेखाली विकसित झालेला नवजात आणि बालरोगव्यवस्थापन (IMNCI) हा कार्यक्रम भारत सरकारच्या पुनरुत्पादक व बालआरोग्य कार्यक्रमात सादर केला गेला. हे धोरण भारतात बालमृत्यूची संख्या कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
त्यांना मिळालेल्या विविध पुरस्कारामध्ये शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्काराचा समावेश आहे.
कर्करोगाने त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- https://www.who.int/blueprint/about/Maharaj-Krishan-Bhan/en/
- https://www.who.int/immunization/monitoring_surveillance/burden/estimates/rotavirus/en/
- https://www.biospectrumasia.com/influencers/49/4585/padma-bhushan-dr-mk-bhan-to-get-genome-valley-excellence-award-today.html
- https://www.iavi.org/newsroom/press-releases/2020/iavi-mourns-the-passing-of-dr-maharaj-bhan
- https://www.thebetterindia.com/211467/meet-dr-mk-bhan-whose-made-in-india-vaccine-saves-thousands-of-kids-annually/
समीक्षक : मोहन मद्वाण्णा