जगदाळे, ‍निवृत्ती गोविंद (Jagdale, Nivrutti Govind) : (४ फेब्रुवारी १९०३ – ३० मे १९८१)‍. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शिक्षण प्रसारक व समाजसुधारक. बार्शी तालुक्यातील चारे हे मामांचे गाव; मात्र त्यांचा जन्म भिकार सारोळे, जि. उस्मानाबाद येथे आजोळी झाला. वडील गोविंदराव व आई मुक्ताबाई शेतकरी होते. त्यांच्या कुटुंबात वारकरी परंपरा होती. मामांचे तिसरीपर्यंतचे शिक्षण चारे येथील प्राथमिक शाळेत झाले. एकत्र कुटुंब आणि पसाऱ्याची शेती यांमुळे त्यांच्या पुढील शिक्षणाला घरातून विरोध झाला; मात्र त्या विरोधाला डावलून मामांनी इ. स. १९१९ मध्ये बार्शी येथील नगरपालिका मुलांची शाळा क्र. १ मध्ये चौथीला प्रवेश घेतला. नंतर इ. स. १९३० मध्ये नार्थकोट हायस्कूल, सोलापूर येथे इंग्रजी माध्यमाचे सातवीचे (मॅट्रिक) शिक्षण घेतले. दरम्यान ‍शिक्षणापासून परावृत्त करण्यासाठी वडिलांनी त्यांचा विवाह मानेगावच्या देशमुखांची कन्या लक्ष्मीबाई (माहेरचे नाव पार्वती) यांच्याशी लावून दिला.‍ वडिलांनी मनाविरुद्ध लग्न लावून दिले आणि पत्नी समजून घेत नाही, या अवस्थेत मामांनी तिला चारे येथेचे सोडून काही काळ एकटेच आळंदी येथे वास्तव्यास गेले व तेथे मृदुंगवादनाचे धडे गिरविले.

आळंदीहून परतल्यानंतर मामांनी सोलापूर को-ऑपरेटिव्ह सुपरवायझिंग युनियनमध्ये सुपरवायझर, तसेच बार्शी नगरपालिका येथे वसुली अधिकारी (कलेक्शन इन्स्पेक्टर) म्हणून नोकरी केली; मात्र नोकरीत असताना परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यासाठी झालेला त्रास, इच्छा असूनही पुढील उच्च शिक्षण घेता न आल्याची खंत व शिकत असतानाच महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची झालेली ओळख या अस्वस्थेतून त्यांनी इ. स. १९३४ साली काही गरीब विद्यार्थी आणि बहिणीच्या मुलांना घेऊन ‘श्री. शिवाजी मराठा बोर्डिंग’ची स्थापना केली. कृष्णात राऊत हे बोर्डिंगचे अध्यक्ष, तर नरसिंगतात्या देशमुख हे सचिव होते. बोर्डिंगमधील बहिणीची व इतर मुले त्यांना मामा म्हणत. त्यामुळे ते सर्वांचे मामा झाले. नोकरी सांभाळून बोर्डिंगची सर्व व्यवस्था ते स्वत: पाहात. पुढे नोकरीतील त्रासाला कंटाळून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि ‘एकमेका साह्य करू। अवघे धरू सुपंथ॥’ हे संत तुकारामांच्या विचारांचे ब्रीदवाक्य घेऊन, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून शैक्षणिक कार्यात पूर्ण वेळ स्वत:ला झोकून दिले. त्यांनी ‘श्री. शिवाजी मराठा बोर्डिंग’चे रूपांतर इ. स. १९४७ मध्ये ‘श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळा’त केले.

ग्रामीण भागात वसतिगृहयुक्त विद्यालये ही मामांच्या शिक्षणप्रणालीचा आस्थेचा भाग होता. तत्कालीन दळणवळणाच्या अभावग्रस्त काळात विद्यालयाच्या आसपासच्या गावातील शेतकरी, कष्टकरी, दलित मुलांना शिक्षणाची सोय व्हावी, हाच त्यांचा ध्यास होता. गुणवत्तापूर्ण अभ्यास, श्रमसंस्कार व शिस्त यांमुळे त्यांच्या गुरुकुलासम वसतिगृहांतील विद्यार्थीसंख्या वाढू लागली. त्यात ग्रामीण भागातील मुलींसाठीही मामांनी संत गाडगेबाबा यांच्या हस्ते भारतीय बालिकाश्रमाची सुरुवात केली. ‘वसतिगृहासोबतच स्वत:चे विद्यालय असावे’, अशी सूचना बार्शीत झालेल्या भेटीत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मामांना केली. त्या सूचनेचे पालन करत मामांनी १९५२ मध्ये येडशी येथे ‍बोर्डिंग व विद्यालय; १९५४ मध्ये बार्शी येथे अध्यापक विद्यालय व महाराष्ट्र विद्यालय; १९६० मध्ये श्री. शिवाजी महाविद्यालय यांची स्थापना केली. मामांनी बार्शी आणि परिसरातून धान्य व मिळेल ती मदत गोळा करत बोर्डिंगचा विस्तार केला.

मामा स्वत: शाळेच्या इमारतींच्या कामाची देखरेख करत. अशाच देखरेखी वेळी २१ मे १९५० रोजी इमारत बांधकामावरून पडून त्यांच्या मणक्याला मार लागला. चार महिन्यांच्या उपचारानंतर त्यांना कुबड्यांच्या साह्याने चालता येऊ लागले. यानंतर बोर्डिंगच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘पूज्य जगदाळे मामा सत्कार समिती’ स्थापन केली. याच समारंभात लोकांनी त्यांना ‘कर्मवीर’ ही पदवी उत्स्फूर्तपणे बहाल केली. मामांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच शेतकी व तंत्र शिक्षणावरही भर दिला. शिवाय त्यांनी शेती, आडत दुकान, कापड दुकान, छापखाना, रेशन दुकान, कुक्कुटपालन, धेनुसंवर्धन असे अनेक लोकोपयोगी व्यवसायदेखील संस्थेमार्फत चालविले. ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वाचा अवलंब आजही मामांच्या संस्थेत केला जात आहे.

मामांना संत गाडगेबाबा, क्रांतिसिंह नाना पाटील आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले. शैक्षणिक कार्याबरोबरच अस्पृश्यता निवारण, अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबंदी, सदृढ पिढी घडविण्यासाठी कुस्ती स्पर्धांचे आयोजन, शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन असे विविध सामाजिक कार्यदेखील मामांनी निस्वार्थ भावनेने केले. त्यांनी हरिजन सेवक मंडळ, कर्मवीर युवक मंडळ, कृषी विज्ञान, कामधेनू मंडळ अशा संस्थाही स्थापन केल्या.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सोलापूरच्या चार हुतात्म्यांपैकी जगन्नाथ शिंदे यांच्या पत्नी राहीबाई शिंदे यांची हालाकीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मामांनी त्यांना घर व मानधन मिळवून दिले. तत्पूर्वी राहीबाईंना त्यांनी आपल्या संस्थेकडून मानधन दिले. वीर पत्नी व वीर माता-पिता यांचा सन्मान करण्याचे व्रत कायम ठेवले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतील, तसेच मराठवाडा मुक्तिसंग्रामातील भूमिगत क्रांतिकारकांना आपल्या संस्थेत हक्काचा आश्रय दिला. व्यापक समाजकारणाचा भाग म्हणून १९७२ मध्ये बार्शीच्या राजकारणातील एकाच कुटुंबाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी त्यांनी संस्थेतील शैलजा शितोळे यांना आमदार म्हणून निवडून आणले.

शाळेच्या इमारतीवरून पडून झालेला अपघात, तसेच अर्धांगवायूचा झटका यांमुळे मिरज येथे घ्यावे लागलेले उपचार व आलेला खर्च यांचा विचार करून मामांनी गोरगरीब ग्रामीण जनतेला वाजवी दरात आरोग्य सेवा मिळावी, या उदात्त हेतूने त्यांनी बार्शी येथे आपल्या शैक्षणिक संस्थेमार्फत ४ फेब्रुवारी १९७५ रोजी आरोग्य मंदिराची स्थापना केली. आज हे आरोग्य मंदिर ‘जगदाळे मामा हॉस्पिटल’ या नावाने ओळखले जाते. अत्याधुनिक सुविधांचे ३५० बेडचे व ट्रॉमा युनिटचे हे सर्वोपचार रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या निर्मितीत व विकासाच्या वाटचालीत मामांचे विद्यार्थी डॉ. बी. वाय. यादव यांचा मोलाचा सहभाग असून त्यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयाच्या विकासाची वाटचाल सुरू आहे.

कर्मवीर मामांच्या श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळांचा व्याप सोलापूर आणि धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद) यांसारख्या दुष्काळी प्रदेशांत असून त्यांनी या प्रदेशांत शिक्षण प्रसारासाठी मोलाचे कार्य केले आहे. सध्या संस्थेचा प्राथमिक शाळा (५), माध्यमिक विद्यालये (१४), उच्च माध्यमिक विद्यालये (१४), महाविद्यालये (५), कृषितंत्रनिकेतन (२), कृषी महाविद्यालय (१), नर्सिंग कॉलेज (१), मुलांची वसतिगृहे (१०) आणि मुलींची वसतिगृहे (५) असा विस्तार झाला असून या संस्थेतून हजारो गरीब विद्यार्थी प्राथमिक पासून ते उच्च शिक्षणापर्यंतचा लाभ घेत आहेत. संस्थेत शेती, ‍किमान कौशल्य, तंत्रशिक्षण आणि व्यवसाय शिक्षणाची सोय आहे. मर्यादित प्रादेशिक अवकाशात परिपूर्ण शैक्षणिक विकास घडविता येतो, हे मामांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याने दाखवून दिले. शिक्षणाने मन, मनगट व मेंदू विकसित व्हावा, हा मामांचा ध्यास होता. त्यानुसार संस्थेच्या विकासाची वाटचाल सुरू आहे.

मामांना मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (सध्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) यांनी ‘डी. लिट’ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या पदव्या देऊन सन्मानित केले आहे.

मामांचे अर्धांगवायूने बार्शी येथे निधन झाले.

संदर्भ :

  • अिंगळे, व.‍ न., ज्ञानतपस्वी : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचं जीवन चरित्र, औरंगाबाद, २००६.
  • अिंगळे, व. न.; मोरे, चंद्रकांत व इतर, संपा., परीस – स्पर्श : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे जन्मशताब्दी, बार्शी, २००४.

समीक्षक : चंद्रकांत मोरे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.