शरीरधारणा हे जीवात्म्याचे बंधन आहे. पापाचे आणि दुःखाचे त्याला बंधन आहे. या बंधनातून सुटण्याची ज्या जीवात्म्यांना आर्त इच्छा होते, त्यांनी प्रयत्‍न केल्यास व तो प्रयत्‍न सर्व शक्ती एकवटून केल्यास, ते मानवी जीवात्मे मुक्त होऊ शकतात, असा जगातील उच्च धर्मांचा एक सिद्धांत आहे. यहुदी (ज्यू), ख्रिस्ती, हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम या धर्मांमध्ये हा सिद्धांत गृहीत धरला आहे.

जे धर्म सर्वज्ञ व सर्वसत्ताधीश परमेश्वर मानतात, त्या धर्मांच्या सिद्धांतांप्रमाणे ईश्वरास सर्वभावे शरण जाणे आणि धर्मात सांगितलेले प्रमुख विधिनिषेध निष्काम बुद्धीने पाळणे, हा मोक्षमार्ग होय. मोक्ष म्हणजे देहाच्या बंधनातून जीवाची कायम सुटका, आत्म्याची शुद्ध स्थिती वा ईश्वराचे अनंतकालापर्यंत प्राप्त होणारे सांनिध्य व त्याचा साक्षात्कार होय. जीवात्मा व ईश्वर हे भिन्न आहेत, असे यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम व हिंदू या धर्मांतील द्वैती मानतात. त्यांच्या मते हे सांनिध्य प्राप्त झाले, तरी ईश्वराशी एकरूपता प्राप्त होत नाही. जीवात्मा हा ईश्वराचा अंश आहे, असे जे हिंदू मानतात, त्यांच्या मताने जीवात्मा ईश्वराशी एकरूप होतो; ही एकरूपता म्हणजे एक प्रकारचे सांनिध्यच होय. परमेश्वर मानणारे सर्व धर्म ईश्वरास तारक समजतात; ईश्वर भक्तास पापातून तारतो, असे हे धर्म मानतात.

ईश्वराच्या कृपेशिवाय किंवा अनुग्रहाशिवाय जीवात्म्याचा संसारबंध किंवा पापबंध नष्ट होत नाही व जीवात्मे मुक्त होत नाहीत, असे सर्व ईश्वरवादी मानतात. ईश्वभक्ती केल्याशिवाय व ईश्वराच्या आज्ञा पाळल्याशिवाय किंवा धर्माचरण केल्याशिवाय ईश्वराची कृपा होत नसते, असे सर्वच ईश्वरवादी धर्म मानतात. ख्रिस्ती धर्मात ईश्वरकृपेला हिंदुधर्मातील भक्तिपंथाप्रमाणे अत्यंत महत्त्व दिले आहे. त्यात मुख्यत: दोन मते आहेत. एका मताप्रमाणे ईश्वरकृपेने सर्वच जीवात्मे मुक्त होऊ शकतात; मात्र कृपा प्राप्त करून देणारा सन्मार्ग प्रत्येक मानवी जीवात्म्याने अनुसरला पाहिजे. जॉन कॅल्व्हिन यांच्या मते ईश्वर काही निवडक मानवात्म्यांनाच मोक्षपात्र म्हणून केवळ स्वेच्छेने निवडतो. ईशकृपा असल्याच्या खुणा अशा मानवात्म्यांमध्ये या प्रपंचातच प्रगट झालेल्या असतात. जॉन कॅल्व्हिन यांसारख्या कित्येक धर्माचार्यांच्या मते केवळ ईश्वरी कृपेमुळेच काही जीवात्मे मुक्त होतात.

बौद्ध व जैन हे धर्म, परमेश्वर म्हणजे सृष्टिकर्ता आहे, असे मानत नाहीत; परंतु मनुष्यशरीर धारण करणारा जीवात्मा स्वतःच्या प्रयत्‍नाने कर्मबंध तोडू शकतो व पापातून आणि दुःखातून मुक्त होतो, असे मानतात. या प्रयत्‍नात अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह या व्रतांचे निरपवाद पालन करावे लागते. ध्यान, धारणा व समाधी यांच्या योगाने शुद्धज्ञान प्राप्त झाल्याने अखेर बंधातून मोक्ष प्राप्त होतो.

संदर्भ :

  • Braden, C. S. Man’s Quest for Salvation, New York, 1941.
  • Parker, J. W. The Idea of Salvation in the World’s Religions, London. 1935.