शाहनामा ए फिरदौसी : एक अरबी छंदबद्ध काव्य. या काव्यातील मध्यवर्ती ५० पात्रे ही पर्शियाच्या पौराणिक कथा व इतिहासातील शूर योद्धे आहेत. पिशदाद, कयानी, अश्कानी आणि सासानी ह्या चार वंशातील राजांची कथा भव्यदिव्य पद्धतीने यात काव्यबद्ध केली आहे. म्हणूनच याचा अनुवाद राजांचे पुस्तक असा केला जातो. इ.स. पूर्व ६ व्या शतकात सायरस नावाच्या महान राजाने अकिमेनिड (पर्शियन) साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. आधुनिक इराण आणि पश्चिम व मध्य आशियाचा मोठा प्रदेश पर्शियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता (इ.स. पूर्व ५५० – ३३०). त्यानंतर सासानिअन राजवंशाने इ.स. २२४ – ६५१ दरम्यान एक समृद्ध आणि दैदिप्यमान असा आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास रचला. ७ व्या शतकात इस्लाम धर्म स्थापनेनंतरच्या काळात अरब आक्रमणकर्त्यांनी केवळ हा प्रदेशच जिंकला नाही तर पर्शियावर इस्लाम धर्मही लादला. परंतु तेथील जनमानस मुळच्या झरतुष्ट्री (पारशी) धर्म आणि संस्कृतीची जपणूक मनोमन करत होते. मनाविरुद्ध लादला गेलेला धर्म आणि आपल्या मुळच्या संस्कृतीविषयीचे अपार प्रेम यामुळे एक खदखद वाढत होती. ह्या असंतोषाला इ. स. १०१० मध्ये अबुल क़ासिम फिरदौसी या कवीने त्याच्या शाहनामा ए फिरदौसी या महाकाव्यातून वाचा फोडली.
प्राचीन काळी ह्या कथा मौखिक परंपरेनुसार पिढी दर पिढी सांगितल्या जात. लेखनाची व मुद्रणाची तंत्रे अवगत झाल्यानंतर या कथा लिखित स्वरुपात अजरामर झाल्या. इतिहासकारांच्या मते सुरुवातीस उल्लेखिलेले दोन राजवंश पौराणिक दंतकथावर आधारित आहेत. अश्कानी राजांचे त्रोटक उल्लेख इतिहासात सापडतात ; मात्र, सासानी राजांचे शाहनाम्यातील वर्णन तथ्यांवर आधारित आहे. ६ व्या – ७ व्या शतकात सासानिअन राजांनी इराणच्या इतिहासाचे संकलन करवून घेतले, ज्याचे नाव खोदाइ नमक असे होते. तसेच अबू मन्सूर बिन मुहम्मद अब्दुर्रझ्झाक याने इ.स. ९५८ मध्ये शाहनामा नावाचाच ग्रंथ लिहिला होता. फिरदौसीने ही गद्ये काव्यात गुंफली. फिरदौसी त्या त्या ठिकाणी त्या त्या कथेच्या स्रोताचा संदर्भ प्रामाणिकपणे देतो. राजांची कथा उलगडण्यासाठी हेतुपुरस्सर पद्यलेखनाचा मार्ग अवलंबिला गेला. कारण पद्य एका लयीत म्हटले जाते आणि जनस्मृतीत स्थिरावते. परिणामतः निर्मितीच्या अनेक शतकांनंतर आजही काही विशेष समारंभांच्या प्रसंगी शाहनामा पठणाची पद्धत आहे.
९ वे शतक ते १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या काळाला अभिजात पर्शिअन साहित्याचा कालखंड म्हणतात. या काळात मुक्त विचारांना आणि कलेला राजाश्रय मिळाला.वाङ्मयीनदृष्ट्या विचार करायचा झाल्यास शाहनाम्यातील छंद हे अरबी भाषेतून घेतले आहेत. दोन दोन ओळींच्या रचनेला अरबीमध्ये ‘बैत’ म्हणतात. यातील दीर्घ आणि ह्रस्व स्वर एका ठराविक बांधणीत बसवलेले असतात व यमक जुळणे आवश्यक असते.अरबांच्या आक्रमणानंतर पर्शियन भाषा लेखनासाठी अरबी लिपी वापरली जाऊ लागली. शाहनामा जरी अरबी लिपीत लिहिला गेला असला तरीही अरबी भाषेतील उसन्या शब्दांचा वापर मात्र फिरदौसीने कटाक्षाने टाळला आहे. किंबहुना, अरब आक्रमणानंतर पर्शियन भाषेतील बरेच शब्द विस्मृतीत गेले होते, ते परत चलनात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य फिरदौसीने केले. तसेच राजांच्या कथेच्या अनुषंगाने राजाची कर्तव्ये आणि त्याने अंगीकारण्याचे गुण याबद्दलही त्याने उपदेशात्मक टिप्पणी केली आहे. एक प्रकारे हा इराणी संस्कृतीच्या पुनरुज्जीवांचा सोहळा आहे. म्हणूनच या महाकाव्याला राष्ट्रीय आख्यायिकेचा (National Legend) दर्जा दिला गेला आहे. त्यामुळे शाहनामा आजही वाचकाला भुरळ पाडतो. आजही तो इराणच्या जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा विषय आहे. १००० वर्षांनंतर आजही शाहनाम्याची भाषा सहज आकलनीय आहे.
१० व्या शतकाच्या शेवटी, पर्शियन संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याची क्रांती समाविद राज्यकर्त्यांच्या काळात जोर धरु लागली. शासक जरी अरब असले तरीही इराणचे अरब केंद्रापासुनचे अंतर जास्त असल्याने, इस्लाममध्ये धर्मांतर झाले तरीही तेथील दरबारी भाषा पर्शियनच राहिली. पर्शियन भाषेसाठी हे एक वरदानच ठरले. १३ व्या – १४ व्या शतकातील मंगोल राज्यकर्त्यांनी त्यांच्या तख्त ए सुलेमान येथील उन्हाळी प्रासादाच्या भिंतींवर शाहनाम्याच्या ओळी उद्धृत केल्या आहेत. त्यांनीच प्रथमतः शाहनाम्याच्या चित्रांकित प्रती छापण्यात पुढाकार घेतला. आपला उदारमतवादी चेहरा पुढे करून जनमानसात असलेली आपली परकीय राज्यकर्त्यांची प्रतिमा पुसण्याचा तो एक उत्तम मार्ग होता. १८- १९ व्या शतकात गादीवर आलेल्या क़जार वंशाने शाहनाम्याच्या प्रती छापून इराणी संस्कृतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
१३ व्या शतकात धातू आणि चीनी मातीच्या भांड्यांवर शाहनाम्यातील चित्रे व ओळी उद्धृत केलेल्या आढळतात. शाहनाम्याची जादू इतकी संमोहित करणारी होती की नंतरचे राज्यकर्ते स्वतःला त्यातील पात्रांची उपमा देत. राजवंशांची आणि त्यांच्या कारकिर्दीची तपशीलवार नोंद कशी ठेवावी याचा आदर्श म्हणून शाहनाम्याकडे बघितले जाऊ लागले. राजांच्या बखरीसाठी ‘शाहनामा’ हा प्रतिशब्द म्हणून वापरला जाऊ लागला. १६ व्या शतकात सफविद राजवंशाचा संस्थापक आणि शिया पंथाचा पुरस्कर्ता शाह इस्माईल (पहिला) याने जगातील सर्वात सुंदर चित्रांकित शाहनाम्याची प्रत बनवून घेऊन आपल्या पुत्राला भेट म्हणून दिली. ही प्रत बनवण्यास २० वर्षे लागली. त्याच्या काळात शाहनाम्याचे शहरातील सार्वजनिक जागांवर पठण करण्याची जुनी पद्धत पुन्हा प्रचारात आली. शाहनाम्याच्या शेवटी फिरदौसी म्हणतो – माझ्या मृत्यूनंतरही मी पसरवलेल्या शब्दबीजांच्या रुपात मी जिवंत राहीन. प्रत्येक ज्ञानी आणि समजूतदार व्यक्ती माझ्या मरणोपरांत माझे स्तुतीगान गाईल.
संदर्भ :
- Classical Persian Literature by Bahman Solati published on www.iranchamber.com
- The Shahnama of Firdawsi by Dr Francesca Leoni :The Ismaili.org
समीक्षण : राजेंद्र जोशी