अर्जन हसीद : ( ७ जानेवारी १९३० – २६ डिसेंबर २०१९ ). भारतीय साहित्यातील सिंधी भाषेचे प्रख्यात ग़ज़लकार. त्यांनी पारंपरिक ग़ज़ल स्वरूपात सर्जनशील भाषा व व्यक्तिरेखेचे अनोखे प्रयोग करून आधुनिक जीवनाच्या वेदनादायी वास्तवाचे भेदक चित्रण केले आहे. अर्जन हसीद यांचा जन्म पाकिस्तानातील (तत्कालीन ब्रिटिश भारतातील) कराची, सिंध येथे झाला. त्यांचे बालपण सिंधच्या सांस्कृतिक व सामाजिक वातावरणात व्यतीत झाले. सिंधी भाषेची समृद्ध परंपरा, लोकसाहित्य व पारंपरिक काव्यशैली यांचा प्रभाव त्यांच्या बालमनावर पडला. १९४७ च्या भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी त्यांना मोठ्या अस्थिरतेला सामोरे जावे लागले. फाळणीच्या हिंसाचार आणि विस्थापनाच्या काळात ते भारतात स्थलांतरित झाले. प्रथम मुंबई येथे थोडा काळ राहिले, नंतर जयपूर येथेही काही दिवस व्यतीत केले आणि शेवटी अहमदाबाद येथे स्थायिक झाले. या स्थलांतरामुळे त्यांच्या जीवनात गहन अनुभवांची भर पडली. विस्थापित जीवन, सांस्कृतिक बदल आणि नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याची प्रक्रिया यांचा त्यांच्या भावनिक मनावर खोल परिणाम झाला. त्यांनी स्वअध्ययन व वाचनाच्या माध्यमातून साहित्यिक परिपक्वता प्राप्त केली.

१९५६ मध्ये त्यांनी कविता लेखनास प्रारंभ केला. त्यावेळी ते सुमारे २६ वर्षांचे होते. फाळणीनंतरच्या कठीण काळात शिक्षण व साहित्यिक अभ्यास चालू ठेवत त्यांनी आपले सर्जनशील सामर्थ्य विकसित केले. अहमदाबाद येथील वास्तव्यात त्यांना नव्या सामाजिक-राजकीय वातावरणाचा प्रत्यय आला. या काळात प्रगतिशील विचारधारा व पारंपरिक स्वच्छदतावादाचा संगम त्यांच्या प्रारंभिक रचनांमध्ये दिसून येतो. बालपणी सिंधमध्ये अनुभवलेल्या सांस्कृतिक वारशाने त्यांच्या नंतरच्या ग़ज़लांना गहनता प्रदान केली. फाळणीचे वेदनादायी स्मरण, स्थलांतराची व्यथा आणि नव्या भूमीवरील पुनर्स्थापना यांचा त्यांच्या मानसिकतेत दीर्घकाळ प्रभाव राहिला. त्यांचे बालपण व युवावस्था यातूनच त्यांच्या सर्जनशीलतेची पायाभरणी झाली. २००६ पर्यंत, म्हणजे कविता-लेखनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापर्यंत ते लिहीत होते.

अर्जन हसीद यांची साहित्य संपदा : – सवासण जी सुरहन (श्वासाचा सुगंध, १९६६), पथुए पथर कंदा कंदो (प्रत्येक दगड, प्रत्येक सिंहासन – १९७४ )
मेम सिजा (माखलेला सूर्य – १९८४), मोगो (मंदबुद्धी – १९९२), उंजा (तहान – १९९९) , सही पटजे (थोडा वेळ आराम करा – २००६) इत्यादी त्यांचे कविता आणि गझलसंग्रह होत. अर्जन हसीद यांनी प्रत्येक कविता/ग़ज़ल संग्रहात काही नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आणले आणि अत्यंत पारंपरिक स्वरूप असलेल्या ग़ज़लेला नवीन रूप दिले. त्यांचा साहित्यिक प्रवास १९६६ पासून सुरू झाला. पहिल्या संग्रह सवासण जी सुरहन (श्वासाचा सुगंध) मध्ये ग़ज़ल प्रगतिशील विचारांनी भारलेल्या होत्या. या संग्रहात सामाजिक जागृती व प्रेमाची कोमलता यांचा सुंदर संगम साधला गेला आहे. हा संग्रह त्यांच्या प्रारंभिक सर्जनशीलतेचा आरंभबिंदू ठरला. १९७४ मध्ये प्रकाशित झालेल्या दुसऱ्या पथुए पथर कंदा कंदो या संग्रहामध्ये त्यांच्या ग़ज़ल नवीन लाटेच्या कवितेने (नवकविता) मिश्रित होत्या. येथे त्यांनी पारंपरिक ग़ज़लच्या चौकटीत आधुनिक काव्यतंत्रे आणली. सामाजिक व राजकीय वास्तवाशी संबंधित निरीक्षणे अधिक तीव्र झाली. ग़ज़ल आता केवळ प्रेमगीत राहिली नाही तर जीवनातील कठोर सत्यांचा साक्षीदार बनली. १९८४ चा मेम सिजा हा संग्रह त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. यात त्यांनी एक नवीन शैली सादर केली. शब्दांना शब्दकोशाच्या बंधनातून मुक्त केले आणि ‘सिनेस्थेसिया’ – इंद्रिय भावनांची  कार्यात्मक अदलाबदली – चा परिचय करून दिला. या प्रयोगाने ग़ज़लला नवी दृष्टी प्राप्त झाली. शब्दांची अर्थव्याप्ती विस्तारित झाली. वाचकाच्या मनात इंद्रियसंवेदनांची अदलाबदल होऊन नव्या अनुभूती जागृत होतात. या संग्रहाने त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळवून दिला. १९९२ च्या ‘मोगो’ (मंदबुद्धी) मध्ये त्यांनी ‘सिनेस्थेसिया’ चा वापर अधिक परिष्कृत केला. पूर्वीच्या प्रयोगाला अधिक सूक्ष्मता व गहनता दिली. १९९९ मधील उंजा (तहान) या संग्रहात त्यांनी व्यक्तिरेखेच्या अनोख्या उदाहरणांसह अभिव्यक्ती प्रकट केली. ग़ज़लमध्ये व्यक्तिरेखेचा अनोखा वापर करून त्यांनी वस्तू, घटना व भावनांना मानवी गुण प्रदान केले. यामुळे ग़ज़ल अधिक जिवंत व प्रभावी झाली. २००६ मधील सही पटजे (थोडा वेळ आराम करा) हा नुकताच प्रकाशित झालेला संग्रह त्यांच्या सर्जनशीलतेचा नवा शिखरबिंदू ठरला. यात त्यांनी पूर्णपणे सर्जनशील भाषेचा वापर केला, ज्यावर हसीदची स्वतःची मोहर आहे. हा संग्रह वाचताना वाचकाला असे वाटते की सर्जनशील लेखक नेहमी आपल्या हातात ताज्या हवेची झुळूक पकडण्यास समर्थ असतो आणि आपल्या स्पर्शाने त्या झुळूकेला असामान्य सुगंध देण्यासही समर्थ असतो. हसीदच्या सर्व संग्रहांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की, काहीतरी अनुपम देण्याच्या वेळी त्यांनी स्वतःविरुद्ध बंड केले. त्यांच्या ग़ज़ल आपल्या अस्तित्वासाठी वातावरणावर अवलंबून असतात. निरीक्षणे व अभिव्यक्ती परिस्थितीच्या फक्त बाह्य रेषेला स्पर्श करणाऱ्या नाहीत, तर त्या परिस्थितीतून सरळ आत जाणाऱ्या भेदक रेषा आहेत. त्यांची अभिव्यक्ती व्यक्तिनिष्ठ नसूनही त्यांचे संघर्ष व यातना पूर्णपणे वैयक्तिक आहेत. स्वर्गीय परम अबीचंदानी यांनी म्हटल्याप्रमाणे, “हसीदांच्या नवीन ग़ज़लांमध्ये जे आनंददायी आहे ते म्हणजे त्या आपल्याबद्दल बोलतात आणि फक्त या दिवसाबद्दल, वेदनादायी, काळ्या आजबद्दल बोलतात.” ग़ज़ल स्पष्टीकरण देत नाहीत, तर वर्तमान युगाच्या साक्षीदार म्हणून बाहेर येतात. त्यांचा स्वर स्त्रीलिंगी न राहता पुरुषीही बनला आहे. हसीद यशस्वीरीत्या ग़ज़लच्या स्वभावालाच बदलण्यात यशस्वी झाले. त्यांच्या ग़ज़लमध्ये स्थानांतरित विशेषणे, उपमा व रूपके कुशलतेने वापरले गेले आहेत. हसीदांच्या लेखनांपैकी सुमारे १०० रचना संगीतबद्ध झाल्या आणि सिंधी गायकांनी त्या गायल्या. त्यांचे साहित्य आधुनिक ग़ज़लला नवे आयाम देणारे आहे.

अर्जन हसीद यांना त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या तिसऱ्या संग्रह मेम सिजा (१९८४) साठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने त्यांच्या शैली, शब्दमुक्ती व सिनेस्थेसिया या प्रयोगांना राष्ट्रीय मान्यता मिळाली. हसीद यांच्या ग़ज़लना आधुनिक काळातील वेदनादायी वास्तवाचे चित्रण करण्याची क्षमता या पुरस्काराने अधिक मजबूत केली. अर्जन हसीद यांनी सिंधी ग़ज़लला आधुनिक काळातील वेदना, वास्तव आणि सर्जनशील भाषेचे नवे आयाम दिले. त्यांचे योगदान सिंधी साहित्यात अमूल्य आहे.

संदर्भ : https://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/arjan_hasid.pdf

समीक्षक : जगतानंद भटकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.