मारुती चितमपल्ली : (१२ नोव्हेंबर १९३२). प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक, अवघे जीवन वनविद्येचा अभ्यास आणि लेखनासाठी समर्पित करणारे व्यासंगी संशोधक व वनाधिकारी म्हणून मारुती चितमपल्ली यांची ओळख मराठी जगताला आहे. सोलापूर येथे एका गिरणी कामगाराच्या कुटुंबात  त्यांचा जन्म झाला. मारुती भुजंगराव चितमपल्ली हे त्यांचे पूर्ण नाव. चितमपल्ली यांच्या वडिलांना वाचनाचा छंद होता. शिक्षणाचे महत्त्व ते जाणून होते. आपल्या मुलांनी विणकामाचे साचे चालवू नयेत, त्यांनी शिकावे ही त्यांची इच्छा होती. चितमपल्ली यांची आई सुगंधाबाई – म्हणजे अम्मा – स्वभावाने शांत आणि सहनशील होती. तिच्या पावलांना रानवाटांची माहेर ओढ होती. इसापाप्रमाणे तिच्या गाठीला कधी न संपणारा कहाण्यांचा खजिना होता. हा वारसा घरातून चितमपल्ली यांना लाभला. त्यांच्या पूर्वजांकडून झाडे लावणे, झाडांवर प्रेम करणे या गोष्टी त्यांना मिळाल्या. अम्मा, माळकरी आत्या, लिंबामामा हे त्यांचे अरण्यविद्येतले गुरू होते.

सोलापुरातील टी. एम. पोरे स्कूल व नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि दयानंद महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील व्यावसायिक शिक्षण त्यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोईमतूर आणि बंगळुरू, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश), डेहराडून येथील वने आणि वन्यजीवविषयक संस्थांमधून घेतले. नांदेड येथील संस्कृत पाठशाळेत तसेच पुणे, पनवेल येथील संस्कृत पंडितांकडे संस्कृत भाषेचे व साहित्याचे अध्ययन केले. जर्मन व रशियन भाषांचाही त्यांनी अभ्यास केला. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात ढेबेवाडी ते मेळघाट अशी तीस वर्षे त्यांनी सेवा केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असताना १९९० साली ते सेवानिवृत्त झाले. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांचे विशेष योगदान आहे.

वनाधिकारी म्हणून शासकीय सेवेत असल्याने चितमपल्ली यांना वनांचे साहचर्य लाभले. आपल्या व्यवसायाचा सांधा अभ्यास विषयाशी जोडून घेत ऋषिवत जीवन त्यांनी व्यतीत केले. पक्षिशास्त्रज्ञ डॉ. सालिम अली, नरहर कुरुंदकर, व्यंकटेश माडगूळकर आणि गो. नी. दांडेकर यांच्याकडून त्यांना निसर्ग निरीक्षणाची व ललित लेखनाची प्रेरणा मिळाली. झाडांच्या सावलीत आणि पुस्तकांच्या सान्निध्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला. प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज काढून देशोदेशीच्या दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह त्यांनी केला, त्यांचे वाचन परिशीलन केले. त्यातून त्यांच्यातला ललितलेखक आणि वनविद्येचा अभ्यासक घडला.

१८ भाषा जाणणाऱ्या या वनमहर्षीने आपला समृद्ध असा निसर्ग-जीवनानुभव आपल्या २१ ग्रंथांतून शब्दबद्ध केला आहे. ललितगद्य, कथा, व्यक्तिचित्रे, आत्मचरित्र, कोशवाङ्मय, अनुवाद  अशा विविध साहित्य प्रकारांत त्यांनी लेखन केले.पक्षी जाय दिगंतरा (१९८३), जंगलाचं देणं (१९८५), रानवाटा (१९९१), शब्दांचं धन (१९९३), रातवा (१९९३), मृगपक्षिशास्त्र (१९९३), घरट्यापलीकडे (१९९५), पाखरमाया (२०००), निसर्गवाचन (२०००), सुवर्णगरुड (२०००), आपल्या भारतातील साप (२०००), आनंददायी बगळे (२००२), निळावंती (२००२), पक्षिकोश (२००२), चैत्रपालवी (२००४), केशराचा पाऊस (२००५),चकवाचांदण  : एक वनोपनिषद (२००५), चित्रग्रीव (२००६), जंगलाची दुनिया (२००६), An Introduction to Mrigpakshishastra of Hansdev (2000), नवेगावबांधचे दिवस (२०१०) अशी साहित्यसंपदा त्यांनी निर्माण केली. चितमपल्ली हे मुळात पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक. अरण्य जीवनावरील अनुभव आणि संशोधन लोकांपर्यंत पोचावे म्हणून त्यांनी ललित लेखनाची वाट अनुसरली.

निसर्ग चैतन्यमय आहे, सारे अरण्य म्हणजे एक प्राणमय जीव आहे, त्याला त्याचे स्वतंत्र व्यक्तित्व आहे ही निसर्गाकडे पाहण्याची स्वतंत्र आणि व्यापक दृष्टी चितमपल्ली यांच्या निसर्गलेखनाला निराळेपण मिळवून देते. चितमपल्ली यांच्या ललित साहित्याचा एक लक्षणीय विशेष असा की, अरण्यविद्येतून प्राप्त झालेली शास्त्रीय माहिती अतिशय लालित्यपूर्ण आणि रोचक स्वरूपात त्यात येते. शास्त्रीय ज्ञान आणि लालित्य यांचा सुरेख मेळ त्यांच्या साहित्यात पाहायला मिळतो. नाना रसभावनांनी त्यांचे लेखन अंतर्बाह्य फुललेले आहे. शास्त्रीय ज्ञानाच्या भाराने ते वाकले नाही. शास्त्रीय ज्ञान ललित रूप धारण करून अवतरण्याचे अप्रूप त्यांच्या ललितगद्यात पहायला मिळते. सृष्टीच्या माहीतगाराने अत्यंत रसज्ञ वृत्तीने केलेले हे लेखन आहे. त्यातून वनविद्येचे, अरण्यानुभवाचे अस्पर्श, अनोखे असे हिरवे जग मराठी साहित्यात आले. त्यांच्या ललित लेखनाने मराठी साहित्याच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावल्या.

पक्षिजगत हा चितमपल्ली यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. पक्ष्यांच्या आठवणींनी त्यांचे सबंध भावविश्व व्यापलेले आहे. त्यातून ‘पक्षिवेडा माणूस’ ही त्यांची ओळख सर्वदूर झाली. पक्ष्यांचे जीवन आणि त्यांचे अपार्थिव सौंदर्य त्यांनी आपल्या साहित्यातून अतिशय देखण्या व चित्रमय स्वरूपात शब्दबद्ध केले. चितमपल्ली यांच्या पक्षिवेडाचे फलित म्हणजे त्यांनी  निर्माण केलेला पक्षिकोश  हा ग्रंथ. ‘कोशवाङ्मयाची निर्मिती हे आपले जीवितकार्य आहे’ या उत्कट ध्यासातून त्यांनी कोश वाङ्मयाच्याकार्यास वाहून घेतले आहे. पक्षिकोशाची निर्मिती करून मराठी जिज्ञासेला त्यांनी कायमचे ऋणाईत केले. पक्ष्यांची अठरा भाषांतील नावे त्यांनी पक्षिकोशात दिली आहेत. ज्या पक्ष्यांची मराठी नावे आढळत नाहीत त्यांचे त्यांनी नव्याने नामकरण केले. मराठी भाषेला असे शब्दांचे धन त्यांनी दिले. त्यांनी पक्षिकोशात ४५० पक्ष्यांची माहिती दिली आहे. चितमपल्ली यांच्या लेखनाने असे मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या दिशेने आश्वासक पाऊल टाकण्यास साहाय्य केले.चितमपल्ली यांच्या लेखनात वैविध्यपूर्ण प्राणिसृष्टीही येते.  प्राण्यांची रूपवर्णने आणि जीवनशैली यांचे वेधक चित्रण करण्यात त्यांची प्रतिभा रमते. त्यांनी वन्यजीवांचीही सूक्ष्म निरीक्षणे केली. आदिवासींची संस्कृती, त्यांचे निसर्गनिर्भर जीवन आणि त्यांना ज्ञात असलेली सृष्टीची रहस्ये त्यांच्या ललितलेखनातून आविष्कृत झाली आहेत. अशा अद्भुत, अलक्षित अरण्यसंस्कृतीमुळे त्यांच्या लेखनात विलक्षण असे निसर्ग विषयक ज्ञान प्रकटते.

सूक्ष्म निरीक्षण, गाढा व्यासंग, संशोधकाची दृष्टी, सृष्टिविषयक जागते कुतूहल या गुणांमुळे त्यांनी केलेले वन्यजीवांचे, कीटकसृष्टीचे आणि एकूणच निसर्गजीवनाचे चित्रण लक्षणीय ठरले आहे. निसर्गलेखक मारुती चितमपल्ली यांच्या ललित लेखनाने मराठी साहित्यात निसर्ग चित्रणाची हिरवी वाट निर्माण केली. निसर्ग आणि माणूस यांच्यातील नात्याचा शोध त्यांच्या ललित प्रतिभेने घेतला. ‘वनविद्येचे तत्त्वज्ञ ललित गद्यकार’ म्हणून त्यांना समीक्षकांनी गौरविले आहे. चितमपल्ली यांच्या ललित लेखनाचा, त्यांच्या वनविद्येच्या अभ्यास व संशोधनाचा गौरव त्यांना अनेक झळकती मानचिन्हे देऊन करण्यात आला. तीन वेळा महाराष्ट्र राज्य पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (२०१६), दमाणी साहित्य पुरस्कार (१९९१), फाय फाउंडेशन पुरस्कार (१९९१), अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचा सन्मान (१९९६), महाराष्ट्र फाउंडेशनचा गौरव पुरस्कार (२००३), वेणू मेमन लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड (२००७), नागभूषण पुरस्कार (२००८), वसुंधरा सन्मान (२००९), भारती विद्यापीठ जीवनसाधना पुरस्कार (२०१३) अशा अनेक सन्मानांचे ते धनी ठरले. १९८७ साली नासिक येथे झालेले पहिले पक्षिमित्र संमेलन, २००० साली औदुंबर येथे झालेले ५७ वे विदर्भ साहित्य संमेलन, २००० साली उमरखेड येथे झालेले ५१ वे विदर्भ साहित्य संमेलन आणि २००६ साली सोलापूर येथे झालेले ७९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – या सर्व संमेलनांच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना लाभला आहे.

संदर्भ :

  •  चितमपल्ली, मारुती, चकवाचांदण : एक वनोपनिषद, मुंबई, २००५.
  •  पुजारी, सुहास, रानावनातला माणूस, पुणे, २००६.
  •  पुजारी, सुहास (संपा.), मारुती चितमपल्ली : व्यष्टी आणि सृष्टी, नागपूर, २०१२.