शक्यतावाद. मानव हा क्रियाशील प्राणी असून तो निसर्गावर मात करू शकतो, या विचारप्रणालीला संभववाद असे म्हटले जाते. पर्यावरण हा मानवी जीवनावर निर्बंध घालणारा घटक आहे, या निसर्गवादी विचारसारणीच्या अगदी विरोधी भूमिका संभववादी विचारप्रणालीच्या तज्ज्ञांनी घेतलेली आढळते. मानव भूगोलात मानव आणि निसर्ग यांच्या परस्परसंबंधांचा विचार मांडत असताना मानव हा एक क्रियाशील घटक असून निसर्गाकडून प्राप्त झालेल्या घटकांमधून तो आपली संधी शोधत असतो. या विचारधारेची दिशा नैसर्गिक पर्यावरणाकडून सांस्कृतिक पर्यावरणाकडे झुकलेली दिसते. या विचारप्रणालीचा उगम फ्रान्समध्ये झाला. फ्रेंच भूगोशास्त्रज्ञ पॉल व्हीदाल द ला ब्लाश, झां ब्रुने, अ‍ॅल्बर्ट दमॉन्झॉन व राऊल ब्लँचार्ड, फ्रेंच इतिहासतज्ज्ञ लुशियन पॉल व्हिक्टर फेबर, अमेरिकन भूगोलज्ञ आयझेया बोमॅन व कार्ल सॉयर इत्यादी तज्ज्ञांनी या विचारप्रणालीचा पुरस्कार केला. पहिल्या महायुद्धानंतर लुशियन फेबर यांनी वेगवेगळ्या समाजाच्या विकासाची पातळी व त्यांचा इतिहास यांचे विश्लेषण करण्यासाठी समाजशास्त्रीय विचारप्रणाली मांडली. इतिहासाबद्दलच्या या भाष्यातच फेबर यांनी पहिल्यांदा ‘संभववाद’ ही संज्ञा वापरली. त्यांनी ही संज्ञा ब्लाश यांच्या विवेचनावरून घेतलेली होती. फेबर यांनी नैसर्गिक पर्यावरणाऐवजी मनुष्याच्या कार्यास प्राथमिक स्थान दिलेले आहे. फ्रेंच इतिहासकार व भूगोलशास्त्रज्ञांनी निसर्गातून मानव योग्य संधी निवडण्यासाठी मोकळा आहे, या विचारावर भर दिला. निसर्गनियम समजावून घेऊन मानवाने कृती केल्यास त्याला त्यात यश मिळते. निसर्ग मानवाला केवळ एकाच मार्गाने जा असे सांगत नाही, तर निसर्गात त्याला पुष्कळसे मार्ग खुले असतात. त्यांपैकी कोणताही योग्य मार्ग निवडण्यास तो मोकळा आहे. निसर्ग मानवास अनेक ठिकाणी संधी उपलब्ध करून देतो; परंतु तिचा फायदा कसा करून घ्यायचा किंवा कोणत्या नैसर्गिक परिस्थितीच्या घटकांची निवड आपल्या आर्थिक लाभासाठी करायची, हे ठरविणे संपूर्णपणे मानवाच्या हातात असते. या संदर्भात फ्रेंच विचारवंत म्हणतात, गारगोटीपासून विस्तव तयार करता येतो. गारगोटीचे दोन खडे जवळजवळ आहेत; परंतु त्यातून माणूसच विस्तव तयार करू शकतो. सर्व मानवनिर्मित घटकांची निर्मिती व शेवट या गोष्टी सर्वस्वी माणसावरच अवलंबून आहेत. तोच खरा शक्तिमान आहे. नैसर्गिक परिस्थिती संपूर्णपणे मानवी समाजाचे स्वरूप नियंत्रित करू शकत नाही. निसर्गाची पकड ढिली करणे हे मानवाच्या हाती असते. संभववादाचे अमेरिकेतील प्रवक्ते बोमॅन असे म्हणतात की, निसर्गनियमांना अनुसरून मानव आपले जीवन व्यतीत करत असतो; परंतु निसर्गनियमांचा प्रभाव स्थल-काल दृष्ट्या बदलता असतो. मानवाची तंत्रविद्येत सतत प्रगती चालू असली, तरीदेखील निसर्गाचे नियंत्रण सर्वस्वी झुगारून देण्याइतपत मानव समर्थ बनणे कठीण आहे, हे संभववादी नेहमीच आवर्जून सांगत आलेले आहेत. मानवी सामर्थ्याच्या मर्यादा त्यांनाही मान्य आहेत. निसर्गनियमांचे योग्य रितीने पालन करूनच विकास योजना राबविण्याची कार्यवाही मानव करीत असतो. पृथ्वीवर एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच मानवी विकासाला वाव असतो. ही मर्यादा अक्षांश, उंची व खोली या घटकांनी तयार झालेली असते. या घटकांनी घातलेल्या मर्यादेतच सापेक्ष रितीने मानवी विकास होऊ शकतो, त्यापलीकडे जीवन सुसह्य नसते. उदा., ७० अंश अक्षवृत्तापलिकडे मानवी जीवनास योग्य असे हवामान नाही, जास्त उंचीवर प्राणवायू विरळ होतो, तसेच मानवी वस्ती ही घनरूप पृथ्वीवरच आढळते. मानवाने इतिहासकाळापासूनच निसर्गावर नियंत्रण ठेवून निसर्गाचा मानवाच्या कल्याणासाठी वापर केलेला आहे.

सुप्रसिद्ध फ्रेंच भूगोशास्त्रज्ञ पॉल व्हीदाल द ला ब्लाश यांनी पर्यावरणीय संभववाद ही संकल्पना जगापुढे मांडली आणि तिचा विकास करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, सांस्कृतिक विकासावर पर्यावरणाच्या मर्यादा येत असल्या, तरी संपूर्ण संस्कृतीवरच मर्यादा येत नाहीत. या मर्यादांमधूनच मानव आपल्या संधी शोधत असतो व निर्णय घेत असतो. मानवी प्रयत्नांमुळे निसर्गाची बंधने खूपच शिथिल होऊन सुसह्य होऊ शकतात. मनुष्य केवळ प्राकृतिक पर्यावरणानुसार आपले जीवन व्यतीत करीत नसून तो आपल्या बुद्धी, ज्ञान व तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यावर वातावरणालाही स्वत:साठी अनुकूल करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या या कृत्यामुळे एक प्रकारच्या सांस्कृतिक पर्यावरणाचा विकास होतो. जंगल स्वच्छ करून जमीन शेतीयोग्य बनवून तेथे शेती करणे, खाणीतून खनिजे काढणे, रस्ते व लोहमार्गांची बांधणी, उद्योगधंद्यांचा विकास करणे, नद्यांवर बांध घालून जलसिंचन व जलविद्युत निर्मिती केंद्रे उभारणे या सर्व गोष्टींचा सांस्कृतिक पर्यावरणामध्ये समावेश होतो. शेती, खाणी, कारखाने, खेडी, शहरे, मोटारी इत्यादी गोष्टी मानवी कृत्यांचे प्रतीक समजली जातात. त्यामुळे आता निसर्गवाद ही विचारप्रणाली मागे पडली असून सांस्कृतिक विकासाचे विश्लेषण करण्यासाठी संभववाद ही विचारप्रणाली पुढे आली आहे. फ्रान्समध्ये संभववाद या विचारप्रणालीचा उगम आणि विकास झाला. त्यामुळे तिला ‘भूगोलातील फ्रेंच विचारप्रणाली’ असे म्हटले जाते. या विचारप्रणालीनुसार मानव त्याची गरज, इच्छा आणि कुवत यांनुसार पर्यावरणाचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेतो. ही विचारसरणी डार्विन यांच्या काळापासूनच चालत आलेली आहे. मानवी दृष्टिकोणातून कोणत्याही प्रदेशाचे स्थान आणि हवामान अधिक महत्त्वपूर्ण असते. ब्लाश यांना या विचारसरणीची कल्पना फ्रीड्रिख राट्सेल यांचे ग्रंथ आणि लेखनातून स्फुरली. राट्सेल हे पर्यावरणीय निसर्गवादाचे प्रवर्तक होते, तर ब्लाश यांनी संभववाद या विचारसरणीवर भर दिला. ब्रुने हे ब्लाश यांच्या विचारधारेचे खंदे समर्थक होते. ब्लाश यांच्यानंतर ब्रुने, सॉयर व पारिस्थितिकी शास्त्रज्ञ बॉरो, तसेच ब्लाश यांच्या इतर अनुयायांनी फ्रान्समध्ये संभववाद या विचारधारेच्या वाढीचे आणि प्रसाराचे काम केले. फ्रान्सबाहेरही अनेक भूगोलतज्ज्ञांनी आणि मानवशास्त्रज्ञांनी संभववाद ही विचारधारा स्वीकारलेली आढळते.

ब्लाश यांच्या मते, मानव हा एक भौगोलिक घटक असून तो कर्तृत्वप्रधान (ॲक्टिव्ह) आणि कर्मप्रधान (पॅसिव्ह) असा दोन्हीही आहे. मानवी क्रियांमुळे पृथ्वीवरील सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही प्रकारच्या घटकांमध्ये परिवर्तन घडून येत असते. आपल्या प्रदेशातील भूरचना, हवामान, वनस्पती, जमीन इत्यादींमध्ये मानव परिवर्तन करतो. उदा., डोंगराळ प्रदेशात शेती करण्यासाठी तेथे उपयुक्त जमीन नसली, तरी मानवाने पायऱ्यापायऱ्यांचा उतार तयार करून तेथे शेती बनविली आहे. कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात विहिरी, कालवे यांच्या साहाय्याने जलसिंचन करून अन्नधान्याचे उत्पादन घेतले जाते. कमी सुपीकतेच्या जमिनीस खतांचा पुरवठा करून अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. मानवाने आधुनिक तंत्रज्ञान वापरून वनस्पती व पिकांच्या अनेक संकरित जाती निर्माण केल्या. काचगृहातील शेतीचे तंत्र सायबीरियासारख्या अतिशीत प्रदेशात वापरून तेथेही वेगवेगळी पिके घेतली जाऊ लागली. भारतीय शेती मान्सूनच्या हातातील जुगार आहे, असे मानले जात असले, तरी गेल्या काही दशकांत जलसिंचन आणि आधुनिक कृषी-तंत्राच्या जोरावर शेतीमध्ये प्रचंड प्रगती घडवून आणलेली आहे. भारताने अन्नधान्न्याच्या आयातीवरील अवलंबित्व संपुष्टात आणून आज अन्नधान्न्याच्या बाबतीत ते एक स्वयंपूर्ण राष्ट्र बनविले आहे. राजस्थान कालव्यामुळे थरच्या वैराण वाळवंटात कृषि-विकास घडवून आणला आहे. महाराष्ट्रात मोठमोठी धरणे, पाझर तलाव, जलशिवार योजना यांमुळे दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मानव कृत्रिम पाऊस पाडू लागला आहे, परीक्षा नळीत मानवी जीवाची निर्मिती करू लागला आहे, अंतराळात अवकाशस्थाने निर्माण करू लागला आहे, तो चंद्रावर जाऊन पोहोचला, मंगळावर यान पाठविले, सूर्याच्या उष्णतेचा व वाऱ्याचा ऊर्जा निर्मितीसाठी उपयोग करू लागला आहे. वाहतूक व संदेशवहनात तर कमालीची प्रगती केली आहे. अशा असंख्य उदाहरणांवरून मानव हा क्रियाशील असल्याचे स्पष्ट होते. निसर्ग नेहमी मूलभूत गरजा भागवितो असे नाही, तर भौतिक विकासाला योग्य असे सुप्त घटक मानवाला उपलब्ध करून देतो. या सुप्त गुणांवर संपूर्णपणे मानवाचे स्वामित्त्व असते.

प्रदेशात समान संभावना असूनही आर्थिक उन्नतीमध्ये फरक : एक विशेष गोष्ट म्हणजे मानवाने केलेली निवड महत्त्वाची ठरते की, ज्यामुळे प्रदेशात समान संभावना असूनही एका प्रदेशाची आर्थिक उन्नती वेगाने होत जाते आणि दुसऱ्या प्रदेशाची आर्थिक प्रगती मंद गतीने होते. उदा., संयुक्त संस्थानांत गेल्या काही दशकांत आर्थिक उन्नती झपाट्याने झालेली आहे; परंतु संयुक्त संस्थानांत हजारो वर्षे वास्तव्य करणारे आदिवासी रेड इंडियन प्रगती करू शकले नाहीत. वास्तविक त्यांच्या काळातही संयुक्त संस्थानांची प्राकृतिक रचना, हवामान, जमीन, वनस्पती इत्यादी प्राकृतिक घटक मागील चार शतकांप्रमाणेच होते; परंतु यूरोपीयन लोक तेथे आल्यावर नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून त्यांनी आर्थिक व सांकृतिक विकास केलेला आहे आणि आज जगामध्ये सर्वांत प्रगतिपथावर असलेले राष्ट्र म्हणून संयुक्त संस्थाने या देशाने नाव कमाविले आहे. समान भौतिक पर्यावरणात मानवाकडून वेगवेगळ्या क्रिया-प्रतिक्रिया होत असतात. याचे दुसरे उदाहरण म्हणजे प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतींचा फैलाव वेगवेगळ्या पर्यावरणीय परिस्थितीत झाला होता. दुसऱ्या बाजूला मानवाने वेगवेगळ्या पर्यावरणीय परिस्थितीमध्ये एकसारखाच प्रतिसाद दिल्याचे दिसून येते. उदा., उत्तर अमेरिकेतील वेगवेगळ्या पर्यावरणीय परिस्थितीमध्ये यूरोपीय समुदायाने यूरोपमधून अमेरिकेकडे स्थलांतर केले. या उदाहरणावरून असे दिसून येते की, मानवी क्रियांवर नैसर्गिक पर्यावरणाचा फारसा प्रभाव पडलेला नाही. यावरून असे सिद्ध होते की, प्रदेशातील नैसर्गिक पर्यावरणामध्ये समानता असूनही आर्थिक व सांकृतिक विकासासाठी केलेल्या निवडीमुळे विकासाची भिन्न भिन्न अवस्था प्राप्त होते. मानव निसर्गाने निर्धारित सीमांतर्गत राहून स्वत:साठी काही अनुकूल पर्याय शोधत असतो. त्यामुळे संभववादी विचारसरणीनुसार मानवास एक सक्रिय किंवा क्रियाशील प्रेरणा मानलेले आहे.

प्राचीन काळापासून मानवाने आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर पर्यावरणीय पारिस्थितिकीत स्वत:साठी सुविधाजनक असे प्रयोग केले आहेत आणि यांमधून अनेक सफलतादेखील प्राप्त केल्या आहेत. मानवाकडून अग्निचा शोध हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. प्राचीन काळी अग्निचा वापर थंडीपासून बचाव करण्यासाठी किंवा हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षण मिळविण्यासाठी केला जात असे. आधुनिक काळात वातानुकूलनाच्या विविध पद्धतींद्वारे मानवाने आपले जीवन अधिक सुखकारक केले आहे. असे असले तरी, प्रत्यक्षात मानवाचे हे पर्यावरणीय परिस्थितीशी केलेले अनुकूलन असते. मानवी अनुकूलन हे मानव जातीच्या इतिहासाच्या सर्व अवस्थांमधून दिसून येते. उदा., ऐतिहासिक काळापासून ते वर्तमान काळापर्यंत मानवाने हवामानाच्या विपरीत परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी विभिन्न प्रकारच्या घरांची निर्मिती केली आहे. पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रात मानव हा सर्वांत बुद्धिमान प्राणी आहे. त्याने बुद्धी व कार्यकुशलतेच्या जोरावर पारिस्थितिकी व पर्यावरणावर प्रभाव पाडण्याची क्षमता प्राप्त केली आहे. मानव हा भौतिक पर्यावरणाचा एक अविभाज्य घटक असून त्याने भौतिक पर्यावरणात बदल घडवून स्वत:चे असे एक सांस्कृतिक विश्व निर्माण केले आहे. यामुळे मानवाचे वर्तन पर्यावरणीय पारिस्थितिकीला अनुसरून असते. त्याचबरोबर तो स्वत:च्या गरजा, इच्छा-आकांक्षानुसार पारिस्थितिकी तंत्रात परिवर्तन घडवून ते स्वत:ला अनुकूल करून घेत असतो. मानवी विकासाला निसर्ग बंधनकारक नाही.

वास्तवात निसर्गवाद आणि संभववाद यांवर सुमारे ५०-६० वर्षांपेक्षा जास्त काळ  वादविवाद चाललेला होता. ऑस्ट्रेलियन भूगोलज्ञ ग्रिफिथ टेलर यांनी संभववाद या विचारप्रणालीवर टीका केली. ज्याप्रमाणे निसर्गवाद्यांनी पर्यावरणाला श्रेष्ठ मानले, तसे संभववाद्यांनी मानवाला शक्तिमान म्हटले आहे. प्रत्यक्षात दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत. भोगोलिक कारकांमध्ये नैसर्गिक कारके आणि मानवी कारके दोन्हीही क्रियाशील असतात. त्यामुळे असे निश्चितपणे म्हणता येत नाही की, मानव आपल्या क्रियांबाबत पूर्णपणे स्वतंत्र आहे. मानव हा क्रियाशील प्राणी असला, त्याने कितीही कौशल्ये प्राप्त केली असली आणि आपल्या जीवनाशी संबंधित निर्णय घेण्याबाबत तो स्वतंत्र असला, तरीदेखील निसर्गाकडून मानवी कृतीला काही मर्यादा निश्चित केल्या आहेत की, ज्या मानव सहजासहजी पार करू शकत नाही. म्हणजेच निसर्ग आणि मानव हे दोघेही आपआपल्या परीने श्रेष्ठ आहेत. यातूनच पुढे ग्रिफिथ टेलर यांनी नव-निसर्गवाद (थांबा व जा निसर्गवाद) ही विचारप्रणाली मांडली.

संभववादावरील आक्षेप ꞉ निसर्गापेक्षा मानव श्रेष्ठ आहे, असा विचार असणाऱ्या संभववाद या संकल्पनेवर अनेक विचारवंतांनी आक्षेप घेतलेले आहे.

  • ज्याप्रमाणे निसर्गप्रमाणवादी निसर्गास सर्वशक्तिमान मानतात, त्याच प्रमाणे संभववादी मानवाला सर्वशक्तिमान मानून निसर्गावरील नियमांचे गुण गाताना दिसतात; परंतु मानवच सर्वशक्तिमान आहे, असे म्हणणे निश्चितच चुकीचे आहे.
  • अधिकांश संभववादी एकीकडे प्राकृतिक शक्तींना मानवशक्तिच्या तुलनेत कमी समजतात, तर दुसरीकडे मानव हा प्राकृतिक शक्तिंची अवहेलना करू शकत नाही, असे मानतात. त्यामुळे ज्याप्रमाणे निसर्गप्रमाणवादी विचारसरणीत एक निश्चित मत होते, तसे संभववादी विचारसरणीत होत नाही. काहींच्या मते, निसर्ग मानवास संधी प्राप्त करून देतो, एक योजना प्राप्त करून देतो. तसेच निसर्ग मानवास एक असे कार्यक्षेत्र प्रस्तुत करते की, ज्याच्या निश्चित सीमा असून त्या सीमांमध्ये मानव जवळपास स्वतंत्र असतो. मानव हाच सर्वशक्तिमान असून तो निसर्गावर विजय प्राप्त करू शकतो, असेही काहींचे मत असल्याचे दिसून येते.
  • संभववादास वैज्ञानिक आणि अध्यात्मविद्येचा आधार नाही.

संदर्भ :

  • Freedman, T. E., Hundred years of Geographer, London, 1961.
  • Husain, Majid, Human Geography, Jaipur and New Delhi, 1994.

समीक्षक ꞉ सुरेश फुले