सेवालाल महाराज : (१५ फेब्रुवारी १७३९—४ डिसेंबर १८०६). गोर-बंजारा समुदायाचे आध्यात्मिक गुरू, समाजसुधारक आणि आधुनिक संत. त्यांचा जन्म गोलार दोडी तांडा, ता. गुंटी, जि. अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथे बंजारा समाजातील भीमा नाईक आणि धरमणी या पशुपालक दांपत्यापोटी झाला. गोलार दोडी तांडा हे सेवालाल महाराजांचे जन्मस्थान असल्यामुळे, ते सेवागड या नावानेही ओळखले जाते. आई धरमणी ह्या जयराम वडतीया (सुवर्णा कप्पा, कर्नाटक) यांची राजकन्या. भीमा नाईक व त्यांचे सहकारी यांचा प्रमुख व्यवसाय बैलांच्या पाठीवर धान्याची पोती वाहून नेण्याचा होता. हे सर्व व्यापारी भारतातील मोठमोठ्या संस्थानिकांना रसद (अन्नधान्य) पुरवीत असत. भीमा नायक यांच्या लग्नानंतर त्यांना जवळजवळ १२ वर्षे मूलबाळ नव्हते. पुढे जगदंबा मातेची पूजा व कृपेमुळे सेवालाल महाराज यांचा जन्म झाला, अशी बंजारा समाजात एक श्रद्धा आहे. भीमा नाईक यांना सेवा, बदू, हापा व पुरा ही चार मुले होती. त्यांपैकी सेवालाल हे सर्वांत ज्येष्ठ होते. ते लहानपणापासूनच विरक्त स्वभावाचे असून, जगदंबेचे परमभक्त होते. त्यांच्या घोड्याचे नाव ‘तोळाराम’; तर बैलाचे नाव ‘गराशा’ असे होते. त्यांनी आजन्म अविवाहित राहून समाजाची सेवा करण्याचे कार्य हाती घेतले. काही कालावधीनंतर ते आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आले. त्यानंतर त्यांनी व्यापारानिमित्त संपूर्ण भारतभर भ्रमण केले.
सेवालाल महाराज यांचे कार्य फक्त बंजारा समाजासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीला प्रेरक ठरेल असे होते. ते थोर मानवतावादी संत होते. मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता, पर्यावरण रक्षण, गो-रक्षणाचा संदेश दिला. समाजातील समजुती, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, सत्य, अहिंसा यांविषयी त्यांनी आपले विचार वचने, दोहे, कवने, भजने इत्यादींच्या माध्यमातून मांडले. धर्म रक्षणासाठी त्यांनी निजामाविरुद्ध लढा उभारला. सेवालाल महाराज हे अहिंसेचे विचारक असून त्यांनी बळीप्रथा बंद करण्यासंदर्भात समाज प्रबोधनाचे कार्य आयुष्यभर केले. तत्कालीन बंजारा समाजाची भजनाची आवड लक्षात घेऊन त्यांनी बंजारा बोलीभाषेत लोकगीते, भजन, कीर्तन, लडी यांची रचना केली आणि समाजात धार्मिक व सांस्कृतिक बदल घडवून आणले. नंगारा, थाळी (ताट) या वाद्यांचा संगीतासाठी त्यांनी प्रभावीपणे वापर केला. त्याचबरोबर भटक्या संस्कृतीचे दर्शन त्यांनी जगभर घडवले. आजही बंजारा समाजात एक भाषा, एक पेहराव टिकून असल्याचे दिसते.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात राहणारा बंजारा समाज, त्यांची भाषा, अस्मिता इ.च्या हक्कांसाठी सेवालाल महाराजांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी १८ व्या शतकातील म्हैसूरचे शासक आणि ब्रिटिश शासक यांच्याविरुद्ध लढा दिला. त्या काळात बंजारांना सुरक्षा आणि आशा देणारे ते पहिले नेते होते. त्यांच्या शौर्यगाथा बंजारा समाजाच्या लोकसाहित्यांबरोबरच शीख धर्मीयांच्या इतिहासातसुद्धा आढळतात. सेवालाल महाराज बंजारा समाजातील तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांच्याच बोलीभाषेत उपदेश करायचे. आध्यात्मिक आणि समाज प्रबोधनातून समाजाला दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले. ते आयुर्वेद आणि निसर्गोपचारात पारंगत होते, असे म्हटले जाते. त्यांनी सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कल्याणकारी विचारांची स्थापना केली. ‘शिकायचे, शिकवायचे, शिकून राज्य घडवायचे’ अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली.
सेवालाल महाराजांनी समाज तसेच देशाला उद्देशून सांगितलेले त्यांच्या भाषेतील काही विचार आजही प्रेरणादायी आहेत. स्त्रियांचा आदर करा. मुली जिवंत देवी आहेत, त्यामुळे मुलगा मुलगी भेद करू नका. कुटुंब आणि समाजातील बंधुता कधीही भंग करू नका. माणुसकीवर प्रेम करा. खोटे बोलू नका. व्यसन करू नका. गरजूंना अन्न द्या. जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा. जंगल नष्ट केले, तर आपण स्वतःला नष्ट करीत आहोत, याची जाणीव ठेवा. आपल्या आयुष्यात अंधश्रद्धेला कोणत्याही प्रकारे थारा न देता तर्क व तथ्याच्या आधारे आयुष्य निर्धारित करा. संकटाला निर्भयपणे तोंड द्या. सन्मानाने आयुष्य जगा, धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा. वडीलधारी माणसांचा आदर करा. प्राण्यांचा आदर करा. सण-उत्सव प्रसंगी देवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही प्राणिमात्रांचा बळी देऊ नका. अशा स्वरूपाची शिकवण त्यांनी समाजाला दिली.
शिवाय त्यांनी बंजारा बोलीभाषेत समाजाला उपदेशपर विधाने केली, ती अशी : (बना बळदेर गाडी धासीय) एक दिवस बैलाशिवाय गाडी धावेल. (मलकेर खबर पलकेम कळीय) जग एवढे जवळ येईल की, एका राज्यातील बातमी दुसऱ्या राज्यात लगेच कळेल. (कोई केनी भजो पूजो मत) कोणाची पूजाअर्चा करू नका, देव मंदिरात नाही, माणसात आहे. (रपीया कटोरो पाणी वक जाय) एका रूपयाला एक वाटी पाणी विकले जाईल. (कसाईन गावडी मत वेचो) खाटकाला गाय विकू नका. (गोर गरीबेन जो दांडन खायं, वोरी सात पिढी नरकेम जायं) गोरगरिबांना जो लुटून खाईल त्याच्या सात पिढ्या नरकात जातील. (चोरी लबाडीरो धन घरेम मत लावजो) चोरी करून, खोटे बोलून पैसा कमावू नका किंवा तसा पैसा घरात आणू नका. (जिवते धंणीरो बीर घरेम मत लावजो) जिवंत नवरा असणाऱ्या स्त्रीला आपली बायको म्हणून घरात आणू नका. (ये जो वातेर पत रकाडीय वोन पाने आड पान तारलीव) ह्या गोष्टींचा जो कोणी आदर करेल, मी त्याचे रक्षण करेन, क्षणोक्षणी मी त्याला तारेल.
बंजारा समाजात परिवर्तनाचा विचार मांडून जनतेला विधायक कार्याने दिशा देणारे सेवालाल महाराज होते. ते जगातील प्रत्येक बंजारा समाजातील लोकांचे आराध्य दैवत आहेत. जगण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या बंजारा समाजाला जगण्याचा मार्ग त्यांनी दाखविला.
सेवालाल महाराज यांचे निधन श्रीक्षेत्र रुईगड, जि. यवतमाळ येथे झाले आणि वाशिम जिल्ह्यातील पोहरागड (पोहरादेवी) येथे त्यांना पुरण्यात आले. त्यांची समाधी आजही देवी जगदंबेच्या मंदिराला लागून आहे. जरी त्यांचा व्यक्तिपूजा, पंथ आणि धार्मिक विधींना विरोध होता, तरी ते बंजारा समाजातील लोकांसाठी एक पूजनीय आणि वंदनीय असे ठिकाण आहे. संत सेवालाल आणि देवी जगदंबा यांना समर्पित अशीच मंदिरे इतरत्र अस्तित्वात आहेत. सर्व बंजारा समाज जगदंबा देवीसाठी गुलाबी किंवा लाल रंगाचे ध्वज आणि संत सेवालाल महाराजांसाठी पांढऱ्या रंगाचे ध्वज उभारतात. बंजारा समाजामध्ये सेवालाल महाराजांवर रचली गेलेली लोकगीते गायली जातात. त्यांचे भक्त त्यांच्या दर्शनासाठी पोहरागड आणि रुईगड या दोन्ही ठिकाणी जातात. पोहरागड या ठिकाणी शासनाने भव्य नंगारा भवनचे दालन उभे केले आहे. सध्या त्यांचा कोणीही पूर्वाधिकारी नसून त्यांचे उत्तराधिकारी म्हणून रामराव महाराज यांनी त्यांचे काम पाहिले. पोहरागड येथे संत सेवालाल महाराज ‘जयंती महोत्सव’ साजरा केला जातो. यावेळी देशभरातून बंजारा समाज या ठिकाणी एकवटतो. तसेच प्रत्येक तांड्यांमध्ये त्यांची जयंती प्रथा-परंपरेनुसार साजरी केली जाते. दरवर्षी महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांत त्यांची जयंती शासन स्तरावर साजरी केली जाते.
संदर्भ :
- निकम, गौतम जगन्नाथ, ‘संत सेवालाल महाराज आणि बंजारा समाज एक अभ्यास’, चाळीसगाव, २०१४.
- राठोड, राजकुमार, ‘गोरबंजारा राज’, औरंगाबाद, २०२१.
- राठोड, सुनील, ‘बंजारा जमात : लोकजीवन आणि लोकगीते’, पुणे, २०१२.
समीक्षक : किरण सावे