अजातशत्रू : (इ.स.पू.सु. ४९५—४६२). अजातशत्रू हा बिंबिसार राजाचा मुलगा. कोसल आणि वैशाली या राज्यांवर विजय मिळवून आपल्या पित्याने स्थापन केलेल्या मगध राज्याचा त्याने विस्तार केला. त्यासाठी प्रथम त्याने वैशाली राज्यात फूट पाडली. आपल्या सैन्यासाठी नवीन शस्त्रास्त्रे संपादन केली. आपल्या राज्याच्या वैशाली राज्याबरोबरील सीमेवर त्याने एक किल्ला बांधला आणि मग पूर्ण तयारीनिशी वैशालीवर हल्ला केला. हे दीर्घ युद्ध तब्बल सोळा वर्षे चालले. ते यशस्वी रीत्या जिंकल्यामुळे अजातशत्रू एक शूर सेनानी म्हणून ओळखला जातो. यथावकाश भारताचा पूर्व विभाग त्याने आपल्या आधिपत्याखाली आणला. अजातशत्रूने ३६ छोट्या राज्यांचे एकत्रीकरण केले आणि आपली राजधानी राजगृहापासून हलवून पाटलिपुत्र येथे स्थापन केली. अजातशत्रूने राज्यांत ठिकठिकाणी किल्ले बांधून आपल्या सैन्यासाठी सुरक्षित तळ निर्माण केले. त्यात पुरवठ्याचे साठे असत आणि सैन्य त्या किल्ल्यांच्या आधारे लढत असे. बिंबिसारप्रमाणेच अजातशत्रूनेही युद्धात पायदळ आणि घोडदळाचा परिणामकारक वापर केला. प्रारंभी त्याने जैन धर्माला आणि नंतर बौद्ध धर्माला आश्रय दिला अशी नोंद आहे.

संदर्भ :

समीक्षक – सु. र. देशपांडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

This Post Has One Comment

  1. Vishal

    सातवाहन बद्दल विस्तृत माहिती हवी आहे. कृपया द्यावी. मी तुमच्या लेखांचा रेग्युलर वाचक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा