पंचरात्र : भासाच्या तेरा नाटकांपैकी एक तीन अंकी संस्कृत नाटक. हे महाभारताच्या विराटपर्वावर आधारित नाटक आहे. ह्या नाटकाची कथावस्तू अशी – द्यूतात पराभूत झाल्यानंतर पांडव तेरा वर्षांच्या वनवासाला गेले आहेत. तो संपल्यावर अज्ञातवासाचे एक वर्ष ते विराटाच्या नगरीत वेषांतर करून राहत आहेत. त्याच वेळी दुर्योधनाने यज्ञाला प्रारंभ केला आहे. यज्ञ संपल्यावर दुर्योधन यज्ञासाठी जमलेल्या राजांची भेट घेतो. ह्या यज्ञात पृथ्वीवरील सर्व राजांनी कर आणून दिला आहे; परंतु एकट्या विराटाकडून मात्र काही आलेले नाही. तसेच तो यज्ञातही सहभागी झाला नाही. तेव्हा शकुनी त्याला सांगतो की, विराटाकडे दूत पाठवला आहे, तो परतीच्या वाटेवरच असेल. दुर्योधन द्रोणाचार्यांना दक्षिणा मागण्याची विनंती करतो.

श्री प्रेम गुप्ता निर्देशित पंचरात्र या नाटकातील एक प्रसंग (साभार).

बराच आग्रह केल्यावर ते म्हणतात की, मला स्वत:ला कशाचीही इच्छा नाही, पण तुला काही दक्षिणा द्यायचीच असेल तर बारा वर्षे वनात भटकणार्‍या पांडवांना त्यांचा हिस्सा दे. यावर शकुनी रागावतो आणि हे होणार नाही असे सांगतो. मग द्रोणाचार्यही संतप्त होतात; परंतु भीष्म त्यांना शांत करतात. दुर्योधन, शकुनी व कर्ण यांच्याशी सल्ला मसलत करतो. शकुनी सल्ला देतो की, जर पाच रात्रींच्या आत पांडवांचा ठावठिकाणा लागला आणि ते समोर आले तर आम्ही त्यांना त्यांचा हिस्सा द्यायला तयार आहोत असे सांग. सुरुवातीला द्रोणाचार्य ही अट मान्य करायला तयार होत नाहीत; परंतु तेवढ्यात तिथे विराटाच्या नगरीला पाठवलेला दूत बातमी घेऊन येतो की, विराटाचे नातेवाईक असणार्‍या शंभर कीचक भावांना कोणीतरी नुसत्या हातांच्या प्रहारांनी एका रात्रीत मारले म्हणून दु:खामुळे विराट राजा यज्ञप्रसंगी आला नाही. हे ऐकून भीष्मांना खात्री होते की हे भीमानेच केलेले आहे आणि ते द्रोणाचार्यांना दुर्योधनाची अट मान्य करायला सांगतात. यज्ञात न आल्यामुळे आणि अगोदरच असलेल्या शत्रुत्वामुळे विराटाचे गोधन पळवण्याचा सल्ला भीष्म कौरवांना देतात. द्रोण याला विरोध करतात पण भीष्म त्यांना समजावतात की विराटाच्या बाबतीत कृतज्ञता म्हणून पांडव गोधनाच्या रक्षणासाठी पुढे येतील. कौरव भीष्मांचा सल्ला ऐकतात आणि विराटाच्या गोधनावर हल्ला करतात.

दुसर्‍या अंकाची सुरुवात होते तेव्हा कौरवांनी गोधन पळवले आहे. त्याच दिवशी विराटाचा जन्मदिवसही आहे. स्वतः विराट गोधनाच्या रक्षणासाठी जायला तयार होतो. तेव्हा तो भगवान नावाच्या ब्राह्मणाला गोधन हरणाचा वृत्तांत सांगतो. भगवान ब्राह्मण म्हणजेच वेषांतर केलेला युधिष्ठिर आहे. विराट रथ तयार करण्याची आज्ञा देतो पण तेव्हा त्याला समजते की, राजकुमार उत्तर रथ घेऊन शत्रूला पराभूत करण्यासाठी गेला आहे. आणि त्याचे सारथ्य बृहन्नला करत आहे. बृहन्नला म्हणजे म्हणजेच वेषांतर केलेला अर्जुन आहे. तेवढ्यात एक सैनिक येऊन बातमी देतो की, राजकुमार उत्तराने आपल्या बाणांनी शत्रूला पळवून लावलं आहे; परंतु शत्रूंपैकी एकटा अभिमन्यू हार न मानता लढतो आहे. विराट बृहन्नलेच्या वेषातील अर्जुनाला सभेत बोलावतो. आणि त्याला युद्धाचा वृत्तांत विचारतो. तेवढ्यात आचारी बनून राहणारा भीम अभिमन्यूला पकडून आणतो. अभिमन्यू विराटाला म्हणतो की, तुम्ही जर मला पकडलेत तर माझे मध्यम-पिता भीम मला बाहुबलाने सोडवतील. तेवढ्यात राजकुमार उत्तर तेथे येतो व सांगतो की हा विजय माझ्यामुळे नाही तर बृहन्नला बनलेल्या अर्जुनामुळे मिळाला आहे. अशाप्रकारे अर्जुन, भीम व युधिष्ठिर हे आपल्या खर्‍या स्वरूपात येतात. विराट त्यांना पुन्हा गुप्त वेष घ्यायला सांगतो, तेव्हा युधिष्ठिर सांगतो की अज्ञातवासाचा कालावधी संपला आहे. विराट आपली मुलगी उत्तरा हिचा अर्जुनाशी विवाह करून देण्याची इच्छा व्यक्त करतो. मात्र अर्जुन तिचा विवाह मुलगा अभिमन्यूशी लावून देतो.

तिसर्‍या अंकात सूत कौरवांकडे येतो आणि अभिमन्यू पकडला गेल्याची बातमी देतो. हे ऐकून भीष्म, द्रोण, कर्ण वगैरे अस्वस्थ होतात; परंतु शकुनी त्यांना सांगतो की, पांडव आणि श्रीकृष्ण यांच्या भीतीने विराट त्याला सोडून देईल. सूत पुढे सांगतो की, कोणीतरी चालत येऊन अभिमन्यूला पकडून घेऊन गेला. आपल्या केवळ हातांनी घोड्यांचा वेग थांबवून तो रथात चढला आणि त्याने अभिमन्यूला पकडले. यावर भीष्म म्हणतो की हे काम नक्कीच भीमाचे आहे. द्रोणांनाही तसेच वाटते. शकुनी चिडून म्हणतो की ह्या जगात फक्त पांडवच तेवढे शक्तिशाली आहेत असे नाही, दुसरा कोणीतरी वीर असू शकेल. तेव्हा सूत ध्वजात अडकलेला बाण आणतो, त्यावरही अर्जुनाचे नाव आहे. शकुनी म्हणतो की हा कोणत्या तरी दुसर्‍या अर्जुनाचा बाण असेल. दुर्योधन म्हणतो, जर तुम्ही युधिष्ठिराला आणलंत तर मी त्यांचे राज्य त्यांना देईन. त्याच वेळी विराटनगराहून राजकुमार उत्तर येतो आणि सांगतो की, धर्मराजाने सांगितलं आहे की उत्तरा मला सून म्हणून लाभली आहे, तर तिचा आणि अभिमन्यूचा विवाह इथे करायचा की तिकडे ? शकुनी लगेच उत्तर देतो की तिकडे. तेव्हा द्रोणाचार्य दुर्योधनाला त्याच्या प्रतिज्ञेची आठवण करून देतात. पाच रात्री पूर्ण होण्याआधी त्यांचा ठावठिकाणा लागला आहे. त्यावर दुर्योधन पांडवांना त्यांचे राज्य देतो.

हे नाटक महाभारताच्या विराटपर्वावर आधारलेले आहे. कीचकाला मारण्याचे काम भीमाखेरीज इतर कोणालाही जमणार नाही ह्या महाभारतातील कथेचा संदर्भ घेऊन भासाने पंचरात्र हे नाटक रचले आहे. असे असले तरी भासाने ह्यात थोडे पण लक्षणीय बदल केले आहेत. महाभारतातील युधिष्ठिराचे अज्ञातवासातील नाव कंक असे आहे तर पंचरात्रातील त्याचे नाव भगवान आहे. पंचरात्रमध्ये विराटाच्या गाई पळवण्यासाठी अभिमन्यू गेलेला दाखवला आहे; परंतु महाभारतात मात्र ह्या प्रसंगाच्या वेळी अभिमन्यू द्वारकेत असल्याचा व युद्धात सहभागी झाला नसल्याचा उल्लेख आहे.

कथानकात गरजेप्रमाणे बदल करणे हे भासाचे वैशिष्टय या रुपकात विशेषत्वाने जाणवते; कारण पंचरात्रचे संपूर्ण कथानकच काल्पनिक आहे. युधिष्ठिरादी पांडव पाच दिवसांत समोर आल्यावर दुर्योधनाने त्यांना त्यांच्या वाट्याचे राज्य दिले हे पंचरात्राचे मुख्य कथानकच महाभारतात नाही. पंचरात्र हे समवकार किंवा व्यायोग ह्या प्रकारचे रुपक आहे असे अभ्यासकांचे मत आहे. परंतु याबाबत मतभेद दिसतात.

संदर्भ : देवधर ,सी. आर.,भासनाटकचक्रम्, ओरिएन्टल बुक एजन्सी, पुणे, १९३७.

समीक्षक : सुनीला गोंधळेकर

 

 

 


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.