पश्चिम महाराष्ट्रातील एक जिल्हा. क्षेत्रफळ १०,४८० चौ. किमी. लोकसंख्या ३०,०३,९२२ (२०११). राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे ३.४% क्षेत्र व लोकसंख्येच्या सुमारे २.८९% लोकसंख्या सातारा जिल्ह्यात आहे. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १७° ५’ उ. ते १८° ११’ उ. व ७३° ३३’ पू. ते ७४° ५४’ पू. आहे. या जिल्ह्यात सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, माण (तालुका मुख्यालय दहिवडी), खटाव (वडूज), कराड, पाटण, जावळी/जावली (मेढा), महाबळेश्वर असे एकूण ११ तालुके आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेस पुणे, पूर्वेस सोलापूर, दक्षिणेस सांगली, पश्चिमेस रत्नागिरी आणि वायव्येस रायगड हे जिल्हे आहेत. जिल्ह्याची उत्तर सरहद्द नीरा नदीने, तर पश्चिम सरहद्द सह्याद्रीने सीमित केली आहे. जिल्ह्याचा दक्षिणोत्तर कमाल विस्तार १२० किमी. असून पूर्व-पश्चिम कमाल विस्तार १२८ किमी. आहे. जिल्ह्याचा बराच भाग कृष्णा नदीच्या खोऱ्यात, तर काही भाग भीमा नदीच्या खोऱ्यात मोडतो. सातारा (लोकसंख्या १,२०,०७९ – २०११) हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून ते दिल्ली – मुंबई – पुणे – बंगलुरू – चेन्नई  या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ (पूर्वीचा रा. म. क्र. ४) वर वसले आहे.

भूवर्णन : पर्वत व डोंगररांगा आणि त्यांच्या कुशीतील उंच पठारी प्रदेश व टेकड्या, उंच सखल भूमी, सपाट मैदानी प्रदेश अशी सातारा जिल्ह्याची प्राकृतिक विविधता आढळते. पश्चिमेकडील सह्य पर्वतरांगांचा प्रदेश (सह्याद्री), कृष्णा नदीखोऱ्याचा प्रदेश, नीरा नदीखोऱ्याचा प्रदेश आणि पूर्वेकडील टेकड्यांचा व माळरानाचा प्रदेश असे जिल्ह्याचे चार स्वाभाविक विभाग पडतात. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर उत्तरेस पुणे जिल्ह्याच्या सीमेपासून दक्षिणेस सांगली जिल्ह्याच्या सीमेपर्यंत सह्याद्रीचा विस्तार आहे. कृष्णा नदीखोऱ्याचा दुसरा स्वाभाविक विभाग सुमारे ३२ किमी. रुंदीचा व साधारण सपाट असून या स्वाभाविक विभागाच्या मध्यातून कृष्णा नदी वाहते. वाई, सातारा व कराड हे तालुके कृष्णा नदीखोऱ्याच्या प्रदेशात येतात. येथील जमीन काळी, कसदार व पिकाऊ आहे. नीरा नदीखोऱ्याच्या प्रदेशात खंडाळा व फलटण तालुक्यांचा बहुतांश भाग अंतर्भूत होतो. कृष्णा नदीखोऱ्याच्या पूर्वेकडील चौथा स्वाभाविक विभाग कमी पावसाचा आणि बहुतांश माळरानाचा आहे. येथील जमीन हलकी, वैराण आणि कमी प्रतीची आहे. कमी पावसामुळे या भागात वारंवार अवर्षणाची परिस्थिती निर्माण होते. खटाव व माण तालुक्यांचा बहुतांश भाग या स्वाभाविक विभागात येतो.

जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवर सह्याद्रीची मुख्य रांग असली, तरी सह्याद्री व महादेव (शंभू महादेव) डोंगररांगांचा जटिल प्रदेश, तसेच त्यांचे फाटे (सोंडी), त्यांदरम्यानची नद्यांची खोरी, एकाकी टेकड्या इत्यादी भूमिस्वरूपे जिल्ह्यात सर्वत्र आढळतात. मुख्य सह्याद्री रांगेची जिल्ह्यातील लांबी सुमारे ९७ किमी. असून सर्वसाधारण उंची सस.पासून सुमारे ९१५ ते १,२२० मी.च्या दरम्यान आढळते. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अनेक उंच शिखरे आहेत. घाटमाथ्यावरचे महाबळेश्वर हे जिल्ह्यातील सर्वांत उंच ठिकाण असून येथील सिंदोला टेकडीची सस.पासूनची उंची १,४३५.६ मी. आहे. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील कोकण किनारपट्टीच्या बाजूचा उतार तीव्र, तर पूर्वेकडील पठारी भागाकडील उतार काहीसा मंद आहे.

सह्याद्रीच्या मुख्य श्रेणीपासून पूर्वेस व आग्नेयीस गेलेल्या अनेक डोंगररांगा आहेत. त्यांमध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे महादेव किंवा शंभू महादेव डोंगररांगा, कमळगड, वैराटगड, हातगेघर-आरळे, बामणोली-घेरादातेगड, भैरवगड-कांदूर या डोंगररांगा प्रमुख आहेत. त्यांपैकी महाबळेश्वरच्या उत्तरेस सुमारे १६ किमी.वर प्रारंभ होऊन प्रथम पश्चिम-पूर्व दिशेत व त्यानंतर आग्नेयीस व दक्षिणेस विस्तारलेली डोंगररांग महादेव डोंगररांग म्हणून ओळखली जाते. सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या या डोंगररांगेच्या सुरुवातीचा भाग वाई व खंडाळा या तालुक्यांच्या सीमेवरून गेलेला आहे. या डोंगररांगेमुळे उत्तरेकडील नीरा नदीचे खोरे दक्षिणेकडील कृष्णा नदीच्या खोऱ्यापासून अलग झाले आहे. महाबळेश्वरच्या उत्तरेस आठ किमी.वर सुरू होणारी कमी लांबीची कमळगड ही डोंगररांग असून तिच्यामुळे डावीकडील (उत्तरेकडील) वाळकी व उजवीकडील (दक्षिणेकडील) कृष्णा हे दोन प्रवाह एकमेकांपासून अलग झाले आहेत. वाळकी हा कृष्णेचा एक शीर्षप्रवाह आहे. वैराटगड ही डोंगररांग महाबळेश्वर पठारापासून सुरू होऊन पूर्वेस गेलेली आहे. या रांगेतूनच वाई-पाचगणी-महाबळेश्वर हा घाटरस्ता जातो. वाईपासून आग्नेयीस १० किमी.वर या रांगेतील वैराटगड हा डोंगरी किल्ला आहे. या रांगेमुळे कृष्णा व कुडाळी नद्यांची खोरी अलग झाली आहेत. महाबळेश्वरपासून सुरू होऊन वैराटगडरांगेला साधारण समांतर आग्नेय दिशेने विस्तारित झालेली, हातगेघर-आरळे ही डोंगररांग असून तिच्यामुळे कुडाळी व वेण्णा या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. कृष्णा-वेण्णा नद्यांच्या संगमस्थानापर्यंत हिचा विस्तार आढळतो. या रांगेत डोंगरी किल्ला नाही. कोयना धरणाच्या शिवाजी सागर जलाशयाच्या पूर्व भागात, उत्तरेस महाबळेश्वरपासून सुरू होऊन दक्षिणेस सुमारे ६४ किमी. अंतरापर्यंत सह्याद्रीच्या मुख्य रांगेला जवळजवळ समांतर गेलेली, बामणोली-घेरादातेगड ही सह्याद्रीची एक प्रमुख रांग आहे. तिच्यामुळे वेण्णा व कोयना नद्यांची खोरी विभागली गेली आहेत. सह्याद्रीच्या मुख्य रांगेप्रमाणेच ही रांग उंच, जटिल आहे. या रांगेत छोट्या छोट्या काही खिंडी असून त्यांमुळे मेढा व बामणोली येथून येणाऱ्या रस्त्यांनी ही रांग ओलांडता येते. या रांगेच्या अगदी दक्षिण भागात घेरादातेगड हे तटबंदीयुक्त शिखर आहे. बामणोली-घेरादातेगड रांगेपासून पूर्वेस व आग्नेयीस मैदानी भागातून सातारा, केळवली-सोनापूर व जळू-वसंतगड या तीन मुख्य सोंडी गेलेल्या आहेत. पैकी सातारा ही सोंड केळघर येथून सुरू होऊन सातारा शहरापासून तशीच पुढे उरमोडी-कृष्णा या नद्यांच्या संगमापर्यंत पसरली आहे. या सोंडेमुळे वेण्णा व उरमोडी या नद्यांची खोरी विभागली गेली आहेत. या रांगेत सातारा शहराजवळ सातारा किंवा अजिंक्यतारा (१,००२ मी.) हा तटबंदीयुक्त किल्ला आहे. केळवली-सोनापूर ही दुसरी सोंड कमी लांबीची व काहीशी विखुरलेली व अनियमित स्वरूपाची आहे. बामणोलीच्या दक्षिणेस १३ किमी.वर केळवली येथून ही सुरू होते. तिच्यामुळे उरमोडी व तारळी नद्यांची खोरी अलग झाली आहेत. या रांगेतील एका सोंडेवर सज्जनगड (सस.पासून ९०९ मी.) हा किल्ला आहे. हा किल्ला साताऱ्याच्या नैर्ऋत्येस १० किमी.वर आहे. जळू-वसंतगड ही तिसरी सोंड केळवलीच्या दक्षिणेस १४ किमी.वर बामणोली-घेरादातेगड रांगेपासून सुरू होऊन दक्षिणेस पाटणपर्यंत गेलेली आहे. पाटणच्या ईशान्येस ३ किमी.वर ही रांग आग्नेयीकडे कराडजवळील कृष्णा-कोयना नद्यांच्या संगमाच्या दिशेने गेली आहे. तिच्या काही भागाने तारळी व केरा नद्यांची खोरी तसेच कृष्णा व तिची उपनदी मांड आणि कोयना खोरे विभागली गेली आहेत. या रांगेच्या अगदी आग्नेय भागात कराडच्या वायव्येस ६ किमी.वर वसंतगड हा किल्ला आहे. जिल्ह्याच्या नैर्ऋत्य व दक्षिण भागात सांगली-सातारा जिल्ह्यांच्या सीमेलगत भैरवगड-कांदूर ही डोंगररांग आहे. तिचा बराचसा भाग सांगली जिल्ह्यात असून, काही फाटे सातारा जिल्ह्यात ईशान्य व पूर्व दिशेत पसरले आहेत. त्यांपैकी कोयना व मोरणा या नद्यांदरम्यानचा गुणवंतगड फाटा, मोरणा-कोळे (वांग) नद्यांच्या दरम्यानचा काहीर-किरपा फाटा आणि कोळे नदी-नांदगाव ओढा यांदरम्यानचा काळेगाव-जखीणवाडी फाटा हे तीन फाटे महत्त्वाचे आहेत.

सातारा जिल्ह्यात, विशेषतः वाई, जावळी आणि पाटण तालुक्यांत, मुख्य सह्याद्रीचे आणि शंभू महादेवाच्या डोंगरांचे माथे पूर्वेकडून पश्चिमेकडे ते क्रमाक्रमाने एकामागून एक असे उंच होत गेलेल्या पठारी मालिकांच्या पृष्ठभागावरील किल्ल्यांप्रमाणे दिसतात; कारण ते पृष्ठीय थर खडकाळ तटांमुळे तयार झालेले आहेत. पूर्वेकडून म्हणजेच दख्खनच्या पठारी प्रदेशाकडून सह्याद्रीची उंची फार वाटत नाही; परंतु कोकण भागाकडून सह्याद्रीचे उभे कडे ठळकपणे दिसून येतात. काही ठिकाणी या कड्यांचा उतार प्रपाती असून तेथे त्यांची खोली ९०० मी. पेक्षा अधिक आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांची उंची पूर्वेस कमी कमी होत गेलेली आहे. महादेव डोंगररांगेचाही उत्तरेकडील नीरा नदीकडील उतार तीव्र असून दक्षिणेकडील कृष्णा खोऱ्याकडील उतार त्यामानाने कमी आहे. सह्याद्रीच्या बहुतांश रांगा विदारित स्वरूपाच्या आहेत.

प्रतापगड

सातारा जिल्ह्यातील मुख्य सह्याद्री रांगेत व तिच्या फाट्यांवर अनेक टेकड्या व डोंगरी किल्ले आहेत. विशेषतः वाई, महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यातील डोंगराळ, दुर्गम व वनव्याप्त प्रदेश लक्षात घेऊन त्या परिसरात अनेक डोंगरी किल्ले उभारले आहेत. वाई व खंडाळा तालुक्यांत केंजळगड, येरूळी (वेरूळी), पांडवगड, मांढरदेव, बालेघर, धामणा, हरळी, कमळगड, पाचगणी, पिपली, सोनजाई, वागदरा, वंदन, वैराटगड, या महत्त्वाच्या टेकड्या आहेत. यांपैकी सोनजाई ही सर्वांत कमी उंचीची (१,००२ मी.), तर येरूळी ही सर्वाधिक उंचीची (१,३८१ मी.) टेकडी आहे. वाईपासून पश्चिमेस १६ किमी.वर कमळगड (१,३७५ मी.), वायव्येस १८ किमी.वर केंजळगड (१,३०१ मी.), उत्तरेस ५ किमी.वर पांडवगड (१,२७३ मी.) हे डोंगरी किल्ले आहेत. महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस ११ किमी.वर मकरंदगड (१,२३६ मी.), दक्षिणेस २६ किमी. सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर वासोटा (१,१७२ मी.), तर नैर्ऋत्येस १३ किमी.वर इतिहासप्रसिद्घ प्रतापगड (१,०८१ मी.) किल्ला आहे.

सातारा विभागातील प्रमुख टेकड्यांत अजिंक्यतारा, यवतेश्वर, सज्जनगड, पेटोवा, घाटाई, पाटेश्वर आणि शूळपाणी यांचा समावेश होतो. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशीच सातारा शहर आहे. पाटणच्या परिसरात चांदली, दातेगड, गुणवंतगड (मोरगिरी), भैरवगड व जंगली जयगड या प्रमुख पाच टेकड्या असून त्यांपैकी चांदली वगळता उर्वरित चार टेकड्यांवर तटबंदी आहे.

कराड परिसरात आगाशिव, पाल, सदाशिवगड व वसंतगड या चार टेकड्या आहेत. कराडच्या नैर्ऋत्येस सुमारे १० किमी.वर असलेल्या आगाशिव टेकडीचा माथा टोकदार असून तेथील खडकांत काही बौद्घ लेणी आहेत. पाल खेड्यापासून आग्नेयीस तीन किमी.वर पाल नावाची घुटाकार टेकडी आहे. कराडच्या पूर्वेस पाच किमी.वर छ. शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेला सदाशिवगड हा डोंगरीकिल्ला आहे. कराडच्या वायव्येस सहा किमी.वर वसंतगड आहे.

माण तालुक्यात वारुगड, खोकडा, शिखर-शिंगणापूर, ताथवडा (संतोषगड), जिरे-पठार, कुळकजाई आणि महिमानगड या प्रमुख टेकड्या आहेत. हे सर्व महादेव डोंगररांगेचे फाटे आहेत. त्यांपैकी वारुगड, ताथवडा व महिमानगड टेकड्यांवर गडाची तटबंदी आहे. दहिवडीच्या ईशान्येस २१ किमी.वर शिखर-शिंगणापूर टेकडी असून तिच्या मध्यावर शिंगणापूर खेडे व महादेवाचे मंदिर आहे. खटाव तालुक्यात सोलकनाथ, भापशाह, वर्धनगड आणि भूषणगड या चार टेकड्या आहेत. वडूजच्या पश्चिमेस २२ किमी.वर वर्धनगड आहे. या गडाची टेकडी महादेव श्रेणीचाच एक भाग असून तिचा माथा गोलाकार आहे. टेकडीच्या दक्षिणेकडून सातारा–पंढरपूर रस्ता जातो. वडूजच्या नैर्ऋत्येस १८ किमी. वर सपाट माथ्याचा, पण प्रपाती उताराचा खडकाळ भूषणगड किल्ला आहे.

सह्याद्रीत काही ठिकाणी खिंडी आणि पल्याण आढळतात. त्यातून घाटमार्ग काढलेले आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही घाट महत्त्वाचे ठरले आहेत. खंबाटकी (राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८), पसरणी (वाई–महाबळेश्वर), आंबेनळी व पारघाट (महाबळेश्वर–महाड), कुंभार्ली (कराड–पाटण–चिपळूण), हातलोट आणि वासोळ्याच्या दक्षिणेस असलेला उत्तर तिवरा घाट हे जिल्ह्यातील प्रमुख घाट आहेत.

जिल्ह्यातील जमिनीच्या प्रतवारीत प्रादेशिक भिन्नता आढळते. महाबळेश्वर तालुक्यात तसेच वाई, जावळी व पाटण तालुक्यांच्या पश्चिम भागात जांभी मृदा आढळते. डोंगर उतारावरील मृदेच्या थराची जाडी कमी आहे; परंतु पावसामुळे डोंगराळ भागातून वाहत आलेल्या वनस्पतीजन्य पालापाचोळ्यामुळे व गाळामुळे नैसर्गिक अथवा कृत्रिम रीत्या तयार केलेल्या खाचरांमध्ये सुपीक मृदा तयार झाल्या आहेत. कृष्णा, वेण्णा, कुडाळी, कोयना व केरा नद्यांच्या खोऱ्यांत गाळाच्या सततच्या संचयनामुळे जाड थर असलेल्या सुपीक मृदा आहेत. जिल्ह्याच्या मध्य भागात गाळाची तसेच बेसाल्ट खडकापासून तयार झालेली काळी मृदा आढळते. कृष्णा खोऱ्यातील मृदा ही दख्खनच्या पठारावरील विशेष सुपीक मृदा समजली जाते. त्यांपैकी सातारा व कराड तालुक्यांतील कृष्णा काठच्या जमिनी अत्यंत सुपीक आहेत. नीरा व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यातील मृदा चांगल्या प्रतीची आहे. खंडाळा, फलटण व खटाव तालुक्यांच्या डोंगरी परिसरातील मृदा हलकी व खडकाळ आहे. माण तालुक्यातील जमिनीची प्रत अत्यंत निकृष्ट आहे. ओढे, नाले यांच्या दरम्यान माळरानाचे पट्टे आढळतात.

नद्या : सह्याद्रीच्या मूळ रांगेपासून लहानलहान फाटे पूर्वेस किंवा आग्नेय दिशेस पसरलेले आहेत. त्यांना अनुसरून नद्यांची वेगवेगळी खोरी निर्माण झाली आहेत. सातारा जिल्हा हे

ठोसेघर धबधबा

प्रामुख्याने कृष्णा नदीचे जलवाहन क्षेत्र असून येथे कृष्णा, येरळा, माण (माणगंगा), नीरा ही प्रमुख चार नदीखोरी आहेत. क्षेत्र महाबळेश्वर येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या नद्यांचे उगम-झरे दाखविले आहेत. त्यांपैकी कृष्णा, वेण्णा व कोयना या सातारा जिल्ह्यातून वाहतात; तर गायत्री व सावित्री कोकणात वाहत जातात. सातारा जिल्ह्याकडे वाहत येणाऱ्या नद्या महाबळेश्वरपासून वेगवेगळ्या दिशांना वाहत जातात. कृष्णा ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. महाबळेश्वर येथील उगमानंतर वाई, सातारा, कोरेगाव व कराड या तालुक्यांतून, जिल्ह्याच्या साधारण मध्य भागातून सुमारे १६० किमी. अंतर वाहत जाऊन ती सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. वाई व कराड ही नगरे या नदीच्या काठावर आहेत. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्राव्यतिरिक्त कुडाळी, वेण्णा, उरमोडी, तारळी व कोयना या उजवीकडील आणि वसना व येरळा या डावीकडील उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रांचा कृष्णा नदीच्या बृहत् पाणलोट क्षेत्रात समावेश होतो. कुडाळी ही कृष्णेची एक लहानशी उपनदी जावळी व वाई तालुक्यांतून वाहते. महाबळेश्वर येथेच उगम पावणारी वेण्णा नदी साताऱ्याजवळील माहुली येथे कृष्णा नदीला मिळते. जावळी व सातारा तालुक्यांतून वाहणारी उरमोडी नदी वेणेगाव येथे कृष्णेला मिळते. पाटण व कराड तालुक्यांतून वाहणारी तारळी नदी उंब्रजजवळ कृष्णेला मिळते.

कोयना ही कृष्णेची जिल्ह्यातील सर्वांत मोठी उपनदी आहे. महाबळेश्वर येथील उगमानंतर जावळी व पाटण तालुक्यांतून दक्षिणेस हेळवाकपर्यंत ती वाहत जाते. त्यानंतर ती पूर्ववाहिनी होते व कराड शहराजवळ कृष्णेला मिळते. हे संगमस्थान प्रीतिसंगम म्हणून प्रसिद्घ आहे. सातारा जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरून वाहणारी नीरा नदी पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांत उगम पावते. खंडाळा व फलटण तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे ती सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. माण (माणगंगा) ही भीमा नदीची उपनदी माण तालुक्याच्या वायव्य भागात उगम पावून आग्नेय दिशेस वाहत जाते व पुढे सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. म्हस्कोबाच्या डोंगराळ भागात उगम पावणारी येरळा नदी कोरेगाव व खटाव या तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे सांगली जिल्ह्यात प्रवेश करते.

हवामान : जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने तेथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. याच भागात महाबळेश्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे आहेत. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १३५ सेंमी. असून जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. पावसाचे वितरण बरेच असमान आहे. महाबळेश्वर येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे ६२५ सेंमी. असून खटाव, माण यांसारख्या पूर्वेकडील पर्जनछायेच्या प्रदेशात येणाऱ्या तालुक्यांत ते सुमारे ६० सेंमी.पेक्षाही कमी आहे. पश्चिमेकडील महाबळेश्वर, जावळी व पाटण हे तालुके अधिक पावसाचे आहेत.

वनस्पती व प्राणी : सातारा जिल्ह्यातील १,५२४ चौ. किमी. क्षेत्र वनांखाली असून त्यांपैकी १,३६९ चौ. किमी. राखीव, ४८ चौ. किमी. संरक्षित व १०७ चौ. किमी. क्षेत्र अवर्गीकृत वनांखाली आहे. महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यांत तसेच वाई तालुक्याच्या पश्चिम भागात वनांखालील क्षेत्र अधिक आहे. सह्याद्रीच्या उतारावर सदाहरित वने, तर सह्याद्रीच्या पायथ्याशी मिश्रवने आहेत. कोयना खोऱ्यात व जावळी तालुक्यात सुमारे ४२४ चौ. किमी. क्षेत्रावर कोयना अभयारण्य आहे. या अभयारण्यात व एकूणच जिल्ह्यातील दाट वनांमध्ये बिबळ्या, गवा, रानडुकरे, अस्वल, सांबर इत्यादी प्राणी आहेत. मायणी तलावाच्या परिसरात पक्ष्यांसाठी राखीव असलेले अभयारण्य विकसित करण्यात आले आहे.

कोयना नदीचे खोरे व कोयना धरणाचा परिसर, कोयना अभयारण्य, महाबळेश्वर, पाचगणी व पाटण परिसरात असलेली वनसंपदा व प्राणिसंपदा त्याच्या माध्यमातून आकारास आलेला व्याघ प्रकल्प, कास पठार, बामणोली, तापोळा परिसर आणि त्या भागात आढळणाऱ्या औषधी वनस्पती या सर्व सातारा जिल्ह्याच्या वैभवाच्या बाबी आहेत. जगभरातील जैवविविधता असलेल्या स्थळांना मानवाकडून धोका आहे. त्यात पश्चिम घाटातील विविध स्थळांबरोबरच सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीचाही समावेश होतो. येथील धोक्यात येत असलेली पर्यावरणीय परिसंस्था जपणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील जैवविविधतेने नटलेला हा भाग पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील परिसर (इको सेन्सेटिव्ह झोन) होणे ही काळाची गरज आहे. सातारा, जावळी व पाटण या तालुक्यांतील कोयना नदी व कोयना धरण परिसरातील संरक्षित वनक्षेत्र कोयना अभयारण्य म्हणून १९८५ मध्ये घोषित झाले आहे.

कास पठार

पश्चिम घाटातील विविध स्थळांचा ‘जागतिक वारसा स्थळांत’ (वर्ल्ड हेरिटेज साइट) समावेश होण्यासाठी भारताच्या केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने याबाबतचा प्रस्ताव ‘दि युनायटेड नेशन्स एज्युकेशनल ॲन्ड कल्चरल ऑर्गनायझेशन’ला (युनेस्को) पाठविला होता. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोच्या तज्ज्ञ सदस्यांनी पश्चिम घाटातील विविध ३५ स्थळांना भेटी दिल्या होत्या. याचाच एक भाग म्हणून युनेस्कोने सातारा जिल्ह्यातील पुष्प पठार म्हणून नावलौकिक मिळालेल्या कास पठाराचा २०१२ मध्ये जागतिक वारसा स्थळांत समावेश केला आहे. युनेस्कोच्या मंजुरीमुळे सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात विस्तारलेल्या चांदोली अभयारण्यास २००४ मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे. कोयना अभयारण्यात व चांदोली राष्ट्रीय उद्यानात गेली अनेक वर्षे वाघांचे अस्तित्व आहे. पश्चिम घाटाच्या छायेखालील कोयना अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसर एकत्र करून स्वतंत्र ‘सह्याद्री वाघ्र प्रकल्प’ म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य, कास पठार, चांदोली राष्ट्रीय उद्यान या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण औषधी व दुर्मीळ वनस्पती, जंगली व सरपटणारे प्राणी, कीटक आदींचे अधिक शास्त्रीय पद्धतीने संरक्षण-संवर्धन करणे शक्य होणार आहे. नैसर्गिक वारसा जपण्याबरोबरच जागतिक पर्यटकांचे लक्ष वेधल्याने निसर्गपूरक पर्यटनास चालना मिळू शकेल.

आर्थिक स्थिती : कृषी : जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रापैकी १३% क्षेत्र वनांखाली, ६.९९% चराऊ कुरणांखाली, २.६१% बिगर शेतीसाठी, ४% क्षेत्र लागवडीलायक, मात्र पडीक जमिनीचे आहे. जिल्ह्यातील सुमारे ५७% खातेदार एक हेक्टरपेक्षा कमी जमिनीचे क्षेत्र असणारे होते (१९९८-९९). सातारा जिल्हा कृषिप्रधान असून येथे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांतील पिके घेतली जातात. बाजरी, तांदूळ, भुईमूग, घेवडा ही जिल्ह्यातील प्रमुख खरीप पिके असून, गहू व हरभरा ही रब्बी पिके आहेत. ज्वारीचे पीक दोन्ही हंगामांत घेतले जाते. कराड, खटाव, सातारा व पाटण या तालुक्यांत खरीप संकरित ज्वारीचे, तर फलटण, सातारा, वाई, कोरेगाव व खंडाळा या तालुक्यांत रब्बी ज्वारीचे पीक अधिक प्रमाणात घेतले जाते. पाटण, कराड, जावळी, महाबळेश्वर हे तालुके तांदळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्घ आहेत. माण, खटाव, खंडाळा, फलटण व कोरेगाव तालुक्यांतील कमी पावसाच्या पदेशांत बाजरीचे पीक घेतले जाते. फलटण, खटाव व जावळी हे तालुके गव्हाच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहेत. सातारा, कराड, पाटण, जावळी, वाई व कोरेगाव या तालुक्यांमध्ये भुईमूग अधिक प्रमाणात पिकविला जातो. हरभऱ्याचे उत्पादन सर्वच तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात घेतले जाते. फलटण तालुक्यात द्राक्षे व डाळिंबाच्या बागा आहेत. कराड तालुक्यात थोड्या फार प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. कोरेगाव व खटाव हे तालुके बटाट्याच्या आणि माण, फलटण व खंडाळा हे तालुके कांद्याच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहेत. कृष्णाकाठची वांगी प्रसिद्घ आहेत. ऊस हे प्रमुख नगदी पीक आहे. हळद, आले ही पिकेही येथे घेतली जातात. पाचगणी, महाबळेश्वर व वाईचा परिसर स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी विख्यात आहे. खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्र (स्थापना १९३२), महाबळेश्वर येथील गहू गेरवा संशोधन केंद्र (१९४०), कराड येथील एकदल व गळितांच्या पिकांच्या जातीवर संशोधन करणारे केंद्र (१९४८), रहिमतपूर येथील आले संशोधन केंद्र ही जिल्ह्यातील प्रमुख कृषिशिक्षण व संशोधन केंद्रे आहेत.

जिल्ह्यात जलसिंचन विकासासाठी कृष्णा खोरे विकास मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत धोम, कण्हेर यांसारखे मोठे प्रकल्प पूर्ण झाले. कृष्णा नदीवरील धोम

कोयना धरण

येथील धोम धरण (१९७७),  वेण्णा नदीवरील कण्हेर धरण, नीरा नदीवरील वीर धरण (१९६५), पाटण तालुक्यात कोयना नदीवरील कोयना धरण ही जिल्ह्यातील प्रमुख धरणे आहेत. कोयना जलविद्युतनिर्मिती प्रकल्प हा राज्यातील सर्वांत मोठा प्रकल्प आहे. याशिवाय कराड तालुक्यातील टेंभू उपसा सिंचन प्रकल्प, येवती येथील येवती म्हासोळी प्रकल्प, खोडशी येथील कृष्णा कालवा; पाटण तालुक्यातील तारळी नदीवरील तारळी बंधारा, आंबेघर येथील मोरणा प्रकल्प, मानेवाडी येथील उत्तरमांड प्रकल्प, डांगिष्टेवाडी येथील तारळी प्रकल्प, मराठवाडी येथील वांग प्रकल्प, सातारा तालुक्यात परळी येथील उरमोडी प्रकल्प, खटाव तालुक्यात येरळा नदीवरील नेर तलाव, बनपुरी येथील येराळवाडी धरण; माण तालुक्यात वाघेरी नाल्यावरील राणंद तलाव, बोडके येथील आंधळी प्रकल्प, माणगंगा नदीवरील म्हसवड तलाव; जावळी तालुक्यात हातगेघर येथील हातगेघर प्रकल्प, महू येथील महू प्रकल्प; वाई तालुक्यात नागेवाडी येथील नागेवाडी प्रकल्प, कृष्णा नदीवरील बलकवडी येथील धोम-बलकवडी धरण; कोरेगाव तालुक्यातील आरफळ कालवा प्रकल्प इत्यादी प्रकल्प जलसिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहेत.

मेंढीपालन हा माण, खटाव, फलटण आणि खंडाळा या कमी पावसाच्या तालुक्यातील एक प्रमुख कृषिपूरक व्यवसाय आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसायास महत्त्व प्राप्त झाले आहे. दुधाच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून संकरित गाई पाळल्या जातात. कराड, सातारा, फलटण, कोरेगाव व वाई या तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकरित गाई पाळण्याच्या व्यवसायाकडे वळले आहेत. संकलनासाठी दुग्धव्यवसाय सहकारी संस्था स्थापन केल्या आहेत.

उद्योग : औद्योगिक विकासाच्या दृष्टीने जिल्ह्याची वाटचाल चालू आहे. वाई, सातारा, कराड, खंडाळा, फलटण येथे औद्योगिक वसाहती आहेत. सातारा तालुक्यात सातारा रोड येथे कूपर कंपनीचा डीझेल एंजिन निर्मितीचा देशातील पहिला कारखाना असून याच तालुक्यात जरंडेश्वर येथे भारत फोर्ज कंपनीचा लोखंडी सामग्री निर्मितीचा कारखाना आहे. युनिव्हर्सल लगेज या कंपनीचा बॅगा बनविण्याचा उद्योगही सातारा येथे आहे. कराड येथे किर्लोस्कर बदर्सचा हेमेटिक सील्ड कॉम्प्रेसर हाइड्रोलिक प्रॉडक्ट कारखाना आहे.

पाटण तालुक्यात दौलतनगर, कराड तालुक्यात रेठरे बुद्रुक (शिवनगर), यशवंतनगर व शेवाळेवाडी येथे;  वाई तालुक्यात किसन वीर नगर (जांब), खंडाळा तालुक्यातील म्हावशी, फलटण तालुक्यात फलटण येथे, सातारा तालुक्यात शेंद्रे (शाहूनगर), जावळी तालुक्यात कुडाळजवळ असे जिल्ह्यात सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने आहेत. याशिवाय फलटण तालुक्यात साखरवाडी व कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर येथे खाजगी क्षेत्रातील साखर कारखाने आहेत. खटाव, माण व फलटण तालुक्यांमध्ये घोंगड्या विणण्याचा उद्योग प्रस्थापित असून कोरेगाव तालुक्यात तेल गाळण्याचा उद्योग चालतो. महाबळेश्वर येथे मधुक्षिका पालन उद्योग महत्त्वाचा आहे. जावळी व पाटण तालुक्यांच्या परिसरात थोड्या प्रमाणात लोह खनिजाचे साठे आहेत. इमारतीचा दगड, चुनखडी व विटेसाठी उपयुक्त माती ही अन्य खनिजे जिल्ह्यात उपलब्ध आहेत. यांव्यतिरिक्त इतर महत्त्वाची खनिज संपत्ती जिल्ह्यात नाही. सातारा जिल्ह्यातील वनकुसवडे पठारावर महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा) तर्फे उभारलेला पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प हा राज्यातील सर्वांत मोठ्या पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पांपैकी एक आहे. जिल्ह्यात इतरत्रही पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या जिल्ह्यातून जातो. शिरवळ, खंडाळा, सुरूर, पाचवड, सातारा, उंब्रज व कराड ही या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे आहेत. या महामार्गाची जिल्ह्यातील लांबी १३१ किमी. आहे. याशिवाय सर्व तालुका ठिकाणे तालुक्यातील सर्व खेड्यांशी रस्त्याने जोडली आहेत. कोल्हापूर–मुंबई हा दक्षिण मध्य रेल्वेचा १२४ किमी. लांबीचा रुंदमापी लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. लोणंद, वाठार, सातारा (माहुली), कोरेगाव, रहिमतपूर, मसूर, कराड ही या लोहमार्गावरील प्रमुख स्थानके आहेत. भ्रमणध्वनीचा प्रसार व लोकप्रियता अधिक वेगाने वाढल्याचे आढळते.

लोक व समाजजीवन : सातारा जिल्ह्याची २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या ३०,०३,९२२ असून त्यांपैकी १५,१२,५२४ पुरुष व १४,९१,३९८ स्त्रिया होत्या. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स २८७ व्यक्ती इतकी आहे. दर चौ. किमी.स ५०९ ही सर्वाधिक घनता कराड तालुक्यात, तर दर चौ. किमी.स १३९ ही सर्वांत कमी घनता माण तालुक्यात आहे. एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ८१% लोक ग्रामीण भागात व केवळ १९% नागरी भागात राहतात. जिल्ह्यात एकूण १,७३९ खेडी व १५ नगरे आहेत. एकूण खेड्यांपैकी १८ खेडी ओसाड आहेत. दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९८६ आहे. चरितार्थासाठी अन्यत्र काम करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण बरेच असल्यामुळे या जिल्ह्यातील स्त्री-पुरुष गुणोत्तर जास्त आहे.

सैनिक स्कूल

केंद्रशासनाचे अर्थसाहाय्य उपलब्ध असणारी एकात्मिक ग्रामीण विकास योजना जिल्ह्यातील सर्व म्हणजे ११ पंचायत समित्यांमध्ये कार्यान्वित आहे. अवर्षणप्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम खटाव, खंडाळा, कोरेगाव व माण या तालुक्यांना लागू आहे. पश्चिम घाट विकास ही केंद्र पुरस्कृत योजना सातारा, वाई, महाबळेश्वर, जावळी, पाटण, कोरेगाव, खंडाळा व खटाव या तालुक्यांना लागू आहे. या योजनेअंतर्गत वनीकरण, मृद्संधारण, लघुपाटबंधारे, रस्त्यांचा, फळबागांचा विकास, सामाजिक वनीकरण, पशुसंवर्धन, मधुक्षिकापालन व रेशीम उत्पादन विकास या योजना राबविल्या जातात. याशिवाय विशेष घटक योजना, जवाहर रोजगार योजना, स्थानिक विकास कार्यक्रम, जलशिवार इत्यादी योजना जिल्ह्यात राबविल्या जात आहेत.

सातारा येथील ‘सैनिक स्कूल’ (स्थापना १९६१) हे भारतातील सर्वांत जुन्या सैनिकी शाळांपैकी एक आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ मध्ये स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय आजही सातारा येथे आहे.

महत्त्वाची स्थळे : सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची स्थळे आहेत. सातारा शहर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. या ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरालगत ‘अजिंक्यतारा’ हा किल्ला आहे. सातारा शहरापासून पाच किमी. कोरेगाव रस्त्यावर कृष्णा-वेण्णा यांचे संगमस्थान असलेले संगम माहुली हे ठिकाण पेशवाईतील प्रसिद्घ न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्घ आहे. सातारा शहरापासून ११ किमी. सातारा–सोलापूर रस्त्यावरील त्रिपुटी येथील संत गोपालनाथ महाराजांचे समाधी मंदिर, धावडशी येथील बह्मेंद्रस्वामींची समाधी व भार्गव राममंदिर, सज्जनगड येथील समर्थ रामदास स्वामींची समाधी इत्यादी प्रसिद्घ ठिकाणे आहेत. यांशिवाय अलीकडच्या काळात पर्यटकांचे आकर्षण बनलेले कास पठार, कास तलाव (१,०६६ मी.) आहे. १८४४ मध्ये येथील कास तलाव बांधण्यात आला असून सातारा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा हा प्रमुख स्रोत आहे. सातारा शहरापासून पाच किमी. अंतरावर, कास मार्गावर असलेले यवतेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर प्रसिद्घ आहे. शहरापासून ३६ किमी.वर असलेला ठोसेघर येथील धबधबा व परिसरातील सृष्टिसौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. येथेच १०० चौ.किमी. विस्ताराचे तसेच सस.पासून ९१४ मी. पेक्षा अधिक उंचीवरील चाळकेवाडी पठार आहे. पवन ऊर्जानिर्मितीच्या दृष्टीने हे आदर्श पठार असल्याने अनेक पवनचक्क्या येथे उभारल्या आहेत.

सातारा–पंढरपूर रस्त्यावर गोंदवले, पुसेगाव, म्हसवड, शिंगणापूर ही धार्मिक ठिकाणे आहेत. म्हसवड येथे बाराव्या शतकातील प्रसिद्घ सिद्घनाथ मंदिर असून याशिवाय येथील घोंगड्यांचा व्यापार व गुरांचा बाजार प्रसिद्ध आहे. माण तालुक्यातील शिखर-शिंगणापूर येथे प्राचीन शिवमंदिर असून हे एक जागृत देवस्थान मानले जाते. खटाव तालुक्यात औंध हे ऐतिहासिक ठिकाण आहे. पूर्वीच्या औंध संस्थानची ही राजधानी होती. येथील यमाई देवीचे मंदिर आणि वस्तुसंग्रहालय विशेष प्रसिद्घ आहे. वडूजजवळील प्रसिद्ध मायणी पक्षी अभयारण्य हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. पाटण तालुक्यातील चाफळ येथील संगमरवरात बांधलेले श्रीराम मंदिर म्हणजे वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. याच तालुक्यातील कोयना धरण परिसर हे पर्यटकांचे आकर्षण आहे. कराड येथील कृष्णा-कोयना यांच्या प्रितीसंगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची समाधी व परिसर हे लोकांचे एक प्रेरणास्थान बनले आहे. कराडजवळ असलेल्या आगाशिव डोंगरात बौद्घकालीन लेणी आहेत. पुणे– बंगलोर महामार्गावरील काशीळपासून पश्चिमेस ५.६ किमी. अंतरावर पाल हे खंडोबाचे जागृत देवस्थान आहे. फलटण येथील श्रीराम मंदिर तसेच यादवकालीन मंदिरांचे अवशेष व महानुभाव पंथीयांची मंदिरे प्रसिद्घ आहेत. सातारा शहराच्या ईशान्येस २१ किमी. सातारा-फलटण मार्गावरील देऊर येथील अकराव्या शतकातील विठ्ठल-रुक्मिणीचे हेमाडपंती मंदिर उल्लेखनीय आहे.

कृष्णा नदीच्या काठावर वसलेले वाई हे शहर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. येथे शंभरावर असलेली मंदिरे, विशेषत: महागणपती मंदिर, नदीकाठावरील सुंदर घाट ही पर्यटकांची

ढोल्या गणपती मंदिर

प्रमुख आकर्षणे आहेत.  महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे संपादकीय कार्यालय व केवलानंदांचे स्मारक येथे आहे. वाईच्या जवळच असलेल्या मेणवली येथील नाना फडणीसांचा वाडा, भोगाव येथील वामनपंडितांची समाधी, धोम येथील नृसिंह आणि शिवमंदिर तसेच कृष्णा नदीवरील धोम धरण इत्यादी ठिकाणे प्रसिद्घ आहेत. वाईपासून उत्तरेस २० किमी., सस. पासून १,३७५ मी. उंचीवरील मांढरदेव येथील काळूबाईचे मंदिर प्रसिद्घ आहे. येथे दरवर्षी भरणाऱ्या जत्रेला भाविकांची प्रचंड गर्दी होते. वाईपासून १३ किमी.वर पाचगणी व ३२ किमी.वर महाबळेश्वर ही जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे आहेत. पाचगणी येथील इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमुळे हे एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले आहे. महाबळेश्वरपासून २५ किमी.वर कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या शिरोभागी असलेले तापोळा हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे बनले आहे. महाबळेश्वरवरून घाटमार्गे कोकणात पोलादपूरला जाण्याच्या मार्गावर प्रतापगड किल्ला आहे. याच गडावर शिवरायांनी अफझलखानाचा वध केला. गडावर भवानीमातेचे मंदिर तसेच अफझलखानाची कबर आहे.

समीक्षक : माधव चौंडे