मुरोमाची कालखंड : जपानमधील राजकारण, साहित्य आणि धर्म यांचा प्रभाव असणारा कालखंड (१३३३ ते १५७३). इ.स.१३३६ ते १५७३ या काळामध्ये बर्‍याच घटना घडल्या. आशिकागा ताकाउजिने कामाकुरा जमीनदारशाहीचा अंत केला. तसेच गोदाइगो ह्या सम्राटावर पण वर्चस्व स्थापन केले. आशिकागा ताकाउजि ह्या श्योगुन (सरसेनापती) ने क्योतो जवळ मुरोमाची या ठिकाणी आपली राजधानी वसवली. ह्या राजधानीच्या ठिकाणामुळे हा कालखंड मुरोमाची या नावाने ओळखला जातो. मुरोमाची कालखंड राजकीय अस्थिरता, सामाजिक बदल, सांस्कृतिक विकास आणि शिंतो धर्माचे पुंनरुज्जीवन यासाठी ओळखला जातो. नानबोकुचो (उत्तर आणि दक्षिण दरबारची कुरबुर), गेकोकुज्यो (कनिष्ठांकडून वरिष्ठांची उचलबांगडी), ओनिन नो रान (१४६७-१४७७,वारसाहक्का साठीची लढाई) आणि सेनगोकु (अंतर्गत लढायांचा काळ,१४६५ ते १५७३ ) यामुळे जपानमध्ये जवळजवळ २४० वर्षे राजकीय अस्थिरता होती. नारा कालखंडापासून जपानमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झालेला दिसून येतो. बौद्ध धर्माला राजकीय आश्रय पण मिळाला असल्याने मुळातला जपानचा धर्म शिंतो हा थोडा विस्मरणात गेला होता. परंतु मंगोल हल्ल्याच्या वेळी आलेल्या वार्‍यां (कामिकाझे) मुळे जपानचा पराभव टळला. हे वारे दैवी होते त्यामुळेच जपान हा हल्ला परतवू शकला असे मानले गेले. पूर्वापार चालत आलेल्या धर्मामध्ये निसर्गाला खूप महत्व दिले जात होते. पाणी, पर्वत, वारा, पाऊस ह्यांना देव मानले जात होते. कामिकाझे मुळे परत शिंतो धर्मातल्या विचारांचा पुनरुच्चार झाला. मुरोमाची कालखंडामध्ये आर्थिक उलाढाल्या वाढल्या. वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जाऊ लागली. फक्त स्वतःपुरती नव्हे तर विकण्यासाठी म्हणून पण ही पिके घेतली जात. विविध वस्तु बनवल्या जाऊ लागल्या. पैशाच्या मोबदल्यात वस्तू दिल्या घेतल्या जाऊ लागल्या. तयार केलेल्या वस्तू व माल बाजारपर्यंत पोचवण्यासाठी रस्ते बांधले गेले. चांगले रस्ते झाल्यामुळे प्रवास करणार्‍या लोकांची संख्या वाढली. ह्या प्रवासी लोकांमध्ये मुख्यत: बौद्ध भिक्षू दिसून येतात.

या काळामध्ये प्रवासवर्णने लिहिली गेली. जरी ही प्रवास वर्णने असली तरी त्यांना रोजनिशीचा एक भाग म्हणूनच बघितले जात होते. फुजिकी, काइदोकी ही प्रसिद्ध प्रवासवर्णने आहेत. कामाकुरा कालखंडापासून राजदरबाराचे महत्त्व हळूहळू कमी होऊ लागले. नारा कालखंड तसेच हेइआन कालखंड यामध्ये सम्राट आणि राजदरबार यांना खूप महत्त्व होते. त्यामुळे त्याकाळातील साहित्यावर पण त्यांचा ठसा उमटलेला दिसून येतो. कामाकुरा कालखंडा पासून सामुराई या जपानी योद्धावर्गाचा प्रभाव साहित्यावर जाणवू लागला. मुरोमाची कालखंडाच्या साहित्यविश्वात समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचा सहभाग जाणवतो. साहित्य विश्वाच्या केंद्रस्थानी असलेले राजदरबारी साहित्याचे रंग फिके होत गेलेले आढळतात. उच्चभ्रू आणि लोकप्रिय घटकांचा झालेला संगम हे मुरोमाची कालखंडाच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. सम्राटाच्या आज्ञेवरून संकलित केलेले काव्य हा प्रकार संपून लोकांमध्ये साखळी काव्य रेनगा, नोह रंगभूमी यांचा विकास झालेला दिसतो. राजदरबारात मान्यता मिळवण्यासाठी काव्य करणे हा भाग मागे पडला. संमेलनामध्ये जमल्यावर लोक जमून काव्य करू लागले. एकाच कवीने केलेली कविता असे स्वरूप न रहाता एकापुढे एक अशी वेगवेगळ्या कवींनी लिहिलेली कडवी असा साखळी काव्याचा उगम झाला. अशी साखळी काव्ये लिहिली गेली त्याच बरोबर काव्य संमेलन, अनौपचारिक सभांमध्ये गायली गेली. आधीच्या कालखंडामध्ये जरी साखळी काव्याचे अस्तित्व असले तरी मुरोमाची कालखंड हा साखळी काव्यांचे सुवर्ण युग मानला जातो. त्याच बरोबर नोह ह्या संगीत नाटकाची निर्मिती पण याच काळात झाली.

नोह या जपानी शब्दाचा अर्थ कौशल्य आणि गुणवत्ता असा होतो. नोह हा जपानी नाटकांचा सर्वात जुना प्रकार आहे. शिंतो मठ आणि देवळांमध्ये त्यांचे प्रयोग होत असत. त्यांचे विषय मुख्यत्वे करून धार्मिक असत. कामाकुरा कालखंडामध्ये बौद्ध धर्म हा फक्त सम्राट अथवा उच्चकुलीन लोकांचा होता तसे न रहाता मुरोमाची कालखंडात तो सर्वसामान्य लोकांचा झालेला दिसतो. त्यामुळे बौद्ध भिक्षूनी सामान्य माणसांसाठी नीतीपर उपदेश असलेल्या कथा लिहिल्या. मुरोमाची कालखंडामध्ये अश्या कथांची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली. या कथांना सेत्सुवा म्हणतात. ह्या सेत्सुवा मध्ये धार्मिक तसेच दंतकथा, लोककथा यांच्यावर आधारीत कथा आहेत. सेत्सुवा पासून १४ व्या शतकानंतर ओतोगीझोशी ह्या साहित्य प्रकारची निर्मिती झाली. ह्या प्रकारामध्ये परिकथा, देशविदेशातील कथा, लोककथा यांचा समावेश होतो. राजदरबारातील कवी आणि उच्चकुलीन सरदारांनी लिहिलेले साहित्य ते सर्वसामान्यासाठीचे साहित्य असा खूप मोठा प्रवास नारा कालखंडापासून मुरोमाची कालखंडापर्यंत झालेला दिसतो. आजच्या जपानचे दैनंदिन जीवनातील खाद्य पदार्थ, घरात वापरले जाणारे श्योजी (सरकवता येणारे पार्टिशन /room divider) यांचे मूळ मुरोमाची कालखंडात दिसून येते. बदलती राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थितीचे प्रतिसाद या काळातील साहित्यात दिसून येतात. मुरोमाची कालखंडानंतर मात्र बर्‍याच काळापर्यंत  मोठ्या प्रमाणात साहित्यनिर्मिती झाल्याचे आढळत नाही. इ.स.१५६८ ते १६०० चा काळ हा किल्ले, पेंटिंग ह्यांचा काळ म्हणून ओळखला जातो. किल्ल्यांच्या ठिकाणावरून ह्या काळाचे नाव आझुची मोमोयामा कालखंड असे पडले आहे.

संदर्भ :

  • बेडेकर, निसीम, कल्चर शॉक जपान, राजहंस प्रकाशन, पुणे, २०१५.
  • https://www.britannica.com

समीक्षण : निस्सीम बेडेकर