कथकळी नृत्यातील एक मुद्रा

भारतातल्या केरळ राज्यामधील एक अभिजात नृत्यप्रकार. केरळमधील नृत्यनाट्याची परंपरा फार जुनी आहे. मुटियाट्टम्‌ व कूटियाट्टम्‌ ही केरळची पुरातन नृत्यनाट्ये होत. त्यांतील पात्रे स्वतः गाऊन व बोलून अभिनय करीत. त्यानंतरचे चाक्यार कूत्तू हे नृत्य अधिक प्रगत होते. या परंपरेस अनुसरून १६५७ मध्ये कालिकतचा (कोझीकोडे) राजा झामोरीन याने कृष्णाच्या जीवनावर आधारित असे नृत्यनाट्य तयार केले, त्याला कृष्णनाट्टम्‌ म्हणत. कृष्णनाट्टम्‌ फक्त गुरुवायूर (नवनीतगोपाळ) मंदिरात होत असे. कोट्टारक्करा देशाचा राजा त्याने प्रभावित झाला. तो स्वतःही उत्तम नट होता. त्याने आपल्या राज्यातून दोन ब्राह्मण बोलविले आणि त्यांच्या मदतीने एक नवीन नृत्यनाट्य तयार केले ते रामनाट्टम्‌ नृत्य होय. पूर्वी मुखवटे वापरण्यात येत त्यांऐवजी या नृत्यात रंगभूषेचा वापर करण्यात येऊ लागला. ज्या हस्तमुद्रा होत्या, त्या अधिक अर्थपूर्ण आणि विकसित करण्यात आल्या. वाद्यवृंदामध्ये बदल झाले. तेव्हापासून या नृत्यप्रकारात पात्रांनी स्वतः गाणे व संवाद म्हणणे बंद झाले. वाद्यवृंदामध्ये दोन स्वतंत्र गायकांचा समावेश करण्यात आला. या नव्या बदलांमुळे नृत्यप्रयोगाची गती व उत्कटता वाढली. या नृत्यनाट्यात प्रभू रामचंद्राच्या जीवनावरील कथा नृत्यांकित केलेल्या असत. कृष्णनाट्टम्, रामनाट्टम्‌ व त्याबरोबरच अष्टपदिअट्टम् या नृत्यनाट्यांतून आज प्रचलित असलेले कथकळी नृत्य निर्माण झाले. अष्टपदिअष्टम् हे कवी जयदेवलिखित गीतगोविंद या महाकाव्यावर आधारित नृत्यनाट्य आहे. काळाच्या ओघाबरोबर या नृत्यनाट्यांनी नवनवी रूपे धारण केली व त्यातूनच सध्या प्रचलित असलेल्या कथकळीचा उदय झाला. यामध्ये आकर्षक रंगसंगती असलेली वेशभूषा व रंगभूषा, वैशिष्ट्यपूर्ण अलंकार, चेहऱ्यावरील परिणामकारक हावभाव व लयबद्ध हालचालींनी युक्त असलेले नृत्य यांचा समावेश होतो.

कथकळी नृत्याचे प्रशिक्षण : आता भारतभर कथकळी नृत्याचे प्रशिक्षण दिले जाते; परंतु केरळमधील कलामंडलम् ही संस्था सर्वांत जुनी आहे. १९३० साली जेव्हा या नृत्याला उतरती कळा लागली होती, तेव्हा या नृत्यकलेला पुनरुज्जीवन देण्यासाठी प्रसिद्ध मल्याळी कवी वळ्ळत्तोळ नारायणन मेनन यांनी ‘केरळ कलामंडलम्’ या संस्थेची स्थापना केली. सध्या ही संस्था शासनातर्फे चालविण्यात येत आहे.

केरळ कलामंडलम्

या संस्थेमध्ये कथकळीचे शास्त्रोक्त शिक्षण दिले जाते. यासाठीचा अभ्यासक्रम कठीण आहे. वयाच्या १२-१३ व्या वर्षी या अभ्यासक्रमाला सुरुवात होते. प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याला प्राविण्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावे लागते. तरच विद्यार्थी पुढील वर्षामध्ये प्रवेश करू शकतात. पावसाळा सुरू झाला, की त्यांच्या अभ्यासक्रमाला सुरुवात होते. दररोज पहाटे लवकर डोळ्यांचे व्यायाम व शारीरिक व्यायाम घेतले जातात. यानंतर विद्यार्थ्यांचा शारीरिक लवचिकपणा व तंदुरुस्ती वृद्धिंगत होण्याकरता त्यांना औषधी तेलाने मालीश केले जाते. सकाळपासून मध्यान्हीपर्यंत नृत्यनाट्याचा सराव केला जातो. या सरावामध्ये आंगिक अभिनयाबरोबरच वाचिक, आहार्य व सात्विक अभिनयाचीही चोख तालीम घेतली जाते. आंगिक अभिनयामध्ये अंग, उपांग व प्रत्यांगाचा सांगोपांग विचार केला जातो. त्यासाठी विद्यार्थ्यांना तसे शिक्षण दिले जाते. संध्याकाळच्या वेळेत वेशभूषा, रंगभूषा यांचा अभ्यास केला जातो. पावसाळ्यानंतर दिवसाचे वेळापत्रक शिथील केले जाते व त्यावेळेचा सदुपयोग मलयाळम्, संस्कृत व इतर भाषेतील साहित्याचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. याबरोबरच विद्यार्थ्यांचा आहारविहारही कटाक्षाने पाळला जातो. नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात कार्यक्रमांचा सराव, रंगीत तालीम मोठ्या रंगमंचावर केल्या जातात. जानेवारी व फेब्रुवारी हे महिने कार्यक्रमांचे असतात. अशाप्रकारे ६ वर्षांमध्ये विद्यार्थी पदविकेचा अभ्यासक्रम पूर्ण करतात. शारीरिक व अभिनय क्षमता या दोन्हीमध्ये पारंगत असलेल्या नर्तकालाच रंगमंचावर प्रस्तुती करण्याची परवानगी मिळते. जेव्हा कथकळी नर्तक पदविका उत्तीर्ण होतात, तेव्हा त्यांना त्यांच्या नावापूर्वी ‘कलामंडलम्’ ही उपाधी लावण्याची मान्यता मिळते. जी कथकळी कलाकारासाठी अभिमानास्पद बाब आहे.

कथकळीतील सात्त्विक भूमिकेची ‘पच्चा’ (हिरवी) रंगभूषा.

पात्रांची रंगभूषा : कथकळीच्या रंगभूषेमध्ये सफेद (वेळ्‌ळा), पिवळा (मंञा), हिरवा (पच्चा), निळा (नीला), काळा (करुप्प), लाल (चुवप्प) हे सहा रंग वापरतात. सफेद रंग तयार करण्यासाठी ४ ते ६ तास पाण्यात भिजविलेले तांदूळ गंधाप्रमाणे बारीक वाटतात व सायंकाळी रंगभूषेच्या वेळी त्यात ठराविक प्रमाणात खाण्याचा चुना पाण्यात मिसळून एकजीव करतात. इतर रंग खोबरेल तेलात तयार करतात. याशिवाय कोरडे कुंकू व चमक आणण्यासाठी अभ्रकाची पूड वापरतात. कथकळीमध्ये रंगभूषा करणाऱ्याला ‘चुट्टिक्कारन’ म्हणतात. दोन्ही कानशिलांपासून हनुवटीपर्यंत तोंडाच्या खालच्या जबड्यास तांदूळ व चुन्याच्या मिश्रणाने केलेल्या गोलाकार विशिष्ट रंगभूषेला ‘चुट्टी’ अशी संज्ञा आहे. पुरुषपात्रांच्या रंगभूषेचे हे आगळे रूप आहे. चुट्टी लावण्यास फार वेळ लागतो. म्हणून पात्राला यावेळी झोपवूनच चुट्टी लावण्याचा प्रघात आहे; पण हल्ली वेळ वाचविण्यासाठी जाड कागदाची तयार केलेली चुट्टी वापरण्याची पद्धत हळूहळू रूढ झाली आहे. दुःशासनाला ‘कटेश’ नावाची कागदाची गोलाकार चुट्टी नाकपुड्यांपासून वर कपाळापर्यंत लावतात. समुद्रफेनापासून लिंबाएवढे दोन गोळे करून एक नाकाच्या शेंड्यावर व दुसरा कपाळावर (मुक्केल चुट्टी, नेटि चुट्टी) चिकटवितात. हे दिसण्यास पांढरे असतात. डोळे, भुवया, नाक, ओठ इत्यादींची रंगभूषा संबंधित व्यक्ती स्वतःच करते. एक प्रकारच्या भाजीचे फूल (चुण्टपूव) व ते न मिळाल्यास वांग्याचे फूल घेऊन त्याच्या पाकळ्या काढून टाकून त्यातील फक्त अपक्व फळ तळहातावर घेऊन अंगठ्याने चोळतात. थोड्याच वेळात ते लालसर होते, की ते कपड्यात बांधून ठेवतात व प्रयोगापूर्वी त्यातील बी पाण्याने ओली करून तिचे दोन दोन तुकडे दोन्ही पापण्यांच्या पोकळीत एकेक ठेवतात. त्यामुळे चारपाच मिनिटांत डोळे आरक्तवर्ण होतात.

कथकळितील तामसिक भूमिकेतील दुःशासनाची वेशभूषा (लाल दाढी)

पात्रांची वेशभूषा : पुरुषपात्रे फुगलेल्या परकराप्रमाणे दिसणारे वस्त्र (उटुत्तु केट्ट) घालतात. त्यावर झुली (पट्‌टुवाल-मुन्ती) व सोनेरी कमरबंध (पटियरंञाणम्‌) असतो. भूमिकेनुसार सफेद, लाल, काळे, निळे, केसाळ असे पूर्ण हातांचे जाकीट (कुप्पायम्‌) घालतात. मनगटात कडे, पोची (वळा, कटकम्‌), दंडावर बाहुभूषणे (तोळपूट्ट परत्तिक्कामणी), गळ्यात कोल्लारम्‌, कळुत्तारम्‌, खांद्यावरून सोडलेली चारपाच उपरणी (उत्तरीयम्‌) अशी इतर वेशभूषा असते. उपरण्यांच्या टोकाशी गोंड्यासारखी फुले लावलेली असतात. हल्ली त्यांमध्ये आरसा बसवतात. शिरोभूषणही (तोटा किरीटम्‌) वापरले जाते. केस पाठीमागे बांधतात. कपाळावर भालपट्टी व मण्यांच्या माळा (चुट्टित्तुणि, चट्टिनाटा) असतात. घायपात, अंबाडी किंवा ताग यांपासून तयार केलेले कृत्रिम लांबलचक केस (चामरम्‌) लावण्याची पद्धत आहे. सात्त्विक, राजसिक व तामसिक असे पुरुषवेशाचे भेद असतात. त्यांमध्ये थोडाथोडा फरक असतो. पुरुषपात्रे चांदीची कृत्रिम नखेही वापरतात. स्त्रीपात्रांची साधी वेशभूषा सात्त्विक समजली जाते. ब्राह्मण, नारदमुनी साधाच पेहेराव करतात. स्त्रीपात्रे निऱ्या केलेली साडी छातीपर्यंत धरून कमरेला नाडी बांधून वरील भाग त्यावरून सोडतात. नंतर निऱ्यांचे खालचे टोक उजवीकडून मागे डाव्या बाजूस खोचतात व उजव्या बाजूचे टोक मागून उजव्या बाजूस खोचतात. साडीच्या वरील बाजूच्या निऱ्यांना छोट्याशा पंख्याप्रमाणे कमरेस दोन्हीकडे खोचतात. यावरून तीन सरांचा कमरबंध बांधतात. इतर सर्व अलंकरणे पुरुषांच्या अलंकरणांसारखीच असतात. कानांच्या पुढे कर्णपात्रे (कातिला) व डोक्याच्या डावीकडे कलता अंबाडा (कोण्टा) असतो. कपाळावर मोत्यांची माळा बांधतात व शेवटी अंबाड्यावरून बोटांच्या टोकांपर्यंत पोहोचणारा रेशमी पडदा (उरुमाल) घेतात. भीरू म्हणजे विदूषक. हा आपले कपडे व दागिने उलटे धारण करतो. दाढीवेशात (ताटिवेशम्‌) कली, दुःशासन, हनुमान यांना अनुक्रमे काळी, लाल व सफेद दाढी फक्त अधिक असते. हनुमानाचा मुकुट गोल (वट्टमुटि) असतो.

रंगमंचावर धरलेला प्रवेशाच्या सुरुवातीचा पडदा

रंगमंच : गावामध्ये काही मंदिरांतून बांधलेले कूत्तंपलम्‌ (रंगमंच) असतात. जेथे रंगमंच नसेल, तेथे देवळाचे प्रांगण किंवा एखाद्या अंगणात चार कोपऱ्यांत चार खांब पुरून, वर आडवे बांबू टाकून व त्यावर नारळीच्या विणलेल्या झावळ्या टाकून तयार केलेली जागा रंगमंच म्हणून वापरतात. त्याच्या तीनही बाजूंस प्रेक्षक बसू शकतात. रंगमंचावर पुढेमागे पडदा नसतो; परंतु प्रवेशाच्या सुरुवातीस व शेवटी लुंगी (वेष्टी) नेसलेले दोन पुरुष एक पडदा (तिरशीला) प्रेक्षकांसमोर धरतात. रात्री कार्यक्रमांच्या वेळी नृत्यदीप (कळिविळक्क) म्हणजे सु.सव्वा मीटर उंचीची मोठी समई वापरतात. त्या समईतील एक वात नर्तकाकडे व दुसरी वात प्रेक्षकांकडे पेटवून ठेवली, म्हणजे रंगमंचाची सिद्धता झाली. रंगमंचावरील दुसरी वस्तू म्हणजे उरल (लाकडाचे मोठे उखळ). ते उलटे ठेवून त्याचा स्टुलाप्रमाणे उभे राहण्यासाठी व बसण्यासाठी उपयोग करतात. विशिष्ट पात्रे त्यावर एक पाय ठेवून उभी राहिली, की भारदस्त वाटतात. आता आधुनिक काळात शहरांतून तयार रंगमंचावर सादरीकरण केले जाते.

संगीत : कथकळीमध्ये पूर्वी सोपान किंवा सोमान संगीत वापरीत. उण्णायी वारियर व इरयिम्मन तंपी यांनी देशी कर्नाटक संगीतपद्धती प्रथम सुरू केली. सध्या हीच पद्धत रूढ आहे. कथकळीमध्ये रागतालांत बद्ध केलेल्या रामायणमहाभारत यांतील एकंदर १३० कथा आहेत. त्यांत वेगवेगळ्या रामकथा किंवा अवतार आहेत. तेच गाण्याचा परिपाठ होता; मात्र आता आधुनिक विषय घेऊन त्यानुसारही सादरीकरण केले जाते.

ताल : कथकळी मध्ये बहुतांशी ६ ताल वापरतात. हे केरळ प्रांताचे स्वतंत्र ताल समजले जातात. या तालांची नावे अशी : (१) पंचारी, (२) तृपुटा, (३) मुरियटंता, (४) चंपटा, (५) चंपाव, (६) अटंता. त्यांच्या अनुक्रमे ६, ७, ७, ८, १०, १४ अशा मात्रा आहेत.

प्रयोग : (१) केलीकोट्टु / केळिकोट्‌टु : सूर्यास्तानंतर चेंडा, मड्डलम् इ. वाद्ये वाजवून गावातील लोकांना होणार्‍या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले जाते.

(२) अरंगुकेळी / अरंगुकेली : वाद्यांचा गजर करून प्रयोग सुरू झाला असे घोषित केले जाते. त्यानंतर ६ फूट उंचीचा दिवा (कळिवालाक्क) म्हणजेच रंगदीप उजळवला जातो.

(३) थोडायम् / तोट्यम् : प्रयोग सुरू होताना वाद्यवृंद पाठीमागे येऊन उभा राहतो. तालवाद्ये सुरू होताच प्रेक्षकांसमोर पडदा धरला जातो. यामध्ये दोन कलाकार जुजबी रंगभूषा करून अमूर्त हालचालींमधून निसर्गाला वंदन करतात. हे नर्तक पडद्यामागून नृत्य करीत असतात.

(४) वंदना श्लोकम् (पुरप्पाटु तोळील) : यामध्ये वंदन श्लोक होऊन प्रारंभ नृत्य सुरू होते. पडदा हळूहळू बाजूला करून कथानकातील मुख्य पात्रांची झलक दिली जाते. गाणे व नृत्यातून प्रार्थना केली जाते. गाणारा कलाकार सूत्रधाराप्रमाणे श्लोकातून कोणाचा प्रवेश होणार आहे हे नमूद करतो. त्यानुसार प्रवेश होऊन प्रसंगानुरूप अभिनय केला जातो. तालवाद्यांवर नृत्य केले जाते. आपले कौशल्य दाखविण्यास कलाकारांना येथे वाव मिळतो. या प्रयोगांमध्ये कोणत्या पात्राने कोणत्या बाजूने प्रवेश करायचा याचे नियम ठरलेले असतात.

(५) पुराप्पद : यामध्ये मुख्य पात्रांची ओळख होते. मुख्य पात्र हा पूर्ण वेशभूषा व रंगभूषेसहित प्रेक्षकांसमोर येतो व शुद्ध नर्तनास प्रारंभ करतो.

(६) मेलापड्डम् : गायन व तालवाद्यांनंतर गीतगोविंदमधील पदम् सादर केले जाते. त्याची सुरुवात ‘मंजुतारा’ या शब्दाने होते.

(७) कथा : मुख्य कथेला प्रारंभ होतो, कधी ती रामायणातील कथा असते, तर कधी महाभारतातील तर कधी गीतगोविंदमधील कृष्णाच्या लीला सांगणारी कथा असते. प्रत्येक प्रसंग हा तपशीलवार नृत्यातून प्रस्तुत केला जातो.

(८) धानसी : शुद्ध नर्तन पूर्ण ही अंतिम रचना सादर केली जाते. यामध्ये एकल नर्तन होऊन या श्लोकात देवतांचे आभार मानले जातात व हळूहळू पडदा पाडण्यात येतो.

नृत्य : कथकळीमध्ये शब्दार्थ दाखविण्यासाठी वेगवेगळे २४ हस्त असून ७५० मुद्रा आहेत. हे सर्व हस्तलक्षणदीपिका या ग्रंथातून घेतले आहेत. शब्दार्थाखेरीज त्यातील व्याकरणही शुद्ध असते. कथकळी नृत्यगीतांचे प्रसिद्ध कवी वळ्ळत्तोळ ऐकू शकत नव्हते; परंतु हाताने भरभर बोलण्याइतपत त्यांना हस्तमुद्रांचा सराव होता. वनवर्णन, स्वर्गवर्णन, युद्धाची तयारी, रथ तयार करणे इ. कथकळीच्या नृत्तनृत्याची खास वैशिष्ट्ये आहेत.

नाट्य : कथकळी नृत्यनाट्याची बैठकच नाट्याची आहे. पात्रे आपली भूमिका इतक्या सफाईने करतात, की त्याचा अर्थ प्रेक्षकांच्या अंतःकरणापर्यंत सहजतेने पोहोचण्यास मदत होते. काही नर्तकांना त्यांच्या प्रसिद्ध भूमिकांच्या नावानेच लोक ओळखतात. अभिनयात नाट्यधर्म प्राधान्याने असतो, म्हणून कथकळीचा अभिनय जास्त प्रभावी वाटतो.

प्रसिद्ध नर्तक : पांचाली करुणाकर पणिक्कर, तकळी केशव पणिक्कर आशान, कोच्चुपिळ्ळ पणिक्कर आशान, पळ्ळियंपी वेलुपिळ्ळ आशान, गुरू शंकरन्‌ नंपूतिरी, कंटियूर वेलुपिळ्ळ आशान, अंपू पणिक्कर, रामुण्णी मेनन, वेच्चूर रामन्‌पिळ्ळ आशान, कुरुच्ची कुंजन पणिक्कर आशान, मात्तूर कुंजनपिळ्ळ आशान, चेंगन्नूर रामन्‌पिळ्ळ आशान, वाळेंकट कुंचुनायर, राघवन्पिळ्ळ आशान, कलामंडलम्‌ कृष्णन्‌ नायर, मांकुळम्‌ विष्णू नंपूतिरी, चंपक्कुळम्‌ पाच्चुपिळ्ळ, गुरू गोपिनाथन्‌, गुरू कुंचू कुरूप, गुरू कृष्णन्‌ कुट्टी इत्यादी थोर नर्तकांनी कथकळी रंगमंच आपल्या कलेने समृद्ध केला आहे.

कथकळी साहित्यासाठी विविध थोर कवी, साहित्यिक, नाटककार, राजे यांचे मोलाचे योगदान लाभले. सतराव्या शतकातील कोट्टामाथू थामपुरन हे राजे संगीत, नृत्य, निर्देशन व अभिनयात निष्णात होते. त्यांनी कथकलीसाठी ४ नृत्यनाट्ये रचली. १) बाका वधम्, २) किरमीरा वधम्, ३) कल्याण सौगंधीकम्, ४) निवाथक वाचा. १७८३–१८५६ या दरम्यान इराईम्मन थंबी यांनी ३ नृत्यनाट्ये रचली. १) किचक वध, २) उत्तरा स्वयंवरम्, ३) दक्षयज्ञम्. उन्नी वारियार (१७ वे शतक) यांनीही भरपूर नृत्यनाट्ये लिहिली त्यामधील नालाचरितम् हे विशेष प्रसिद्ध आहे. याशिवाय पन्निश्शेरी नाणुपिळ्ळ, वळ्ळत्तोळ नारायण मेनन हे कथकळी साहित्यिक विशेष प्रसिद्ध आहेत.

समीक्षण : धनश्री पोतदार