जगनाडे, संत संताजी महाराज : (८ डिसेंबर १६२४—?१६८८?). संत तुकाराम महाराजांनी रचलेल्या अभंगांचे लेखनिक व संग्राहक; संत तुकारामांच्या भजन-कीर्तनातील १४ टाळकऱ्यांपैकी एक प्रमुख टाळकरी आणि वारकरी संप्रदायातील तुकारामांच्या प्रभावळीतील संतकवी. त्यांचे पूर्ण नाव संताजी विठोबा जगनाडे. त्यांचा जन्म त्यांच्या आजोळी पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे आणि मथाबाई या दांपत्यापोटी झाला. संताजी जगनाडे महाराज यांचे जन्मस्थळ आणि मृत्यूसाल यांविषयी अभ्यासकांमध्ये मतभेद दिसून येतात. त्यांचे मूळगाव चाकण. त्यांचे आईवडील हे विठ्ठलभक्त होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर भक्तीचे संस्कार झाले. वाडवडिलांपासूनच त्यांच्या घराण्यात विठ्ठलभक्तीची मिरास व पंढरीची वारी होती. त्यामुळे त्यांना बालपणीच भजन-कीर्तनाला जाण्याची आवड निर्माण झाली. ते त्यांच्या आईसोबत गावातील चक्रेश्वर मंदिरात भजन-कीर्तन ऐकण्यासाठी जात असत. तेथे होणारी नित्यनैमित्तिक भजने-कीर्तने ऐकून लहान वयातच त्यांना बहुश्रुतपणा आला. चाकणला त्यांचा वंशपरपरागत तेलाच्या घाण्याचा व्यवसाय होता. वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळण्याच्या दृष्टीने लेखन-वाचन जमाखर्च यांचे शिक्षणही त्यांनी घेतले. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा यमुनाबाईंशी विवाह झाला. त्यांना बाळोजी आणि भागुबाई अशी दोन अपत्ये झाली.
जगनाडे महाराज हे आपला प्रपंच सांभाळून वेळ मिळेल त्यानुसार भजन-कीर्तनाला जात असत. त्या काळी संत तुकाराम महाराजांची ख्याती सर्वदूर पसरली होती. शके १५६२ म्हणजेच इ. स. १६४० मध्ये तुकाराम महाराज चाकण येथील चक्रेश्वर मंदिरात कीर्तनासाठी आले होते. त्यांचे कीर्तन ऐकून जगनाडे महाराजांवर त्यांचा मोठा प्रभाव पडला. तेव्हा जगनाडे महाराजांनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला; मात्र तुकाराम महाराजांनी त्यांना संसारात राहून परमार्थ साधण्याचा उपदेश केला. तेव्हापासून संत तुकारामांना गुरू मानून ते त्यांच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले. त्यानंतर ते तुकाराम महाराजांसोबत सावलीप्रमाणे राहू लागले. याच काळात त्यांनी तुकाराम महाराजांचे अभंग लिहून संग्रह करणे सुरू केले. त्यांची स्मरणशक्ती तल्लख होती. ते एकपाठी होते. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर आणि देहू परिसरात संत तुकारामांच्या सहवासात असताना त्यांनी तुकारामांचे नवनवीन अभंग आपल्या वहीत लिहून ठेवले.
‘तुकाराम हे शूद्र असून वेदान्तोपदेश करतात व ब्राह्मणांना शिष्य करून घेऊन त्यांच्याकडून पाया पडून घेतात’ या विरोधकांच्या तक्रारीवरून तत्कालीन धर्मपीठाने तुकाराम महाराजांना शिक्षा फर्मावली. त्यांची अभंगगाथा इंद्रायणीत बुडविण्याचा आदेश दिला. त्याची अंमलबजावणीदेखील झाली. त्या वेळी संत तुकाराम हे १३ दिवस धरणे धरून बसले. तेव्हा जगनाडे महाराजांनी स्वतःला व इतर अनुयायांना मुखोद्गत असणारे अभंग पुन्हा लिहून काढले. अशाप्रकारे त्यांनी तुकाराम महाराजांच्या गाथा पुनरुज्जीवित केल्या. महिपतीबोवा ताहराबादकर यांनी ‘संताजी तेली जगनाड्या देख। तो तुकयापासी होता लेखक।।’ अशी गौरवपूर्ण नोंद केलेली आढळते.
तुकाराम महाराजांच्या निर्याणानंतर (१६५०) जगनाडे महाराज आपल्या घरी चाकणला परतले. त्यांना परतलेले पाहून कुटुंबीयांना आनंद झाला. त्यांनी आपल्या सोबत आणलेल्या वह्या (गाथा) आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवून त्यांची नित्यनियमाने ते पूजा करीत. पंचक्रोशीतील नागरिक त्या अमूल्य ठेवा असलेल्या वह्यांचे दर्शन घेण्यास त्यांच्या घरी येत असत. संत तुकारामांचे विरोधक व परकीय आक्रमकांपासून त्यांनी या वह्यांचे प्राणपणाने रक्षण केले. त्यासाठी त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. लुटारू मुघल सैनिकांच्या भयाने त्यांना गाथा घेऊन अनेकदा चाकण, खेड, सुदुंबरे, तळेगाव येथे आश्रय घ्यावा लागला.
तुकाराम महाराजांच्या संगतीत त्यांनी अनेक अभंगांची रचना करून स्वयंस्फूर्त गाथा तयार केली. आज ‘श्रीसकळसंतगाथा’मध्ये त्यांच्या ८५ रचना आढळतात. त्यांनी घाणा हे रूपक वापरून अनेक अभंग रचले. तुकाराम महाराजांच्या विचारांना पुनरुज्जीवित करण्याचे महान कार्य संत संताजी जगनाडे महाराजांनी केले. वृद्धापकाळाने मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला त्यांनी देह ठेवला.
मराठी साहित्यसंशोधक आणि ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या सापडलेल्या वह्यांवरून सु. १३२३ अभंगांचा समावेश असलेला ‘तुकारामबुवांची अस्सल गाथा’ (भाग–१ व २; १९१९ व १९२०) हा ग्रंथ संपादित केला आहे.
भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन २००९ मध्ये त्यांचे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. तसेच महाराष्ट्र शासनाने त्यांची जयंती साजरी करण्याबाबत शासन परिपत्रक काढले व त्यांचे छायाचित्रही प्रसिद्ध केले.
संदर्भ :
- देशमाने, मोहन, ‘महाराष्ट्राची अस्मिता : श्री संत संताजी जगनाडे महाराज’, चौथी आवृ., पुणे, २०१६.
- मोरे, सदानंद; गायकवाड, श्रीरंग (संपा.), ‘ज्ञानबातुकाराम टाळकरी विशेषांक’, पुणे, २०२४.
- मोरे, सदानंद, ‘तुकाराम दर्शन’, पुणे, २०१४.
- येवले, राजेंद्र केशव; गायकवाड, श्रीरंग (संपा.), ‘ज्ञानबातुकाराम टाळकरी विशेषांक’, पुणे, २०२४.
- लाड, पुरुषोत्तम मंगेश (संपा.), ‘श्री. तुकरामबावांच्या अभंगांची गाथा’, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, पुनर्मुद्रण २०११.
- https://santajimaharaj.com/
समीक्षक : श्यामसुंदर मिरजकर