भाद्रपद शुद्ध चतुर्दशी हा अनंतपूजेचा दिवस, एक व्रत व उत्सव म्हणून साजरा केला जातो. हे एक काम्यव्रत असून याचा संकल्प केला जातो. गतवैभव परत मिळावे, सुख, शांती आणि समृद्धी मिळावी व आपल्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात या हेतूने मुख्यत: हे व्रत केले जाते. त्यासाठी अनंत शक्तीचे प्रतीक असलेल्या भगवान विष्णूची या दिवशी पूजा केली जाते.

‘महाभारता’मध्ये कौरव-पांडव यांच्यातील द्यूतात पांडवांना पराभव पत्करावा लागला. त्या वेळी त्यांना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासाची शिक्षा झाली. या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून पांडवांनी श्रीकृष्णाची प्रार्थना केली. कृष्णाने त्यांना हे अनंतव्रत तेव्हा इच्छित-फलदायक म्हणून करण्यास सांगितले. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपले गतवैभव पुन्हा मिळावे म्हणून युधिष्ठिर यांनी श्रद्धेने विधीपूर्वक पूजा करून अनंतसूत्र चौदा गाठींचा रेशमी धागा हातात बांधला. त्यामुळे पांडवांचे संकट कमी होऊन त्यांना मानसिक स्थैर्य मिळाले व विजयाची दिशा मिळाली, असे धर्मग्रंथात सांगितले आहे.

अनंत पूजनात उदक-कलशाभोवती दोरा गुंडाळला जातो, तो दोरा पुढे ‘पवित्र’ म्हणून सांभाळावयाचा असतो. स्त्रिया डाव्या हातामध्ये, तर पुरुष उजव्या हातामध्ये दोरा बांधतात. चौदा दिवसानंतर तो हातातील धागा अथवा पवित्र जलप्रवाहात विसर्जित केला जातो. तो सर्व प्रकारच्या संकटापासून रक्षण करतो, अशी श्रद्धा असते.

ह्या व्रताचा प्रसार वैष्णवांत विशेष आहे. चौदा वर्षे हे व्रत आचरल्यावर त्याचे उद्यापन करतात. गणेश चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना करून अनंत चतुर्दशीला त्याचे सार्वजनिक रीत्या उत्सवपूर्वक विसर्जन करण्याची प्रथा महाराष्ट्रात पाळली जाते. हे अनंताचे व्रत चौदा वर्षे आचरावे असे सांगितलेले असले, तरी अनेक लोक ते आजन्म पाळत असतात.

अनंत चतुर्दशी हा गणेशोत्सवाचा शेवटचा आणि अंतिम दिवस मानला जातो. प्रत्येक घराच्या धार्मिक मान्यतेनुसार गणेश चतुर्थीला गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर त्याच दिवशी, दुसर्‍या दिवशी, पाचव्या दिवशी, सातव्या दिवशी किंवा गौरीविसर्जनादिवशी अन्यथा अनंत चतुर्दशीला गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. अनंत चतुर्दशीदिवशी घरच्या गणपतींशिवाय सार्वजनिक गणेश मूर्तींचेही थाटामाटात मिरवणूक काढून नदी, समुद्र, कालवा, कृत्रिम तलाव (विसर्जन कुंड), विहिरी यांमध्ये विसर्जन केले जाते. गणेशभक्तांच्या आनंदाने व जल्लोषाने अनंत चतुर्दशी हा दिवस अनंताच्या व्रताचा दिवस म्हणून साजरा होताना फारसा कोणाच्या ध्यानात येत नाही. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनद्वारे देवाची शक्ती अनंत व शाश्वत आहे हे मान्य करून केवळ गणेश विसर्जन हा शेवट नाही, तर आध्यात्मिक, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांचा संगम आहे, हे उद्धृत केले जाते.

महाराष्ट्रात लोकमान्य टिळक ह्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू करून दिली आणि त्यानंतर ह्या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले. ह्या दिवशी फक्त घरच्या नाही, तर अनेक मोठ-मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या मानाच्या गणपतींचे विसर्जन केले जाते. अनंत चतुर्दशी हा श्रद्धा संयम आणि समर्पणाचा सण आहे, तो केवळ धार्मिक विधींमध्ये मर्यादित नसून सामाजिक एकात्मता आणि आनंदाचा संदेश देणारा सण आहे.

संदर्भ :

  • फडके, वि. के. ‘संपूर्ण चातुर्मास’, पुणे, सप्टेंबर १९९८.

समीक्षक : बाळासाहेब मुळीक


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.