मानवाच्या रोजच्या कृतीतून तयार होणाऱ्या अनेक टाकाऊ पदार्थांना घन कचरा म्हणतात. योग्य वापर केला तर “टाकाऊ पदार्थ” सुद्धा मौल्यवान स्रोत होऊ शकतो. मानवी समाजात घन कचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने गंभीर बाब आहे. त्यामुळे हवा, पाणी व जमीन प्रदूषित होऊन मानवी अधिवासाला धोका निर्माण होत आहे. घन कचऱ्याचे संकलन, साठवण, वाहतूक, प्रक्रिया व विल्हेवाट किंवा पूनर्वापर इ. बाबी घन कचरा व्यवस्थापनात येतात.

घन कचऱ्याचे वर्गीकरण : घन कचऱ्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करतात.

वर्गीकरणाचा मुद्दा

प्रकार

विघटन

विघटनशील कचरा
अविघटनशील कचरा
परिणाम घातक परिणाम
अघातक परिणाम
प्राकृतिक स्थिती सुका कचरा
ओला कचरा
पुन:चक्रीकरण पुन:चक्रीय कचरा
अपुन:चक्रीय कचरा

 

घन कचऱ्याचे स्रोत : घरगुती कचरा : हा कचरा घरामधून तयार होतो. उदा., टाकाऊ कागद, कागदी वस्तू व वेष्टने, काच, रबर, धातू, चामड्याच्या वस्तू इत्यादी.

औद्योगिक कचरा : रंग-गाळ, तेल, राख, जड धातू इत्यादी.

धोकादायक कचरा : रासायनिक, जैविक, स्फोटक, रोगप्रसारक इत्यादी पदार्थ.

शेतातील घन कचरा : झाडांची पाने, फुले व फांद्या, पिकांचे टाकून दिलेले भाग, जनावरांचे मलमूत्र इत्यादी.

इलेक्ट्रॉनिक घन कचरा : टाकाऊ दूरदर्शन संच, म्युझिक सिस्टिम्स, रेडिओ, मोबाईल फोन, संगणक इत्यादी.

जैववैद्यकीय कचरा : रुग्णालयामधील बॅंडेज, हातमोजे, सुया, वापरलेला कापूस, तापमापकामधील पारा, औषधे इत्यादी.

विघटनशील घन कचरा : खराब अन्न, फळे, भाजी, कागद, माती, राख, झाडांची पाने इत्यादी.

घन कचरा व्यवस्थापनाच्या सर्वसाधारण पद्धती :

(अ) भूमिभरण : या पद्धतीत कचरा पातळ थरांत पसरला जातो, त्यावर घट्ट गाळ आणि चिकणमाती किंवा प्लॅस्टिकचा थर दिला जातो. आधुनिक भूमिभरण पद्धतीमध्ये तळाशी प्लॅस्टिकचे  प्रचंड मोठे  अच्छिद्र पटल (non permeable membrane) पसरले जाते, त्यावर चिकणमाती, जाड प्लॅस्टिक आणि वाळूचे अनेक थर दिले जातात. अशी पद्धत अवलंबिल्याने पाझरलेले पाणी भूजलात मिश्रित होत नाही व भूजल प्रदूषण टाळता येते.

प्लॅस्टिकच्या तळाशी पाझरलेले पाणी साचल्यास खाली पंप टाकून पाणी वर खेचले जाते आणि त्याच्यावर प्रक्रिया करून शुद्धीकरण केले जाते. जमिनीची भूमिभरणक्षमता संपते तेव्हा ती जमीन पाण्याची टंचाई टाळण्यासाठी चिकणमाती, वाळू व मातीसह झाकली जाते. पाण्याच्या गळतीमुळे होणारे भूजल प्रदूषण रोखण्यासाठी व भूमिभरणाच्या क्षेत्राचे निरीक्षण करण्यासाठी त्याच्या आजूबाजूला अनेक विहिरी खोदल्या जातात. कचऱ्याच्या अवायुजीवी (anaerobic) विघटनाने तयार झालेला मिथेन वायू साठविला जातो आणि त्याचा वापर विद्युत् किंवा उष्णता निर्माण करण्यासाठी केला जातो.

भूमिभरणासाठी जागेची निवड : (१) भूजलाशी संपर्क टाळण्यासाठी जमिनीची उंची भूजल पातळीपेक्षा जास्त असणे आवश्यक असते. (२) शक्यतो चिकणमाती किंवा गाळ असणाऱ्या प्रदेशातील जागा निवडावी. (३) ही जागा खडक

उत्खनन क्षेत्रात नसावी. अशा क्षेत्रांत खडकांतील भेगांमुळे पाणी खाली पाझरते व भूजल प्रदूषण होऊ शकते .

भूमिभरणामुळे मोठ्या प्रमाणात दुष्‍परिणाम होऊ शकतात. हे परिणाम पुढीलप्रमाणे असू शकतात : (१) जीवघेणा अपघात (उदा., कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली सफाई कामगार दबले जाण्याचे प्रसंग). (२)पायाभूत सुविधांचे नुकसान (उदा., कचऱ्याच्या जड वाहनांमुळे रहदारीला अडथळे). (३) स्थानिक पर्यावरणाचे प्रदूषण (उदा., जमिनीचा वापर आणि त्याचबरोबर भूमिभरण बंद केल्यानंतर गळती आणि माती प्रदूषणाने भूजल आणि / किंवा पाणवठ्याचे प्रदूषण). (४) सेंद्रिय टाकाऊ पदार्थांच्या विघटनामुळे कचरा निर्माण होणाऱ्या मिथेनाचे वातावरणातील वायूंशी मिश्रण (मिथेन हा कार्बन डाय-ऑक्साइडापेक्षासुद्धा शक्तिशाली हरितगृह वायू आहे आणि परिसरातील रहिवाशांसाठी तो धोकादायक ठरू शकतो). (५) उंदीर व माशी यांच्यासारख्या रोगप्रसारकांचे पोषण या क्षेत्रात मुख्यतः होते.

(आ) भस्मीकरण : भस्मीकरण म्हणजे फक्त राख शिल्लक होईपर्यंत ज्वलन करणे. भस्मक हे असे यंत्र आहे की, जे कचरा आणि अन्य प्रकारचे टाकाऊ पदार्थ यांची राख होईपर्यंत ज्वलनासाठी वापरले जाते. भस्मक तयार करण्यासाठी घनता जास्त असणारे तसेच उष्णतारोधक असे पदार्थ वापरले जातात, जेणेकरून आजूबाजूच्या परिसरात अतिउष्णतेचा त्रास होणार नाही.

कचऱ्याच्या त्वरित तसेच कमी संसाधनाच्या वापरात ज्वलनासाठी भस्मकामध्ये उच्च उष्णतापातळी राखणे जरूरीचे असते. उष्णता बाहेर पडू दिल्यास कचऱ्याचे पूर्णपणे किंवा वेगाने ज्वलन होत नाही. भस्मीकरण ही  विल्हेवाट पद्धती असून त्यात घन सेंद्रिय कचऱ्‍यांचे ज्वलन केले जाते तसेच त्यायोगे त्यांना अवशेष आणि वायुजन्य उत्पादांमध्ये रूपांतरित करता येते. ही पद्धत घन कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापनातील अवशेष या दोन्ही गोष्टींच्या विल्हेवाटीसाठी उपयुक्त आहे. या प्रक्रियेमुळे घन कचऱ्याचे प्रमाण मूळ घनफळाच्या २०—३० टक्के कमी होते.

भस्मीकरण आणि इतर उच्च तापमान कचरा व्यवस्थापन प्रणाली कधीकधी “औष्णिक उपचार” (thermal treatment) म्हणून वर्णिल्या जातात. कचऱ्याचे भस्मीकरण छोट्या स्तरात सुद्धा दिसून येते. घरातील कचऱ्याचे सर्वसामान्य ज्वलन हे छोट्या प्रमाणावरील भस्मीकरण तसेच उद्योगांतील मोठ्या प्रमाणावर आणि जास्त कचऱ्याचे केलेले ज्वलन मोठ्या स्तरातील भस्मीकरण म्हणता येते. घन, द्रव आणि वायू या प्रकारांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ही पद्धत वापरता येते. काही घातक टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावण्याची एक व्यावहारिक पद्धत म्हणून ती ओळखली जाते. वायूचे प्रदूषण कमी करणे यांसारख्या अडचणींमुळे  कचऱ्याच्या विल्हेवाटीचा हा एक विवादात्मक उपाय आहे.

(इ) सेंद्रिय खतांची निर्मिती :  मोठ्या शहरांमध्ये भूमिभरणासाठी जागेची कमतरता असल्यामुळे, योग्य  माध्यमाद्वारे जैवविघटनशील कचऱ्याचे (म्युनिसिपल कचऱ्यापासून वेगळा) विघटन केले जाते. यातून मातीसाठी चांगल्या दर्जाचे पोषण मिळते, तसेच समृद्ध आणि पर्यावरणीय अनुकूल खत तयार केले जाते त्यामुळे मातीची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता वाढते.

भारतात तयार होणाऱ्‍या महापालिकेतील घन कचऱ्यामध्ये ३५—४० टक्के सेंद्रिय घटक आहेत. या कचऱ्याचे, विल्हेवाटीच्या सर्वांत जुन्या पद्धतींपैकी एक, सेंद्रिय पद्धतीने पुनर्नवीनीकरण केले जाऊ शकते. सेंद्रिय कचऱ्याच्या  विघटनाची नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे खत किंवा कंपोस्ट याचे उत्पादन, यामध्ये पोषक द्रव्ये अतिशय समृद्ध असतात.

कंपोस्टिंग म्हणजे जैविक प्रक्रिया असून त्यात सूक्ष्मजीव, मुख्यतः बुरशी आणि जीवाणू असतात, जसे की पदार्थासारख्या अवयवयुक्त कचऱ्यात बुरशीचे रूपांतर होते. हे तयार झालेले उत्पादन मातीसारखे दिसते, त्यामध्ये कार्बन आणि नायट्रोजन यांचे प्रमाण जास्त असते आणि वाढणाऱ्या वनस्पतींसाठी ते एक उत्कृष्ट माध्यम असते.

घन कचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनाचे परिणाम :

  • नैसर्गिक सौंदर्य कमी होणे : पसरलेल्या घन कचऱ्यामुळे नैसर्गिक सौंदर्य कमी होते.
  • कचऱ्याची दुर्गंधी : साठविलेल्या कचऱ्यापासून दुर्गंधी निर्माण होते.
  • विषारी वायू : नागरी घन कचरा विल्हेवाटीची ठिकाणे किंवा भूमिभरण ठिकाणे यांमधून विषारी वायू बाहेर पडतात.
  • रोगांचा प्रसार : घन कचरा विल्हेवाटीची ठिकाणे अनेक रोगांना आमंत्रित करतात.

ऊर्जाभरण : सेंद्रिय कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती विविध प्रक्रियांद्वारे केली जाते. यातून जैववायूची निर्मिती करता येते.

औद्योगिक घनकचरा व्यवस्थापन : सध्या उद्योगधंद्यांमध्ये निर्माण होणार कचरा अधिकृत संस्थेकडे पाठविला जातो व त्याची शास्त्रीय पद्धतीने हाताळणी व विल्हेवाट लावली जाते.

घनकचरा व्यवस्थापनामध्ये वैयक्तिक सहभाग :

घनकचरा व्यवस्थापन करीत असताना तीन ‘R’ महत्त्वाचे आहेत :

१) कचरा कमी करणे (REDUCE) : उदा., कमीत कमी कागद व कॅरीबॅगेचा वापर करणे.

२)पुनर्वापर (REUSE): उदा., वापरलेल्या वहीतील कोऱ्या कागदापासून नवीन वही तयार करणे.

३) पुन:चक्रीकरण (RECYLCE): घन कचऱ्यामधील धातू, रबर, काच इ. पदार्थ पुन:चक्रीकरणासाठी पाठविले जातात.

संदर्भ :

  • Chandrappa, Solid Waste Management: Principles and Practice, 2012.
  • Kreith, Handbook of Solid waste Management, 1994.

 

समीक्षक : वि. ल. सूर्यवंशी

This Post Has 2 Comments

  1. Rohit pardeshi

    Nice

  2. Sangita Gholap

    Khup chan kalpna

Comments are closed.