ब्रह्मपुराण : ब्रह्मदेवाने दक्षाला सांगितल्यामुळे याला ब्रह्मपुराण हे नाव पडले. हे पुराणाच्या यादीतले पहिले पुराण असल्यामुळे त्याला आदिपुराण म्हटले जाते. हे पुराण इ.स. च्या सातव्या-आठव्या शतकांपूर्वी लिहिलेले असावे व दहाव्या-बाराव्या व पंधराव्या शतकात त्यात भर पडली असावी. त्याचा काही भाग ओडीशात, तर काही भाग दंडकारण्यात तयार झाला असावा अशी मते आहेत. या पुराणात एकूण २४५ अध्याय असून सुमारे १४ हजार श्लोक आहेत. इतर पुराणांच्या तुलनेत हे पुराण धर्म, अर्थ, काम व मोक्ष देणारे आहे असे मानले जाते. या पुराणाचा समावेश राजस पुराणात केला जातो.
नैमिषारण्यात तप करणारे मुनी व महर्षी लोमहर्षण सूत यांच्यातील संवादाने ह्या पुराणाची सुरुवात होते. सृष्टीचे वर्णन व उत्पत्ती वर्णन सूत करतात. राजा वेन यांच्यापासून जो मुलगा झाला त्याने पृथ्वी पहिल्यांदा नांगरली असे म्हटले जाते. त्याचे नाव पृथुवैन्य होय. ह्या पृथुवैन्याची कथा येथे सांगितली आहे. यानंतर मनुवंश वर्णन, सूर्यवंश वर्णन, सोमवंश, आयुवंश, पुरुवंश, क्रोष्टुवंश, वृष्णिवंश या क्रमाने भारतवर्षातील महत्त्वाच्या वंशांचे वर्णन वाचायला मिळते. सगर राजा, ययातिचे चरित्र, स्यमन्तकमणि कथा यात विस्ताराने आली आहे. अनेक राजे व त्यांचे पुत्र यांची नावे हे सर्व ऐतिहासिक उल्लेख आलेले आहेत. सूर्यवंशाच्या वर्णनातच भगीरथाची प्रसिद्ध कथा आली आहे. पुढे दशरथ, राम, कुश या क्रमाने रघुवंशाचाही उल्लेख येतो. कालिदासाने रघुवंश या काव्यासाठी पुराणातील माहितीचा उपयोग करून घेतलेला आहे. सोमाची उत्पत्ती कशी झाली ते सांगितल्यावर पुरुरव्यापासून सोमवंशाची माहिती सांगण्यास सुरुवात झालेली दिसते. नंतर ययातीचे चरित्र व कथा आली आहे. पुढे पुरुवंशाचे वर्णन वाचायला मिळते.
जम्बूद्विप व भारतवर्षाचे वर्णन सविस्तर दिसून येते. भारताबद्दल बोलताना ब्रह्म्याने म्हटले आहे की, भारतावर्षामध्ये मनुष्य धर्म-अर्थ-काम-मोक्ष सर्वांना उत्तम संयमाने प्राप्त करू शकतो. या नंतर पाताळ व नरकाचे वर्णन केले आहे. एखादी चूक झाल्यास व्यक्ती कोणत्या प्रकारच्या नरकात जाईल ह्याचे वर्णन दिसते. उदा. विनाकारण जंगल तोडणारी व्यक्ती असिपत्रवन नावाच्या नरकात जाईल. नंतर ग्रहांची स्थिती, तीर्थांचे वर्णन व तीर्थमहात्म्य आले आहे. कोणार्क येथील सुप्रसिद्ध सूर्यमंदिराचे विशेष वर्णन येथे आलेले आहे, नंतर विस्तृत रूपाने सूर्याच्या उपासनेचे महत्त्व सांगितले आहे.
यानंतर पार्वतीने शिवप्राप्तीसाठी केलेली आराधना, तिचा शिवाशी विवाह होणे, कामदेवाचे दहन, दक्ष-यज्ञ विध्वंस व दक्षाने केलेली शिवस्तुती इ. भाग विस्ताराने वर्णन केलेला आहे. शिव-पार्वती विवाहाचे येथील वर्णन इतर पुराणांपेक्षा वेगळे आहे. त्यानुसार शिव स्वतः पार्वतीकडे जाऊन विवाहाचा प्रस्ताव ठेवतात. जेव्हा शिवजी विवाहासाठी येतात तेव्हा पार्वतीच्या मांडीवर पंचमुखी बालक खेळत असते. चिडून इन्द्र मारण्यासाठी वज्र सज्ज करतात पण त्यांचा हात तसाच अडकून राहातो. मग ब्रह्मा शिवाची स्तुती करतात आणि मग इंद्राचा हात पूर्ववत होतो. त्यानंतर विवाह सम्पन्न होतो. इतर ठिकाणी पार्वतीने तपस्या करून शिवाची प्राप्ती करून घेतली असल्याची कथा येते. येथील पंचमुखी बालक पंचतत्त्वांचे प्रतीक आहे. तर पार्वती आद्यशक्तीचे प्रतीक आहे. शिव देखील अनेक ठिकाणी पंचमुखी असतात. त्यांचेच एक रूप म्हणून पंचमुखी बालक पार्वतीच्या मांडीवर दाखवले असावे. नंतर पंचतीर्थवर्णन, नरसिंह महात्म्य वर्णन, श्वेत नावाच्या राजाची कथा वर्णिली आहे. ब्रह्मपुराणामध्ये परंपरागत तीर्थोंव्यतिरिक्त काही अशा तीर्थांचे वर्णन आहे ज्यांची आजची भौगोलिक स्थाने सांगता येत नाहीत, उदा. कपोत तीर्थ, पैशाच तीर्थ, क्षुधा तीर्थ, चक्र तीर्थ, गणिमा संगम तीर्थ, अहल्या संगमेन्द्र तीर्थ, श्वेत तीर्थ, वृद्धा संगम तीर्थ, ऋण प्रमोचन तीर्थ, सरस्वती संगम तीर्थ, इ. ही सर्व तीर्थ गौतम ऋषिंशी सम्बन्धित आहेत.
ज्येष्ठापौर्णिमेचे व्रत सांगितले आहे. वामनकथा सविस्तर सांगितली आहे. गंगेच्या विविध रूपांची वर्णने आहेत. गौतम ऋषींनी शंकराच्या जटेतून गंगा पृथ्वीवर आणली त्याविषयी एक रंजक कथा या पुराणात येते. यानंतर दधिची ऋषींची कथा येते. विभू नावाच्या राजाने दहा अश्वमेध यज्ञ केल्यामुळे प्रख्यात झालेले दशाश्वमेध वर्णन, पैशाचतीर्थ वर्णन, क्षुधातीर्थ वर्णन, जनस्थानतीर्थ वर्णन, गरुडतीर्थ या क्रमाने सत्तावीस तीर्थांचे वर्णन येते. कण्डू नावाच्या ऋषींचे चरित्र अधिक सविस्तरपणे आले आहे.
भगवंताच्या अवताराविषयी मुनी प्रश्न विचारतात व व्यासमुनी अवतारांचे सविस्तर वर्णन करतात. कृष्णाचे सविस्तर चरित्र यात आलेले आहे. यानंतर सदाचार वर्णन, वर्णाश्रमधर्म वर्णन, धर्म-अधर्म वर्णन, श्राद्धकल्पाचे वर्णन, कलियुगाचे वर्णन, त्रिविध तापांचे वर्णन, परमात्म तत्त्वाचे वर्णन, योग-सांख्याचे वर्णन, राजा कराल व वसिष्ठ यांच्यातला संवाद येथे आला आहे. शेवटी ब्रह्मपुराणाचे महात्म्य व उपसंहार आलेला आहे.
पहा : पुराणे व उपपुराणे
संदर्भ :
- त्रिपाठी,श्रीकृष्णमणी, अष्टादशपुराणपरिचयः,चौखम्बा सरस्वतीभवनम्, वाराणसी, १९८०.
समीक्षक : सुनीला गोंधळेकर