बिस्मिल्लाखाँ : ( २१ मार्च १९१६ – २१ ऑगस्ट २००६ ). अखिल भारतीय कीर्तीचे सुप्रसिद्ध सनईवादक व भारतरत्न पुरस्काराचे मानकरी. त्यांचे मूळ नाव कमरूद्दिनखाँ. बिस्मिल्लाखाँ यांचा जन्म सनईवादकांच्या कुटुंबात बिहार प्रांतातील शहाबाद जिल्ह्यातील (आता- बक्सर जिल्हा) दुमराव या गावात झाला. त्यांचे आजोबा रसूल बक्ष हे दुमरावच्या दरबारी सनईवादक म्हणून नोकरीस होते. सनईवादन हा त्यांच्या घराण्याचा कौटुंबिक व्यवसाय असल्यामुळे लहानपणीच त्यांना आपल्या वडिलांकडून – खाँसाहेब पैगंबरबक्ष यांच्याकडून – सनईवादनाचे संस्कार लाभले. त्यांनी आपल्या मामांकडे – खाँसाहेब अलिबक्ष यांच्याकडे – वयाच्या सहाव्या वर्षापासून वाराणसी येथे सनईवादनाचे पद्धतशीर शिक्षण घेण्यास सुरुवात केली. तसेच विलायत हुसेन आणि सादिक अली यांच्याकडेही त्यांनी संगीताचे धडे घेतले. हळूहळू आपल्या मामांबरोबर, त्यांची साथ करण्यासाठी लग्नासारख्या उत्सवप्रसंगी तसेच संगीत संमेलनांत ते जाऊ लागले. त्यांच्याबरोबर बिस्मिल्लाखाँ यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत पहिल्यांदा सनई वादनाचा सार्वजनिक कार्यक्रम केला (१९३०). दुसरा कार्यक्रम लखनौ येथे, प्रदर्शनानिमित्त झालेल्या संगीत संमेलनात करून उत्तम वादनाबद्दल सुवर्णपदक मिळवले. तद्वतच १९३७ मधील कोलकात्याच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत त्यांनी तीन सुवर्णपदके मिळवून रसिकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. १९३८ मध्ये लखनौ येथे ऑल इंडिया रेडिओ केंद्रावर प्रथम कार्यक्रम सादर केला. येथून पुढे त्यांच्या सनई वादनाच्या उज्ज्वल कारकीर्दीला सुरुवात झाली. १९४० साली बिस्मिल्लाखाँ व त्यांचे बंधू खाँसाहेब शमसुद्दीनखाँ यांनी एक संगीत मंडळी स्थापन करून कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. पुढे अल्पावधीतच प्रथम श्रेणीचे सनईवादक म्हणून त्यांनी लौकिक संपादन केला. या दरम्यान कन्नड अभिनेते राजकुमार यांच्या सनादी अप्पण्णा  या चित्रपटासाठी त्यांनी सनईवादन केले. सत्यजित राय यांच्या जलसाघर  या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली.

सनईसारख्या वाद्यावर गायकीचे सर्व प्रकार लीलया निर्माण करणारा अत्यंत सुरेल वादक म्हणून बिस्मिल्लाखाँ ख्यातनाम आहेत. गायन-वादनाच्या शैलींचा अपूर्व समन्वय त्यांच्या ठिकाणी दिसून येत असे. मींड, गमकादींचाही त्यात अंतर्भाव होतो. ख्याल, ठुमरी वगैरे संगीतप्रकारांप्रमाणेच कजरी, चैती, पूरबी अशा लोकधुनीही ते कौशल्याने हाताळत असत. सनईच्या फुंकीवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते, त्यामुळे त्यांचे वादन अत्यंत भावपूर्ण होत असे. लयीच्या साथीसाठी ते छड्यांनी वाजवले जाणारे खोरदक नावाचे वाद्य घेत असत. ते १९६२ मध्ये अफगाणिस्तान व पाकिस्तान येथे गेले आणि १९६४ मध्ये एडिंबरो संगीत महोत्सवात त्यांनी भाग घेतला. १९६७ मध्ये ते अमेरिकेला गेले. तसेच ’इंटरनॅशनल म्यूझिक कौन्सिल’च्या निमंत्रणावरून त्यांनी यूरोपचा दौरा केला (१९६९-७०).

बिस्मिल्लाखाँ यांच्या असामान्य कलागुणांमुळे १९५५ मध्ये त्यांना ‘नॅशनल कल्चरल ऑर्गनायझेशन’ या राष्ट्रीय सांस्कृतिक संघटनेकडून ‘अखिल भारतीय शहनाई चक्रवर्ती’ हा किताब मिळाला. १९५६ मध्ये संगीत नाटक अकादमीतर्फे सन्मान लाभला आणि १९६१ मध्ये भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ व १९६८ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि १९८० मध्ये ‘पद्मविभूषण’ ह्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. मध्यप्रदेश शासनाकडून तानसेन पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. ‘रॉयल नेपाळ आर्ट अकॅडमी’ तर्फेही त्यांना सर्वोच्च मान लाभला. २००१ मध्ये भारत सरकारने सनई वादनातील त्यांच्या अद्वितीय कामगिरीकरिता ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना गौरविले.

बिस्मिल्लाखाँ यांनी सनईवादनाला बैठकीत स्वतंत्र प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यांनी सरोदवादक अमजद अलीखाँ आणि सतारवादक रवी शंकर इत्यादींसोबत जुगलबंदीचे कार्यक्रमही सादर केले आहेत. सनईवादनामध्ये त्यांनी संगीतक्षेत्रात एकमेवाद्वितीय असे स्थान पटकावले. ते शिया मुसलमान असल्यामुळे त्यांच्या समाजातील काही लोकांचा त्यांना सुरुवातीस विरोध होता; पण तरीही त्यांनी नेटाने सनईवादनाची परंपरा कायम राखली व त्यात नवनवीन प्रयोग केले.

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी सनईवादनाकरिता बिस्मिल्लाखाँ यांना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर आमंत्रित केले होते. बिस्मिल्लाखाँ यांनी देश विदेशात अनेक ठिकाणी सनईवादनाचे कार्यक्रम केले. त्यांच्या सनईवादनाच्या ध्वनिमुद्रिका भारतात व परदेशांतही अत्यंत लोकप्रिय आहेत. गूंज उठी शहनाई या हिंदी चित्रपटातील त्यांचे सनईवादनही फार लोकप्रिय ठरले (१९५९). स्वदेस (२००४) या हिंदी चित्रपटासाठी देखील त्यांनी सनईवादन केलेले आहे. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सनईवादनात व कनिष्ठ चिरंजीव नाझिम तबला व सनईवादनात निपुण आहेत.

बिस्मिल्लाखाँ यांचा वाराणसी येथे हृदयविकाराने मृत्यू झाला.

समीक्षण : श्रीकांत डिग्रजकर