बंगालमधील एक इतिहासप्रसिद्ध श्रीमंत व्यापारी व सावकारी कुटुंब. ‘जगतशेठ’ ही पदवी मोगल सम्राटांकडून दिली जात होती. या घराण्याचा इतिहास १६५२ पासून उपलब्ध आहे. मारवाडी हिरानंद (हिराचंद) साहू यांची जन्मभूमी नागौर (राजस्थान). ते जैन धर्म अनुयायी ओसवाल व श्वेतांबर पंथीय व गेल्हडा गोत्राचे होते, तर त्यांचे पूर्वज क्षेत्रीय होते. सोळाव्या शतकात गिरिधरसिह नावाच्या पूर्वजाने जीनहंस सूरी यांच्याकडून जैन धर्माची दीक्षा घेतली होती. गिरिधर यांचा मुलगा गेलाजी हे गेल्हडा गोत्राचे प्रवर्तक होय. हिरानंद यांचे वडील करमचंद हे उपजीविकेसाठी व्यापार करीत होते. हिराचंद व्यापार करण्यासाठी पूर्वेला पाटण्यास स्थलांतरित झाले. तेथे त्यांचा व्यापार भरभराटीस आला. १७११ मध्ये हिराचंद साहू यांचे निधन झाले. त्यांना सात मुलगे व एक मुलगी होती. त्यांच्या मुलांची नावे अनुक्रमे माणिकचंद, नयनचंद, अमिनचंद, मलूकचंद, रूपचंद, सुधानंद आणि गोवर्धन; यांपैकी माणिकचंद हे सर्वांत यशस्वी झाले. त्यांच्या मुलीचे नाव धनाबाई. तिचा विवाह आग्र्याच्या उदयचंद यांच्याशी झालेला होता. या धनाबाईच्या पोटी जन्मलेल्या बालकास प्रथम जगतशेठ (फतेचंद्र) होण्याचा गौरव प्राप्त झाला.

जगतशेठ घराण्याची वास्तू, मुर्शिदाबाद (प.बंगाल).

माणिकचंद हा मुर्शिदाबादच्या जगतशेठ घराण्याचा संस्थापक. १८ व्या शतकाच्या सुरुवातीस तो पाटण्याहून ढाक्का येथे स्थलांतरित झाला. त्याने व्यापारासाठी ढाक्का येथे कोठी (फर्म) स्थापन केली. या काळात बंगाल, बिहार आणि ओरिसाचा (सांप्रत ओडिशा) सुभेदार मुर्शिदकुली खान आणि माणिकचंद यांची घनिष्ठ मैत्री निर्माण झाली. माणिकचंद हे मुर्शिदकुली खान यांचे खजांची होते, त्यांच्याकडे सुभ्याचा कर जमा करून घेण्याची जबाबदारी होती. मुर्शिदकुली खान व माणिकचंद या दोघांनी मिळून राजधानी मुर्शिदाबाद गंगेच्या किनारी वसविली. १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला व मोगल साम्राज्याच्या पतनास सुरुवात झाली. याचबरोबर मुर्शिदकुली खान याने बंगालमध्ये आपला प्रभाव वाढविण्यास सुरुवात केली. या काळात बंगालमध्ये यूरोपीय व्यापाऱ्यांचा व्यापार वाढला होता. त्यामुळे मुर्शिदकुली खान यांचा सावकार, आर्थिक सल्लागार माणिकचंद याचे महत्त्व वाढले. या काळात माणिकचंद याने मोगल सम्राटास आवश्यक तेवढे पैसे पुरविण्याचे काम केले. यामुळे खुश होऊन मोगल सम्राट फरूक सिय्यरने माणिकचंद यास १७१५ मध्ये नगरशेठ (Bankers of the city) ही पदवी बहाल केली.

बंगालचा नवाब व ईस्ट इंडिया कंपनी माणिकचंद यांच्याकडून आपल्या कारभारासंदर्भात सल्लामसलत करत असत. नवाबाने आपल्या टांकसाळीची जबाबदारीही माणिकचंद याच्यावरच सोपवली होती. माणिकचंद याने तयार केलेली नाणी बंगाल, बिहार आणि ओरिसा येथे चालत असत. याचाच लाभ या घराण्यास झाला. १७१४ मध्ये माणिकचंद याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा दत्तकपुत्र फतेचंद (बहिणीचा मुलगा) यांस दिल्लीचा मोगल बादशाह मुहम्मद शहा याने जगतशेठ ही पदवी बहाल केली (१७२३). कारण या काळात पडलेल्या दुष्काळामध्ये दिल्लीमधील जनतेस फतेचंद याने आपल्या दिल्ली येथील कोठीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली होती व सम्राटाला अपमानित होण्यापासून वाचविले होते. यामुळे प्रसन्न होऊन फत्तेचंद यास जगतशेठ व त्याचा मोठा मुलगा आनंदचंद यास शेठ पद देऊ केले होते. मुर्शिदकुली खानाच्या मृत्यूनंतर मुर्शिदाबाद व ढाक्का हे संपूर्णपणे फत्तेचंद याच्या नियंत्रणाखाली आले. बंगाल, बिहार व ओरिसाच्या आर्थिक बाजारपेठेवर फत्तेचंद याचे वर्चस्व निर्माण झाल्याने त्यांच्या सहभागशिवाय कोणासही व्यापार करणे शक्य नव्हते. जगतशेठ घराणे नवाबाचे कोषागार म्हणून कार्य करत असे. पुढे फतेचंदच्या निधनानंतर (१७४४) त्याचा नातू  माधेबराय (मेहताबचंद, आनंदचंद याचा मुलगा) याने पुढील जगतशेठ म्हणून काम केले. दिल्लीचा तत्कालीन शासक अहमदशहाने त्याला जगतशेठ व त्याचा चुलता स्वरूपचंद (फतेचंदचा दुसरा मुलगा) यास महाराज या पदवीने सन्मानित केले. शेठ मधेबराय याने देखील उत्तर आणि दक्षिण भारतात आपल्या पारंपरिक व्यवसायात चांगले नाव कमाविले.

१७५६ मध्ये अलिवर्दीखानाचा मृत्यू झाला. त्यानंतर सिराजउद्दौला बंगालचा नवाब बनला. या काळात ईस्ट इंडिया कंपनीची बंगालमध्ये सत्ता मजबूत करण्याची महत्त्वाकांक्षा होती. सिराजउद्दौलाने जगतशेठ माधेबराय याला अपमानित केले, तेव्हा तो इंग्रजांना जाऊन मिळाला व प्लासीच्या युद्धात इंग्रजांना मदत केली. प्लासीच्या युद्धानंतर बंगालचा नवाब निवडण्यासाठी जगतशेठ याच्या निवासस्थानावर बैठक संपन्न झाली होती. यावेळी माधेबराय याची मीर जाफर या नावाला पसंती नव्हती; पण इंग्रजांनी मीर जाफर यास नवाब बनविले. माधेबराय व स्वरूपचंद या दोघांनी उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधून आपला व्यवसाय भरभराटीस आणला. ईस्ट इंडिया कंपनीचे इतिहासकार रॉबर्ट ऑर्मे यांच्या मते, माधेबराय जगातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक होता. १७६४ मध्ये झालेल्या बक्सारच्या पराभवानंतर मीर कासिम माधेबराय व स्वरूपचंद यांना सोबत घेऊन मोंगिर येथे गेला. पण नवाबाचा माधेबराय  याच्यावर विश्वास नसल्याने संशयावरून त्याला अटक करून गंगा नदीत बुडवून मारण्यात आले.

माधेबरायनंतर त्याचा मुलगा खुशालचंद यास सम्राट शहाआलम याने जगतशेठ पद देऊ केले. तर स्वरूपचंद याचा मोठा मुलगा उद्वत चंद यास महाराज ही पदवी देण्यात आली. खुशालचंद याचे गुलाबचंद, सुमेरचंद आणि सुखालचंद हे सख्खे भाऊ होते, तर उद्वतचंद याचे अभयचंद व मेहरचंद हे भाऊ  होते. परंपरेनुसार या सर्वांनाच सेठ म्हटले जाऊ लागले. खुशालचंद धार्मिक वृतीचा होता. त्याने समेद शिखरजी येथे अनेक मंदिरे बांधली व १०८ तलावांचे बांधकामही केले. खुशालचंदनंतर जगतशेठ ही पदवी गव्हर्नर जनरल यांच्या शिफारशीनुसार मुबारकउद्दौला यांच्याकडून हरखचंद यास देण्यात आली (१७८४). यासाठी शाहआलम किंवा मोगलांच्या परवानगीची गरज राहिली नव्हती. हरखचंद यास इंद्रचंद आणि बिसेनचंद ही दोन मुले. पुढे इंद्रचंद जगतशेठ बनला, पण केवळ २७ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला (१८७६). त्याच्या नंतर त्याचा मुलगा गोविंदचंद जगतशेठ बनला; तथापि गोविंदचंद यास कंपनीने जगतशेठ म्हणून स्वीकारले नाही. कारण या घराण्याची आर्थिक स्थिती बिघडली होती. या काळात जगतशेठ घराण्यातील वारसांची ईस्ट इंडिया कंपनीने १२०० पौंड इतके निवृत्तिवेतन मंजूर केले.

गोविंदचंद याचा १२ डिसेंबर १८६४ मध्ये मृत्यू झाला. यास औरस पुत्र नसल्याने त्याने १८४५ मध्ये गोपालचंद (गोविंदचंदच्या भावाचा मुलगा) यास दत्तक घेतले होते. यास मोगल सम्राट बहादुरशहा दुसरा याच्याकडून महाराजा ही पदवी मिळाली. ब्रिटिशांनी यालाही १२०० पौंड महिना निवृत्तिवेतन मंजूर केले. गोपालचंद याचा मृत्यू १५ ऑगस्ट १८६२ रोजी झाला. गोपालचंद यास दोन मुले होती. पैकी गोपीचंद यास ब्रिटिशांनी ३०० पौंड निवृत्तिवेतन मंजूर केले, पण त्याने ती नाकारले. गोविंदचंदच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी जगतसेठानी प्राणकुमारी देवी हिने गुलाबचंद यास दत्तक घेतले. त्याचा जन्म २९ नोव्हेंबर १८६७ मध्ये बिकानेर, राजस्थान येथे झाला. त्याला चार मुले होती, त्यापैकी फतेहचंद हा वारस बनला. सन १९१२ मध्ये फतेहचंद याचा मृत्यू झाला. याचा एक मुलगा सौभागचंद हा होता, पण त्याचाही खून झाला. या काळात या घराण्याकडे केवळ महात्मापूर, काठगोळ पॅलेस आणि त्यातील आदिनाथ मंदिर यांशिवाय काहीच राहिले नाही. ज्या घराण्याने आर्थिकदृष्ट्या बंगालवर राज्य केले होते, त्या घराण्याची ब्रिटिशांच्या आगमनाने वाताहत झाली.

संदर्भ :

  • Taknet, D. K. The Marwari Heritage, International Institute of Management and Entrepreneurship (IIME), Jaipur, 2015.
  • Little, J. H. House of Jagatseth, Calcutta Historical Society, Calcutta, 1967.
  • सिंह, पारसनाथ, जगतशेठ, भारती भंडार, प्रयाग, १९५०.

                                                                                                                                                                                       समीक्षक : अवनीश पाटील