ऊर्मिला पवार :  (७ मे इ.स. १९४५). ऊर्मिला हरिश्चंद्र पवार. मराठी साहित्यातील ज्येष्ठ लेखिका वैचारिक, समीक्षात्मक,संशोधनात्मक लेखन,एकांकिका व कथालेखन आत्मचरित्रलेखन असे विविध लेखनप्रकार हाताळणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या.  ऊर्मिला पवार यांच्या ‘ आयदान ‘ या आत्मकथनाने मराठी साहित्यातील दलित स्त्रीवादी आत्मकथेला ऐतिहासिक वळण दिले.

ऊर्मिला हरिश्चंद्र पवार यांचा जीवन परिचय

ऊर्मिला हरिश्चंद्र पवार यांचा जन्म रत्नागिरी जिल्यातील फणसावळे या गावी  झाला.  ऊर्मिला पवार यांचे माहेरचे नाव विमल अर्जुन पवार होय. वडील प्राथमिक शाळा शिक्षक होते. लग्नापूर्वी उर्मिला यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते (१९६३).लग्नानंतर त्या जिद्दीने पुढे शिकल्या.  मुंबईला येवून त्यांनी मराठी वाङ्मय ह्या विषयात पदव्युत्तर पदविका मिळवली. त्या  पुढे महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीला लागल्या (१९६६). सिद्धार्थ महाविद्यालयातून १९८३ साली त्यांनी एम.ए.ची पदवी मिळवली. त्यांनी आंबेडकरी चळवळीत सक्रीय सहभाग घेतला, संघटना बांधल्या. ‘संवादिनी दलित स्त्री साहित्य मंच’ ही संस्था स्थापन केली (१९८७) आणि‘आकार कोकणस्थ दलित महिला संघटना’ स्थापन केली (१९९०). १९७६ पासून त्यांचे विविध  वैचारिक लेख प्रकाशित झाले आहेत, त्यांनी  परिसंवादातून विविध विषयांवर शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या कथा आणि वैचारिक लेख स्त्री उवाच, लोकसत्ता, मिळून साऱ्या जणी या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले. त्यांनी विविध नाट्यकलाकृतीत भूमिका सादर केल्या (१९६० ते १९७५). मुंबई विद्यापीठ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र, येथे अधिव्याख्यात्या म्हणून काम केले आहे (२००६). विविध सामाजिक संस्थाची संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले.  मुंबई सार्वजनिक बांधकाम खात्यातून प्रमुख आरेखक या पदावर असताना २००० ला स्वेच्छानिवृत्ती घेतली.

उर्मिला पवार यांची साहित्य संपदा

उर्मिला पवार यांनी साहित्य क्षेत्रात अत्यंत महत्वाचे योगदान दिले आहे. कथासहावं बोट (१९८८), चौथी भिंत (१९८९) हातचा एक (२००४); प्रवास वर्णनमॉरिशस एक प्रवास (१९९४); एकांकिकाइलास पावन्यानू बसाबसा, मुक्ती (१९९६); आत्मकथनआयदान (२००३); वैचारिक –  डॉ. आंबेडकर जीवन कालपट (२००३,) दलित लेखिका आणि त्यांच साहित्य (२०१०), कोकणातील दलितांचे रितीरिवाज आणि लोकगीते,(२०२०), निळे आभाळ सोबतीला (आयदान नंतरचा अवकाश २०२४); आम्हीही इतिहास घडवला (आंबेडकरी चळवळीत स्त्रियांच योगदान, सहलेखिका, मीनाक्षी मून १९८९),भाषांतर – उदान-बौध्द तत्त्वज्ञानपर कथा (१९८९).  आपल्या बालपणासंबंधीचे अनुभव  त्यांनी अबब हत्ती या मुलांच्या मासिकासाठी लिहिले आहेत (१९८९). त्यांच्या आयदान या आत्मकथनाचा इंग्रजी अनुवाद The weave of my life या शीर्षकाने  प्रकाशित झाला आहे (२००८).आयदान तमिळ,कन्नड व हिंदी भाषेतही अनुवादित झाले आहे. त्यांच्या कथा आणि इतरही साहित्याचे विविध भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत.

उर्मिला पवार यांच्या लेखनातील विचारप्रवाह

उर्मिला पवार यांच्या आयदान आत्मचरित्राच्या माध्यमातून सामान्य दलित स्त्रीच्या जगण्याची चर्चा जागतिक पातळीवर झाली. आयदान हे आत्मचरित्र भारतातील अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.कोकणातील संस्कृती,भाषा, प्रथा परंपरा यांची महिती त्यात मिळते. त्यांच्या आत्मचरित्रात  दलित स्त्रीच्या प्रेमविषयक भाव-भावना प्रथमच आल्या आहेत.दलित स्त्रीच्या लैंगिक जाणीवा विषयीचे लेखन आयदान मध्ये प्रथमच असल्यामुळे  हे आत्मचरित्र वेगळेपण असलेले व मराठी साहित्यातील आत्मचरित्रलेखनाच्या परंपरेला समृद्ध करणारे आहे.

मॉरिशस एक प्रवास हे प्रवास वर्णन असले तरी प्रवासात जे दिसले एवढेच वर्णन नाही तर ब्रिटिशांनी भारतातून जे कामगार मॉरिशस ला नेले त्या कामगार लोकांचे जगणे, त्यांचे संघर्ष, त्यांच्या जाणीवा, तेथील स्त्रियांच्या भावना, त्यांची अभिव्यक्ती याचाही शोध या प्रवासवर्णनात आहे.मॉरिशस मधील मानवी सुखदुखाची कष्टभोगाची समाजव्यवस्थेची व त्या व्यवस्थेतील उणे अधिकपनाची वास्तव रेखाटणे आहेत.  हे प्रवास वर्णन म्हणजे भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशामधील सामाजिक सांस्कृतिक संबंधांचा धागा उलगडून दाखवणारे महत्वाचे साधन आहे.

उर्मिला पवार यांच्या कथांमध्ये  स्त्री ही स्त्रीची शत्रू नसून, त्या एकमेकीना कशा पूरक आहेत याचे प्रतिबिंब दिसते. त्यांच्या कथेतील स्त्री ही करारी, स्वाभिमानी आणि वेळप्रसंगी जशास तसे उत्तर देऊ शकेल एवढी सक्षम आहे.बुद्ध फुले आंबेडकर या वारश्यावर उभारलेल्या स्त्रीवादी दृष्टीच्या मांडणीचा दस्तऐवज त्यांच्या कथांमध्ये आला आहे .स्त्रियांच्या मनात बुद्ध फुले आंबेडकर यांच्या वारश्यातून घडलेले परिवर्तन आणि त्यांचे व्यक्तिगत तसेच सामुहिक जीवनाशी असणारे नाते मांडताना त्यांनी त्यांच्या कथांमधून जी  भेदक पण करुणामय  दृष्टी वापरली ती उर्मिला पावर यांच्या कथेचा गाभा आहे.

कोकणातील दलितांचे रीतीरिवाज, लोकगीते अशा सांस्कृतिक जीवनावरही त्यांनी लिहिले आहे. या गाण्यामधून कोकणातील सामाजिक, आर्थिक वास्तव समजते आणि कोकणातील दलितानी विशेषत: महार लोकांनी बुद्ध धम्म स्वीकारला आणि त्यांच्यात सांस्कृतिक बदलला सुरवात झाली. कोकाणातीत दलित जातीमध्ये येणाऱ्या सर्व जातींच्या  पूर्वापार चालत आलेल्या रूढी रिवाजांचा,सणावारांचा अभ्यास लोकगीतांच्या  माध्यमातून त्यांनी  केला आहे. त्यात जात्यावरची गाणी, मुलांचा जन्म ते लग्नविधी, सण व  उत्सव, रीतीरिवाज, भलरी व बालगीते, कोकणातील  जातीवाचक  म्हणी, उखाणे, वाक्प्रचार अशा  वेगवेगळ्या बाजू अभिव्यक्त केल्या आहेत.

आम्हीही इतिहास घडवला हे त्यांचे  संशोधनपर पुस्तक होय. या पुस्तकाने साहित्यक्षेत्रा व्यतिरिक्त ऐतिहासिक लेखन, स्त्रीवादी लेखन व आंबेडकरी चळवळीच्या सांस्कृतिक ऐतिहासिक लेखनाला समृध्द केले. दलित स्त्रीवादी साहित्य लिखाणाला प्रेरणा देण्याचे काम या ग्रंथाने केले. दलित स्त्रियांच्या दलित चळवळीतील योगदानाची नोंद घेण्याचे महत्वपूर्ण काम या ग्रंथाच्या माध्यमातून उर्मिला पवार यांनी केले.

उर्मिला पवार यांना मिळालेले मानसन्मान

उर्मिला पवार यांनी केलेल्या साहित्य सेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अस्मितादर्श पुरस्कार (१९८९), साहित्य संस्कृती मंडळ,  महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार(१९८९), शकुंतला नेने पुरस्कार(१९९२), को.म.साहित्य परिषदेचा व्ही.सी.गुर्जर पुरस्कार(१९९५), आयदान आत्मचरित्राला प्रियदर्शी अकादमी मुंबई (२००४), पद्मश्री विखे पाटील पुरस्कार,प्रवरा (२००४), महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका (२००४),मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार सातारा (२००५), क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, मुंबई (२००६), बंगळूरु येथील बोधी वर्धना पुरस्कार(२०१४), हिरकणी पुरस्कार मुंबई (२०१६),लेखक गोपीचंद साहित्य पुरस्कार , हैदराबाद (२०१८), गेटवे लिट फेस्टिव्हल, जीवन गौरव पुरस्कार, मुंबई (२०१९) अशा अनेक पुरस्कारांचा त्यात समावेश आहे . उर्मिला पवार यांनी अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवले आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन, संगमनेर (२००५), बौद्ध साहित्य संमेलन, चिमूर (२०१०),विद्रोही साहित्य संमेलन, धुळे (२०१२),मातोश्री रमाबाई आंबेडकर साहित्य संमेलन , मुंबई (२०१४),समबुद्ध महिला साहित्य संमेलन , नागपूर (२०१७) इत्यादी संमेलनांचा त्यात समावेश आहे. नेपाळ, स्वीडन, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड अशा विविध देशांत त्यांच्या साहित्याचा सन्मान झाला आहे. त्यांच्या अनेक साहित्यकृती शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत.

दलित स्त्रियांचे जगणे, त्यांच्या जाणीवा यांना उर्मिला पवार यांनी जागतिक पातळीवर नेऊन ठेवले आहे. त्यांनी भारतीय स्त्रीवादाला दलित स्त्रियांच्या स्त्रीवादी इतिहास लेखनाने समृध्द केले आहे. त्यांचे लेखन राज्य आणि देश पातळीवरच नाही तर जागतिक पातळीवर अभ्यासले गेलेले आहे.

संदर्भ :

  • अंभोरे उषा,धेंडे धनंजय (संपा), चौकटीत न मावणार व्यक्तिमत्व : उर्मिला पवार (गौरव ग्रंथ ), प्रेरणाभूमी प्रकाशन,सोलापूर, २०२२.
  • पवार ,उर्मिला,आयदान, ग्रंथाली, मुंबई, २००८.
  • पवार, उर्मिला, कोकणातील दलितांचे रीतीरिवाज आणि लोकगीते, पॉप्युलर प्रकाशन,मुंबई, (२०१९).