शंख घोष : ( ५ फेब्रुवारी १९३२ ते २९ एप्रिल २०२१). भारतीय भाषांतील सुप्रसिद्ध बंगाली कवी . त्यांचा जन्म ‘चांदपूर’ या तत्कालीन बंगाल प्रेसिडेन्सीमधील छोट्या गावी झाला होता. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ‘पबना’ इथे झाले होते. त्यांनी प्रेसिडेन्सी महाविद्यालय , कोलकाता इथून पदवी प्राप्त केली होती (१९५१ ). त्यांनी तत्कालीन कलकत्ता विश्वविद्यालयातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती (१९५४). शंख घोष यांनी अनेक महाविद्यालयातून अध्यापन केले. त्यात बंगवासी महाविद्यालय , तसेच सिटी महाविद्यालय या कलकत्ता विश्वविद्यालायाशी संबंधित महाविद्यालयांचा समावेश होता. नंतर त्यांनी जादवपूर विश्वविद्यालय, जंगीपूर महाविद्यालय , बरेहामपूर महिला महाविद्यालय इथूनही शिकवले. ते १९९२ मध्ये जादवपूर विश्वविद्यालयातून निवृत्त झाले. त्यांनी दिल्ली विश्वविद्यालय , शिमला येथील भारतीय उन्नत अध्ययन संस्थान आणि विश्वभारती विश्वविद्यालय इथेही शिकवले होते.
शंख घोष यांनी वयाच्या १२ व्या वर्षी कविता लिहायला सुरुवात केली होती. देशाच्या फाळणीने त्यांना आपले जन्मस्थान सोडायला भाग पडले. तेव्हा ते घराच्या शोधात कोलकाता इथे आले. आणि त्याचवेळी त्यांच्या साहित्यिक जीवनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यांच्या कवितांचे स्वागत सामान्य वाचकांनी तर केलेच पण समीक्षकांनी देखील मोठ्या उत्साहाने केले. १९५० मध्ये त्यांच्या सुरुवातीच्या कवितांमधील एक कविता पाथेय या काव्य नियतकालिकात प्रकाशित झाली होती. त्या नियतकालीकाचे संपादक बंगालीमधील प्रसिद्ध कवी बुद्धदेव बोस हे होते ( १९०८ -१९७४), पाथेयमध्ये कविता प्रकाशित झाल्यावर शंख घोष यांची कविता परिचय या नियतकालिकात प्रकाशित झाली. त्या कवितेचे शीर्षक होते ‘यमुनावती’. परिचय हे डाव्या विचारसरणीचीचे विचार मांडणारे नियतकालिक होते. त्याचे संपादक वामपंथी कवितेचे प्रवर्तक सुभाष मुखोपाध्याय हे होते. ही कविता विरोध प्रकट करताना पोलिसांच्या गोळीने एका मुलीचा मृत्यू होतो यावर आधारित होती. युवा कवींचा अन्य एक गट देखील त्यांनी १९५३ मध्ये कृत्तिवास या कवितेसाठी सुरु केलेल्या नियतकालिकात शंख घोष यांची कविता छापू इच्छित होता. त्यात ते यशस्वी देखील झाले. शंख घोष यांची ‘ दिनगुलि-रातगुलि’ (दिवस आणि रात्र) ही कविता या नियतकालिकातील पहिल्या अंकातील पहिली कविता ठरली. घोष यांनी दुसऱ्या अंकात देखील पूर्वीप्रमाणेच प्रथम स्थान प्राप्त केले. त्यानंतर १९५६ मध्ये कृत्तिवासनेच त्यांचा पहिला काव्यसंग्रह दिनगुलि-रातगुलि (दिवस आणि रात्र) हा प्रकाशित केला. जवळ जवळ एक दशकभर शंख घोष त्या नियतकालीकाशी जोडलेले राहिले. पण हा संबंध केवळ लेखनापुरताच मर्यादित राहिला. आपल्या सरळ आणि नम्र स्वभावामुळे घोष नेहमीच अलिप्त राहिले.
कृत्तिवास या नियतकालिकाने स्वातंत्र्यानंतरच्या बंगाली कवितेवर मुद्रा उमटवलेली होती. या नियतकालिकाचे सदस्य, लेखक नंतरच्या काळात महत्वपूर्ण कथाकार म्हणून अधिक प्रसिद्ध झाले. तर काही सदस्यांनी कविता लिहिणेच सोडले. पण शंख घोष यांनी कविता लिहिणे सोडले नाही. बंगाल साहित्यातील विविध साहित्यप्रकाराच्या विकासकाळात , शंख घोष अत्यंत सावधपणे कविता लिहित होते. पहिला कविता संग्रह १९५६ मध्ये प्रकाशित झाल्यावर त्यांनी १९६० पर्यंत स्वतःला कवितेपासून सुनियोजित पद्धतीने दूर ठेवले होते . या काळात त्यांनी खूप लिहिले पण खूप कमी प्रकाशित केले. १९६७ पर्यंत त्यांनी दुसऱ्या कविता संग्रहासाठी कविता एकत्रित केल्या नाहीत. आपल्या पहिल्या संग्रहानंतर १२ वर्षांनी शंख घोष यांनी शंख घोषेर श्रेष्ठ कविता (शंख घोष यांच्या श्रेष्ठ कविता- १९७०) या संग्रहाच्या प्रस्तावनेत लिहिले “कधी कधी कुणा कवीला एका कवितेसाठी दिवसेंदिवस थांबावे लागते. पण माझे मात्र तसे नाही. पुनरावृत्तीला मात्र मी थारा देत नाही. म्हणून मी कमी लिहितो. त्याची मला भीती वाटत नाही”. या एका सिद्धांताचे शंख घोष यांनी आयुष्यभर पालन केले.
शंख घोष यांची साहित्य संपदा : कविता : दिनगुलि-रातगुलि (दिवस आणि रात्र,१९५६ ), नीहित पाताल छाया (मातीची निष्क्रिय सावली, १९६७ ), शंख घोषेर श्रेष्ठ कविता (शंख घोष यांच्या श्रेष्ठ कविता- १९७०), आदिम लता गुल्ममय (१९७२), मुर्खा बडो, सामाजिक नय (एक महान मूर्ख, पर्याप्त सामाजिक नाही-१९७४), बाबरेर प्रार्थना– १९७६, तुमि तो तेमाने मौरी नओ (तू तर तितकी गोरी नाहीस- १९७८), पांजोरे डांडेर शब्द (मणक्याच्या हाडा दरम्यान, १९८०), प्रहार जोडा त्रिताल (१९८२), गांधर्व कविता गुच्छ (१९९४), चांदेर भीतरे एतो अंधकार (१९९९ ) आणि जल ए पाषाण हए आछे ( २००४) ; समीक्षणात्मक ललित लेखन : नि:शब्देर तर्जनी (१९७१ ), शब्द आर सत्य (१९८२), कल्पनार हिस्टीरिया (१९८४ ), कविता लेखा कवितापद (१९८९ ), कविर वर्मा (१९८९), इसारा अविरत ( १९९९ ); अनुवाद : बहुल देवता, बहुल स्वर (१९८६ ) इत्यादी.
दिनगुलि –रातगुलि हा छोटा संग्रह असला तरी त्यात अनेक विषयावरील कविता आहेत. त्यातील एक कविता ९३ ओळींची आहे. यात कवीने अशा एका आत्म्याचा ताण चित्रित केला आहे जो बाह्य जगतात उडण्यासाठी तयार होतो. त्यासाठी कविता आणि प्रिया आपापसात मिसळून जातात. कवितेचा आरंभ काळ्या रात्रीपासून होतो आणि शेवट तांबडे फुटण्याने होतो. या कवितेत संस्कृतनिष्ठ भाषा वापरली आहे. ‘स्वदेश, स्वदेश कारिश कारे’ ही त्या संग्रहातील अजून एक कविता सरल सुबोध आहे. यातीलच ‘यमुनाबती’ या कवितेत कवीने बाल कवितेतील भाषा आणि लोकधुन वापरली आहे. व्यक्तिगत अनुभवावर आधारित कविता आणि सामाजिक प्रतिबध्दतेच्या कविता अशा दोन प्रकारच्या कवितांचा समावेश या कविता संग्रहात आहे.
शंख घोष यांचा दुसरा कविता संग्रह नीहित पाताल छाया हा एका दशकानंतर प्रकाशित झाला. अर्थात त्या दशकात लिहिलेल्या इतर कविता नंतर दोन संग्रहातून प्रकाशित झाल्या. पहिला संग्रह आदिम लता गुल्ममय आणि दुसरा संग्रह तुमि तो तेमाने मौरी नओ हा आहे. कवितेच्या या तीनही संग्रहात साठच्या दशकात लिहिलेल्या कवितांचे संकलन आहे. या संग्रहातून घोष यांच्या स्फुट कविता देखील आहेत. ते त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य आहे. या कवितांच्या ओळी छोट्या आणि सामान्य असतात. त्यांना अलंकारिक भाषेपासून दूर ठेवलेले असते. पण त्यात अर्थपूर्ण शब्दांचा उपयोग केलेला असतो.
पांजोरे डांडेर शब्द या त्यांच्या नंतरच्या काव्यसंग्रहामधील कवितेने गीतात्मकतेत एक नवी उंची गाठली आहे. यात चार ओळीच्या ६४ कविता आहेत. पण या सगळ्या कवितांत एक संगितात्मक लय आहे. सहाव्या दशकाच्या शेवटी पश्चिम बंगाल हिंसेने ग्रासला होता. १९५० च्या दशकाच्या सुरुवातीला उत्तरी बंगालच्या नक्षलबाडी गावात जे कृषक आंदोलन सुरु झाले होते ते नवीन क्रांतिकारी स्वरूपात पुढे आले होते. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात हिंसा झाली. या आंदोलनाने तरुण वर्गाचे खूप नुकसान केले. या संदर्भात शंख घोष यांनी अनिश्चितता आणि भयाचे चित्रण केले आहे. मुर्खा बडो, सामाजिक नय आणि बाबरेर प्रार्थना या दोन कविता संग्रहात हे चित्रण आढळते. या कविता संग्रहांतील कविता एक प्रकारचे आक्रमण, उपरोध आणि ताण या साठी ओळखल्या जातात. बाबरेर प्रार्थना या कविता संग्रहातील कविता आणीबाणीच्या काळात लिहिल्या गेलेल्या होत्या. त्यातून शंख घोष निर्भयतेचा पुरस्कार करतात.
काव्यलेखनाबरोबरच शंख घोष यांनी गद्य लेखनही केले आहे. त्यांचे पहिले गद्य १९व्या शतकातील समाजसुधारक विद्यासागर यांचे संक्षिप्त चरित्र होते . त्यांचे दुसरे गद्य पुस्तक नि:शब्देर तर्जनी हे १९७१ मध्ये प्रकाशित झाले. हा एक छोटासा निबंध आहे. यात काव्याच्या शक्तीविषयी त्यांनी लिहिले आहे. त्यांना जाणवले की, खरी कविता पतनाची अनुमती देत नाही. कारण त्याचा परिणाम विकृत आणि अन्तत: कवितेचा नाश हाच आहे. ते बंगाली साहित्याचे प्राध्यापक असले तरी शंख घोष यांनी स्वतःला प्राध्यापकीय समीक्षेपासून दूर ठेवले. शंख यांचे समीक्षेचे पहिले पुस्तक कालेर मात्राओ रवींद्र नाटक ( १९६९) हे रवींद्रनाथांच्या नाटकांच्या संदर्भातील आहे. या पुस्तकात त्यांचे १३ लेख संकलित केलेले आहेत. त्यातून ते टागोर यांच्या नाटकात यात्रा आणि अन्य बंगाली नाट्यकलेच्या स्थानिक प्रकारांचे कसे योगदान आहे हे दाखवतात. त्याच बरोबर ते त्यांच्या काही नाटकांचा युरोपीय नाटकांच्या बरोबर तुलनात्मक अभ्यास देखील करतात.
१९६३ मध्येच शंख घोष यांनी आलोक रंजन दासगुप्ता यांच्या साथीने सप्त सिंधू दस दिगंत हा कवितासंग्रह संपादित केला. यात अनेक भाषांमधील कविता होत्या. त्यांनी तेलगु कवी चेरबन्दराजूर यांच्या कवितांचे अनुवाद केले. मलयालम कवी कुमार आसन आणि उर्दू कवी इकबाल यांच्या विषयीचे लेख लिहिले. त्यांनी अनुवादित केलेल्या कवितांचा बहुल देवता, बहुल स्वर ( अनेक ईश्वर , अनेक स्वर- १९ ८६) हा संग्रह देखील आहे.
शंख घोष यांना अनेक सन्मान प्राप्त झाले होते. त्यात साहित्य अकादमी पुरस्कार (१९०७ ), सरस्वती सन्मान ( १९९८) पद्मभूषण (२०११), ज्ञानपीठ पुरस्कार ( २०१६ ) या महत्त्वाच्या पुरस्कारांचा समावेश आहे. २०१४ मध्ये त्यांनी एक महत्वपूर्ण सर्वेक्षण प्रकाशित केले होते. त्यात पश्चिम बंगालमधील मुस्लिम समाजाच्या गरिबीचे संशोधन मांडले होते.
कोविड-19 (कोरोना) या आजाराचा संसर्ग झाल्याने या आजारातच कोलकाता इथे शंख घोष यांचे निधन झाले.