महाराष्ट्रातील लोकप्रसिद्ध आठ पवित्र गणपती क्षेत्रांतील गणपतींना ‘अष्टविनायक’ म्हणतात. ही महाराष्ट्र राज्यातील आठ मानाची आणि प्रतिष्ठेची गणपतीची मंदिरे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. बहुतेक मंदिरे ही हेमाडपंथी शैलीत, दगडी बांधकामात आहेत. इ.स. १२ व १३ व्या शतकामध्ये यादवकाळात हे बांधकाम झालेले आहे. मंदिर रचनेप्रमाणे गर्भगृह (मूर्ती), मंडप आणि दीपमाळ असते. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले.
महाराष्ट्रातील ‘आठ’ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना व मूर्तींना विशेष महत्त्व आहे. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे ‘अष्टविनायक’. त्यांची नावे, स्थाने व जिल्हे अनुक्रमे पुढीलप्रमाणे होत : (१) मोरेश्वर (अथवा मयूरेश्वर) मोरगाव, जि. पुणे. (२) सिद्धिविनायक सिद्धटेक, जि. अहिल्यानगर. (३) बल्लाळेश्वर पाली, जि. रायगड. (४) वरदविनायक (अथवा विनायक) महड (अथवा मढ), जि. रायगड. (५) चिंतामणी थेऊर, जि. पुणे. (६) गिरिजात्मज लेण्याद्री, जि. पुणे. (७) विघ्नेश्वर ओझर, जि. पुणे. (८) श्रीगणपती रांजणगाव, जि. पुणे. ही सर्व स्वयंभू मानली जातात. ‘गणेशपुराण’ व ‘मुद्गलपुराण’ यांतील गणपतीसंबंधीच्या निरनिराळ्या कथा लौकिक रूढीने वरील क्षेत्रांशी निगडित झालेल्या आहेत. ‘मुद्गलपुराणा’त मयूरेश्वराला सर्वांत श्रेष्ठ म्हटले असून, इतर आठ ‘महागणपती’ही दिले आहेत. त्यांतील काही महाराष्ट्रातील, तर काही महाराष्ट्राबाहेरचे आहेत. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून, तो सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेशभक्तांची भावना आहे.
श्रीगणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या; परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहिल्यानगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) अशी ही ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा उजव्या सोंडेचा गणपती आहे व इतर (मान्यतेनुसार) महडचा वरदविनायक व रांजणगावचा महागणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे आहेत. महाराष्ट्रातील भाविकांना या यात्रेचे विशेष महत्त्व वाटते.
१. मोरगाव (मोरेश्वर) : अष्टविनायकांपैकी पहिला गणपती श्रीमोरेश्वर हा मोरगावचा आहे. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. यास अष्टविनायक यात्रेतील आद्यपीठ मानले जाते. मंदिराचा आकार मोरासारखा आहे, म्हणून यास मयुरेश्वर हे नाव पडले. हे मंदिर कऱ्हा नदीच्या काठावर सुपीक मैदानी भागात आहे. या ठिकाणी गणपतीने मयूर (मोर) वाहन घेऊन सिंधु राक्षसाचा वध केला. श्रीमोरेश्वर गणेशाचे हे आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘सुखकर्ता दुःखहर्ता…’ ही आरती समर्थ रामदासस्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.
२. थेऊर (चिंतामणी) : अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्रीचिंतामणी हा दुसरा गणपती आहे. हे मंदिर मुळा-मुठा नदी संगमाजवळ सुपीक मैदानावर आहे. राजा गणासुर याचा पराभव करून चिंतामणी नावाचे रत्न परत मिळवून दिले, त्यामुळे त्याला चिंतामणी हे नाव मिळाले. चिंचवडचे सत्पुरुष चिंतामणी महाराज देव यांनी सु. ४०,००० रु. खर्चून हे गणपती मंदिर बांधले. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला.
३. सिद्धटेक (सिद्धिविनायक) : सिद्धटेकचा श्रीसिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. सिद्धिविनायकाचे हे मंदिर भीमा नदीच्या काठी लहान टेकडीवर वसलेले आहे. भगवान विष्णूंनी तब करून येथे सिद्धी प्राप्त केली अशी कथा आहे. तसेच महर्षी व्यास यांनी या ठिकाणी यज्ञ आणि तपश्चर्या केली होती असे मानतात. मंदिराभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी पाच किमी. संपूर्ण डोंगर फिरावा लागतो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे.
४. रांजणगाव (महागणपती) : अष्टविनायकांपैकी चौथा गणपती रांजणगावला आहे. या गणपतीला श्रीमहागणपती असे म्हणतात. हे मंदिर मैदानी भागात (पठार) आहे. हे महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी महागणपतीचे रूप धारण केल्याने अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान गणपती समजला जातो. महागणपतीला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. या महागणपतीला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.
५. ओझर (विघ्नेश्वर) : अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्वर किंवा विघ्नहर्ता हा पाचवा गणपती आहे. या गणपतीचे मंदिर कुकडी नदीच्या काठावर वसलेले आहे. विघ्नहर्ता म्हणजे विघ्ने-अडथळे दूर करणारा. गणपतीने विघ्नसुराचा वध केला म्हणून त्याला विघ्नहर्ता म्हटले जाते. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकांपैकी सर्वांत श्रीमंत गणपती म्हणून विघ्नेश्वराला ओळखले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सोन्याचा कळस आणि सुंदर दीपमाळ आहे.
६. लेण्याद्री (गिरिजात्मज) : अष्टविनायकांपैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्रीगिरिजात्मज. हे मंदिर डोंगरातील गुहेत खडकात कोरलेले असून सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्यामध्ये आहे. ‘गिरीजा’ म्हणजे पार्वती आणि ‘आत्मज’ म्हणजे पुत्र म्हणजेच पार्वतीचा पुत्र. किल्ले शिवनेरीच्या सान्निध्यात, जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्रीगिरिजात्मज गणेशाचे हे स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे.
७. महड (वरदविनायक) : महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. या मंदिराजवळ पाणवठा असून हा परिसर हिरवाईने नटलेला आहे. वरद म्हणजे भक्तांना वरदान देणारा आणि विनायक म्हणजे गणपती म्हणून वरदविनायक म्हटले जाते. या स्थानास मठ असेही म्हणतात. श्रीवरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.
८. पाली (बल्लाळेश्वर) : पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्रीबल्लाळेश्वर म्हणतात. हे मंदिर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जंगल व डोंगरांनी वेढलेले आहे. भक्त बल्लाळ याच्या नावावरून या मंदिराला बल्लाळेश्वर नाव पडले. भक्ताच्या नावावर असलेले हे एकमेव मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात आणि नाभित हिरे आहेत.
यात्रा : भारतीय संस्कृतीत गणेश उपासनेला महत्त्वाचे स्थान असल्याने कोणत्याही शुभकार्याच्या प्रसंगी ‘विघ्नहर्ता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीची पूजा केली जाते. महाराष्ट्रात गणेश उपासना ही अष्टविनायक यात्रेतून पूर्ण केली जाते. अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भाविकांसाठी भोजनाची व निवासाची व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहिल्यानगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. अष्टविनायक यात्रेला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. गणेश भक्तांसाठी ही यात्रा आध्यात्मिक साधना मानली जाते तसेच आपल्या कार्यातील विघ्नांचा नाश होतो असे मानले जाते. निरनिराळ्या रूपांत श्रीगणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो.
संदर्भ :
- Swami, Manjusha Sanjay, Saptarang, Mumbai, 2020.
- खेर, द. म. ‘श्री अष्टविनायक’, पुणे, १९६२.
- ग्रेवाल, रॉयिना, ‘देवा तुची गणेशा’, मुंबई,
- देशमुख, शहाजीराव बा. ‘महाराष्ट्र पर्यटन’, कोल्हापूर, २०१६.
- यंगलवार, विजय, ‘श्रीगणेशमाहात्म्य’, नागपूर, २०१३.
समीक्षक : बाळासाहेब मुळीक
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.