महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही अतीदुर्गम जिल्ह्यांचा शैक्षणिक व इतर कार्यक्षेत्रांचा विकास व्हावा, या दृष्टिकोणातून गडचिरोली येथे स्थापन करण्यात आलेले विद्यापीठ. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ (१९९४ चा महा. ३५) च्या कलम ३ च्या पोटकलम (२) अन्वये महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ (सन २०१७ चा महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम क्रमांक ६) नुसार २ ऑक्टोबर २०११ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विभाजन होऊन या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू विजय आईंचवार होते. सध्या डॉ. प्रशांत बोकारे हे विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. श्रीराम कवाळे हे उपकुलगुरू, तर डॉ. अनिल हिरेखण हे कुलसचिव आहेत (२०२५). ‘ज्ञानादेव तू कैवल्यम्’ (ज्ञानातूनच मोक्ष प्राप्ती होते.) हे विद्यापीठाचे घोषवाक्य आहे. विद्यापीठाचे कार्यालयीन कामकाज सोमवार ते शनिवार सकाळी १०.०० ते १.३० आणि दुपारी २.०० ते ५.३० (दुसरा व चौथा शनिवार वगळून) सुरू असते.
विद्यापीठ स्थापनेपूर्वी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील अनेक महाविद्यालयांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात जाऊन प्रशासकीय कामे करणे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रासाचे होते. परिणामत: चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी गडचिरोली हे विद्यापीठाचे प्रथम उपकेंद्र व नंतर कायमचे विद्यापीठ म्हणून गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विभाजनाच्या वेळी १७७ महाविद्यालये गोंडवाना विद्यापीठाला हस्तांतरित करण्यात आली होती. त्यानंतर नवीन महाविद्यालयांना मान्यता मिळाल्याने सध्या गडचिरोली जिल्ह्यात ७९ आणि चंद्रपूर १३३ अशी एकूण २१२ महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत (२०२५).
गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांतील लोकांचे जीवनमान तेथील वनसंपदा व नैसर्गिक साधनांवर आधारित असून ते पारंपरिक व्यवसाय पद्धतींचा अवलंब करून आपली उपजिविका करतात. त्यामुळे येथील उच्च शिक्षणाचे सरासरी प्रमाण राष्ट्रीय प्रमाणापेक्षा फार कमी असल्याने या भागातील युवक मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. या बाबीकडे लक्ष केंद्रित करून स्वयंरोजगारभिमुख नवीन शैक्षणिक उपक्रम राबविणे, येथील नैसर्गिक संसाधनांवर आधारित ज्ञानाची निर्मिती करणे, ते ज्ञान शिक्षणाच्या माध्यमातून स्थानिक व इतर अध्ययनकर्त्यांपर्यंत पोहोचवून त्यांचा व तेथील लोकांचा विकास करणे इत्यादी विद्यापीठाचे मुख्य कार्य आहे. तसेच विविध वयोगटांतील पात्र विद्यार्थ्यांच्या गरजा, उद्देश, अपेक्षा आणि योजना लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यास विद्यापीठ कटीबद्ध आहे. येथील भाषा, संस्कृती, समाजव्यवस्था यांवर संशोधनपूर्वक अभ्यास करून त्यांचे महत्त्व नवीन पिढीला करून देणे; ग्रामीण आणि निमशहरी भागातील युवकांना पारंपरिक शिक्षणासह व्यावसायिक आणि जागतिक पातळीचे कौशल्ययुक्त शिक्षण देऊन जागतिक समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी तयार करणे; कमीत कमी खर्चात एक उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे इत्यादी या विद्यापीठाचे उद्देश आहे.
विद्यापीठात एकूण ११ अध्यासन केंद्रे आहेत. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र, आदिवासी अध्यासन केंद्र, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता अध्यासन केंद्र, जगद्गुरू संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्र, एकात्म मानवतावाद अध्यासन केंद्र, वामनदादा कर्डक अध्यासन केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र, महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्र, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्र, युगनायक स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्र आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अध्यासन केंद्र यांचा समावेश होतो. या केंद्रामार्फत त्या त्या महापुरुषांच्या विचारांचा आणि कार्यांचा विद्यार्थ्यांमध्ये प्रसार आणि प्रचार केला जातो.
विद्यापीठामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित संसाधनिक केंद्रे स्थापन करण्यासाठी राजीव गांधी तंत्र व विज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी पुढाकार घेतला असून या केंद्राला लागणारे तंत्रज्ञान व यंत्रसामग्री निर्माण करणे आणि निरंतर मार्गदर्शन करण्याचे पालकत्व आय. आय. टी., मुंबई यांनी घेतली आहे. यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील आदिवासी व मागासलेल्या विद्यार्थांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यास विद्यापीठ प्रयत्नशील आहे. त्याच प्रमाणे भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेतील सहभागात एक आदर्श विद्यापीठ म्हणून गोंडवाना विद्यापीठाची उभारणी करणे; समाजाच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना आदर्श आणि जबाबदार नागरिक बनविणे, शिक्षणात आणि देशाच्या एकूण विकासात विशेष स्थान प्राप्त करून देणे यांसाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
विद्यापीठात कला, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र, विज्ञान, शिक्षणशास्त्र, गृहविज्ञान, अभियांत्रिकी, कायदा, औषधीविज्ञान, सामाजिकशास्त्रे, विज्ञान व तंत्रज्ञान, मानव्यविज्ञा, स्वावलंबन अभ्यासक्रम, पारंपरिक विभाग, गृहविज्ञान इत्यादी एकूण १९ विद्याशाखा असून पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये इतिहास, समाजशास्त्र, इंग्रजी, मराठी, हिंदी, भूगोल उपयोजित अर्थशास्त्र, गणित, संगणकशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र, हे विषय आहेत. विद्यापीठाद्वारे जुन २०१२ पासून विद्यावाचस्पती (पीएच. डी.) या पदवीला प्रवेश मिळविण्यासाठी घेण्यात येणारी पात्रता परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत असून इतरही शाखांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतात. विद्यापीठाने सुरुवातीपासूनच सर्व शाखांच्या अभ्यासक्रमांना सत्र प्रणाली लागू केल्यामुळे गुणवत्ता यादी अंकानुसार नसून श्रेणी पद्धतीनुसार आहे. फक्त एक वर्षीय अभ्यासक्रमांना वार्षिक परीक्षापद्धती अंमलात आणली आहे. विद्यापीठाचे कामकाज चालविणे आणि विद्यार्थ्यांना संबंधित सेवा पुरविणे यांसाठी विद्यापीठात एकूण १६ प्रशासकीय विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहेत.
विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर विद्यापीठात ज्ञान केंद्र सुरू करण्यात आले. याद्वारे चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील आदिवासी बहुल भागांतील विद्यार्थी, अध्यापक व संशोधक यांच्या पारंपरिक व अपारंपरिक गरजा पूर्ण करणे, देशातील व राज्यांतील इतर वाचक व अभ्यासक यांच्या शैक्षणिक व माहितीविषयक गरजा उपलब्ध स्रोतांतून पूर्ण करणे इत्यादी कार्य करण्यात येते. तसेच या केंद्राद्वारे ग्रंथ देवाण-घेवाण, आंतरजाल, स्पर्धात्मक तयारीसाठी पुस्तके, मासिके, दैनिक वर्तमानपत्रे, रोजगार समाचार, वाचन कक्ष इत्यादी सेवा पुरविल्या जातात. ग्रंथालयाची भूमिका या विषयावर येथे कार्यशाळाही घेतल्या जातात. तसेच केंद्रामार्फत वाचकांना ग्रंथ घरी नेऊन वाचण्यासाठी परवाननगी दिली जाते.
गोंडवाना विद्यापीठ आणि गडचिरोली जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून ग्रामगीता सक्षमीकरण प्रकल्प राबविले जाते. या प्रकल्पाचे काही उद्देश निश्चित केले आहेत : (१) आदिवासी क्षेत्रातील कायदे, गौणवनोपज व लेखे-जोखे यांबाबत प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामसभेची क्षमता वृद्धी करणे. (२) वनसंवर्धन व वनव्यवस्थापन आराखड्यांबद्दल मार्गदर्शनाच्या माध्यमातून ग्रामसभेला शाश्वत उपजीविका निर्माण करणे. (३) जिल्हास्तरीय सर्व विभाग, संस्था यांच्या समन्वयाने ग्रामसभांच्या सर्वांगिण विकासासाठी काम करणे. यांसोबतच ग्रामसभांना काही विशेष सेवा पुरविल्या जातात. त्यात सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभेला प्रशिक्षण, शासकीय योजना एककेंद्रीकृत करून ग्रामसभेपर्यंत पोहोचविणे, वनसंवर्धन व वनव्यवस्थापन आराखड्यांविषयी मार्गदर्शन करणे, गौणवनोपज विपणन व प्रक्रिया यांसाठी विद्यापीठात ग्रामसभा क्षमता व सक्षमीकरण प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे इत्यादींचा समावेश आहे.
विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण विभागाकडून विविध उपक्रम राबविले जाऊन विद्यार्थ्यांत सामाजिक सेवेची आवड निर्माण केली जाते. त्यामध्ये आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा, संशोधनास चालना मिळावी या दृष्टीने आविष्कार स्पर्धा, राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे साहसी क्रीडा शिबिरे, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर, स्वयंशासन कार्यक्रम, सद्भावना पंधरवडा, जागतिक अहिंसा दिन, दत्तक घेतलेल्या गावात परिसर स्वच्छता, आरोग्य तपासणी शिबिर, पशुचिकीत्सा, लोकांचे आधारकार्ड तयार करणे इत्यादींचा समावेश आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांमधील क्षमतेला शिक्षण आणि रोजगाराची जोड देऊन आदिवासींचे कौशल्य जगासमोर आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी विद्यापीठाने २०२२-२३ या वर्षापासून आदिवासी विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशाकरिता नि:शुल्क प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. अशा विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश देणारे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले. आदिवासी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी विद्यापीठाद्वारे तालुक्यातील अतिदुर्गम भागांत संपर्क अभियान सुरू करण्यात आले. प्राध्यापक स्वतः या भागांत फिरून अशा विद्यार्थ्यांची माहिती गोळा करतात. अशा विद्यार्थ्यांना वसतीगृहात मोफत प्रवेश देऊन ‘क्रांतिवीर बाबुराव शडमाके कमवा आणि शिका’ योजनेंतर्गत त्यांना आर्थिक मदतही दिली जाते. विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याजाण्यासाठी मोफत सोय, रोजगाराचे प्रशिक्षण, तालुक्यात प्रवेशाकरिता विशेष कॅम्प व विद्यार्थी सुविधा केंद्राची सोय केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे गळतीचे प्रमाण अधिक वाढते, म्हणून अशा अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना आपले शिक्षण पूर्ण करता यावे, तसेच रोजगाराभिमुख कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यासाठी कुलगुरू डॉ. बोकारे यांच्या संकल्पनेतून ‘विद्यापीठ आपल्या गावी’ हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आले आहे. असा उपक्रम राबविणारे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जांभळी या गावापासून ते चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील बीबी, जिवती तालुक्यातील नगराळा आणि वरोरा तालुक्यातील खेमजई येथे सुरू करण्यात आला आहे. बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही कारणांमुळे अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी ६ ते १० या कालावधीत गावातच रात्रकालीन महाविद्यालये भरविले जातात. महाविद्यालयीन प्राध्यापक सायंकाळी स्वतःच्या वाहनाने त्या त्या गावांमध्ये जाऊन अध्यापन करतात.
गोंडवाना विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची सोय करण्यात आली आहे. वसतीगृह विभागाद्वारे विद्यार्थांची केवळ निवास व भोजनाचीच सोय केली जात नाही, तर त्याद्वारे उच्च विद्याविभूषित प्राध्यापकांद्वारे स्पर्धात्मक परीक्षा, नेट-सेट परीक्षेचे नि:शुल्क मार्गदर्शन, सुसज्ज ग्रंथालय व वाचन कक्ष, कमवा व शिका योजना, संगणक व आंतरजालाची मोफत सुविधा, नियमित शिकवणी वर्ग, विद्यार्थी सहायता निधी, विद्यार्थ्यांकरिता संशोधनपर मासिके व पत्रिकांची सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याकरिता संभाषण, सेमिनार व कार्यशाळांचे वेळोवेळी आयोजन अशा विविध सुविधा पुरविल्या जातात.
विद्यापीठामध्ये एक स्वतंत्र संशोधन मंडळ असून त्याद्वारे पुढील अधिकार आणि कर्तव्ये पार पाडली जातात ꞉ (१) विद्यापीठ, महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांमध्ये संशोधन संस्कृतीला चालना देण्यासाठी दीर्घकालीन धोरण आणि रणनीतीवर काम करणे; (२) वैयक्तिक आणि गट पातळीवर उदयोन्मुख क्षेत्रांत संशोधन करण्यासाठी शिक्षकांना सल्ला देणे आणि प्रोत्साहित करणे; (३) शिक्षकांमध्ये समन्वय साधून आंतरविद्याशाखीय संशोधन कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे आणि संशोधन व विकास पायाभूत सुविधांच्या सामायिकीकरणासाठी धोरणे तयार करणे आणि स्पष्ट करणे; (४) संशोधन विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांमध्ये संशोधन चर्चासत्रे आयोजित करण्यासाठी विद्यापीठ विभाग, महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांना प्रोत्साहित करणे; (५) विविध विषयांसाठी संशोधन जर्नल्स, मोनोग्राफ प्रकाशित करणे; (६) विद्यापीठ अनुदान आयोग आणि इतर नियामक संस्थांच्या निकषांनुसार पीएच. डी. पदवीसाठी संशोधनाचे मानक राखण्यासाठी धोरण ठरविणे; (७) विद्यापीठ विभाग, महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांमध्ये स्वतंत्रपणे किंवा गट क्रियाकलाप म्हणून किंवा उद्योग व इतर संशोधन आणि विकास प्रयोगशाळांच्या सहकार्याने केलेल्या कामांसाठी संशोधन आणि विकास डेटाबेस तयार करण्यावर काम करणे; (८) शिक्षण, प्रत्यक्ष भेटी आणि ई-लर्निंगचे अध्यापनशास्त्र, विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि समजुतीवर ई-लर्निंग आणि आभासी वर्गखोल्यांचा प्रभाव, खुले दूरस्थ शिक्षण आणि पारंपरिक शिक्षण या विषयांवर संशोधन करणे; (९) संशोधन उपक्रमांसाठी निधी उभारण्यासाठी शिक्षक, विद्यापीठ विभाग, महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांना प्रयत्न करणे आणि मदत करणे; (१०) विद्यापीठाच्या संशोधन उपक्रमांसाठी बजेट तयार करणे; (११) संशोधन उपक्रम वाढविण्यासाठी उद्योगातून अर्थार्जन मिळविणे; (१२) विद्यापीठाच्या अधिकारक्षेत्रातील प्रदेशाशी संबंधित समस्या ओळखणे आणि पद्धतशीर संशोधनाद्वारे अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष पुढाकार घेणे; (१३) ज्ञान व तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संशोधनाचे उत्पादक रूपांतरण वाढविण्यासाठी संशोधक व उद्योगांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी दीर्घकालीन धोरणे ठरवून त्यांवर काम करणे; (१४) उद्योगांना मूलभूत आणि उपयोजित संशोधन प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, ते स्वीकारणे आणि त्यात सहभागी होणे यांसाठी प्रोत्साहित करणे; (१५) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योगांच्या सहभागाच्या मदतीने केंद्रीय संशोधन प्रयोगशाळा स्थापन करणे; (१६) संशोधन मंडळाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ अधिकाऱ्यांनी सोपविलेले इतर कोणतेही काम हाती घेणे.
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. हिरेखण यांच्या विशेष प्रयत्नाने विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्राकरिता ‘भारतीय संविधान’ हा विषय सुरू केला जाणार आहे. तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली गोगाव येथील कॅम्पसमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख दर्शनीभागावर उभारला जाणार आहे.
विद्यापीठाच्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून २ ऑक्टोबर २०१६ पासून ‘जीवन साधना गौरव पुरस्कार’, ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’, ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’, ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’, ‘उत्कृष्ट विद्यापीठ अधिकारी पुरस्कार (वर्ग १ व २)’, ‘उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार (वर्ग ३ व ४)’ आणि ‘उत्कृष्ट विद्यार्थी/विद्यार्थींनी पुरस्कार देण्यात येते. यांशिवाय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालय, कार्यक्रम अधिकारी आणि उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनाही पुरस्कार दिला जातो. तसेच दरवर्षी पदवीदान समारंभात देणगीदारांकडून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके आणि देणगी मूल्य राशी प्रदान करून सन्मानित केले जाते.
विद्यापीठाचे सध्याचे क्षेत्रफळ एकूण १७ एकर असून सदर जागेत प्रशासकीय इमारत, पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, ज्ञान स्रोत केंद्रे, परीक्षा विभाग, मुला-मुलींचे वसतीगृहे इत्यादी आहे.
समीक्षक : के. एम. भांडारकर