सामंत, शक्ति : (१३ जानेवारी १९२६ – ९ एप्रिल २००९). हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ख्यातनाम निर्माते-दिग्दर्शक. जन्म बरद्वान (प. बंगाल) येथे. त्यांचे वडील अभियंते होते; शक्ति दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे त्यांना शिक्षणाकरिता त्यांच्या नातेवाईकांकडे डेहराडून येथे पाठविण्यात आले. त्यांचे प्रारंभीचे शिक्षण तेथेच झाले. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली (१९४४) तेथे त्यांनी हिंदी व उर्दू भाषेचे अध्ययन केले. याचा उपयोग त्यांना नंतर हिंदी चित्रपटांचे संवाद व गीते परिणामकारक करण्यासाठी करता आला. हिंदी चित्रपटात अभिनेता होण्याच्या महत्त्वाकांक्षेने ते मुंबईला आले. दापोली येथील विद्यालयात त्यांनी काही काळ उर्दू शिक्षकाची नोकरीही केली.

१९४८ मध्ये सामंत यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ते बॉम्बे टॉकीजमध्ये अशोककुमार यांना भेटले. त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी चित्रपटनिर्मितीशी संबंधित काम करण्यास सुरुवात केली आणि साहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. सुरुवातीस फणी मजुमदार, ज्ञान मुखर्जी, सतीश निगम यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. राज कपूर अभिनित सुनहरे दिन  (१९४९) या चित्रपटाचे ते साहाय्यक दिग्दर्शक होते. त्यांनी काही चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या. उदा., फणी मजुमदार दिग्दर्शित बादबान (१९५४) आणि धोबी डॉक्टर (१९५४). त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला कथात्म चित्रपट बहु (१९५४) हा होय. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले इन्स्पेक्टर (१९५६), शेरू (१९५६), डिटेक्टिव्ह (१९५७) व हिलस्टेशन (१९५७) हे चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांच्या यशानंतर त्यांनी ‘शक्ती फिल्म्स’ ही स्वत:ची चित्रपटनिर्मितीसंस्था १९५७ मध्ये स्थापन केली. या संस्थेतर्फे त्यांनी हावडा ब्रिज (१९५८) हा पहिला चित्रपट निर्माण केला. अशोककुमार आणि मधुबाला अभिनित या चित्रपटाने लोकप्रियतेचा विक्रम प्रस्थापित केला व त्यामुळे त्यांच्या कारकीर्दीला नवे वळण मिळाले.

सामंतांनी एकूण ४३ चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांतील ३७ हिंदी व ६ बंगाली चित्रपट होते. त्यांच्या सर्वोत्कृष्ट, लोकप्रिय व मनोरंजक चित्रपटांमध्ये हावडा ब्रिजचायना टाऊन (१९६२), काश्मीर की कली (१९६४), ॲन इव्हनिंग इन पॅरिस (१९६७), आराधना (१९६९), कटी पतंग (१९७०), अमर प्रेम (१९७१) इ. उल्लेखनीय आहेत. १९५०च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते १९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत सामंतांनी प्रामुख्याने शम्मी कपूरला नायक घेऊन चित्रपट दिग्दर्शित केले. नंतरच्या काळात राजेश खन्नाला नायक म्हणून घेऊन त्यांनी चित्रपट काढले. त्यांपैकी आराधना, कटी पतंगअमर प्रेम हे त्यांचे चित्रपट खूपच गाजले. राजेश खन्नाला नटश्रेष्ठ (सुपरस्टार) पदावर पोहोचवण्यात या चित्रपटांचा मोलाचा वाटा होता. आराधना ह्या चित्रपटाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. राजेश खन्ना-शर्मिला टागोर यांचा प्रभावी अभिनय व सचिन देव बर्मन यांचे सुमधुर संगीत, यांचा या चित्रपटाच्या यशात मोठा वाटा होता. त्यांनी अमानुष  हा चित्रपट हिंदी व बंगाली या दोन्ही भाषांमध्ये निर्माण केला (१९७४). भारत व बांगला देश यांच्या संयुक्त विद्यमाने, सहनिर्मिती असलेला आवाज हा चित्रपट सामंतांनी १९८४ मध्ये बनवला. कश्मीर की कली या चित्रपटापासून सामंत रंगीत चित्रपटनिर्मितीकडे वळले. त्यांच्या अन्य उल्लेखनीय चित्रपटांत जाने-अनजाने (१९७४), मेहबूबा (१९७६), आनंद आश्रम, अनुरोध (१९७७), बरसात की एक रात (१९८१) व अलग अलग (१९८५) इत्यादींचा समावेश होतो.

अतिरंजित भावुक कथानक, श्रवणमधुर संगीत व लोकप्रिय कलावंतांचा प्रभावी हृदयस्पर्शी अभिनय ही शक्ति सामंत यांच्या गाजलेल्या यशस्वी चित्रपटांची बलस्थाने होत. सामंतांच्या पत्नी व त्यांचे बंधू त्यांच्या काही चित्रपटांचे निर्माते होते. त्यांचा मुलगा अशीम सामंत यांनी दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. १९८५ मध्ये त्यांच्या शक्ती फिल्म्स संस्थेने ‘आराधना साऊंड सर्व्हिस’ ही ध्वनिसेवा सुरू केली. निर्मितिपश्चात अंकीय श्राव्यसुविधा (डिजिटल ऑडिओ पोस्ट-प्रॉडक्शन फॅसिलिटी) पुरवणे, हे तिचे उद्दिष्ट होते. मुंबईच्या बॉलिवूड व पाश्चात्त्य हॉलिवूडमध्ये तयार झालेल्या काही चित्रपटांना या यंत्रणेने ध्वनिसेवा पुरवल्या आहेत. त्यांच्या हावडा ब्रिज, आराधना आणि बरसात की एक रात या अभिजात चित्रपटांचे प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्सद्वारे सचेतपटामध्ये (ॲनिमेशन फिल्म) रूपांतर करण्यात आले.

सामंत यांना आराधनाअनुराग व अमानुष ह्या चित्रपटांसाठी ‘फिल्मफेअर’ चे सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे पुरस्कार मिळाले. तसेच त्यांच्या एकूण चित्रपटकारकीर्दीसाठी त्यांना ‘झी’ वाहिनीतर्फे ‘झी जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला (२००२). त्यांचे काही चित्रपट बर्लिन, ताश्कंद, मॉस्को, कैरो, बेरूत इ. ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांतून दाखवले गेले. भारतीय चित्रपट-निर्मात्यांच्या संघटनेचे अध्यक्ष (५ वर्षे), केंद्रीय चित्रपट-प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष (७ वर्षे) तसेच कोलकात्याच्या ‘सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ चे अध्यक्ष (२ वर्षे) इत्यादी पदे त्यांनी भूषविली.

सामंत यांचे मुंबई येथे हृदयविकाराने निधन झाले.