मार्कंडेय पुराण : हे पुराण मार्कंडेय ऋषींनी कथन केल्यामुळे ह्या पुराणाला मार्कंडेय पुराण हे नाव मिळाले. प्रदीर्घ तपाने चिरंजीवित्व मिळवलेले ऋषी म्हणजे मार्कंडेय ऋषी. महाभारताच्या संस्करणाच्या बाबतीत महत्त्वाच्या असलेल्या भार्गव ऋषींच्या वंशातील हे मार्कंडेय ऋषी होते. हे पुराण प्राचीन असून ह्याचा काळ साधारणपणे इसवी सनाचे तिसरे शतक असावा. गुप्तकालीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे हे पुराण गुप्तकाळात म्हणजे इ. स. च्या चौथ्या-पाचव्या शतकात गोदावरीच्या उगमप्रदेशात लिहिले गेले असावे. यात सर्ग (जगाची निर्मिती), प्रतिसर्ग (प्रलय), वंश (राजवंश), मन्वंतरे ( विशिष्ट कालखंड) व वंशानुचरीत ही पुराणाची पाचही लक्षणे दिसून येतात. या पुराणात १३७ अध्याय असून सुमारे ६,९०० श्लोक आहेत.
जैमिनी ऋषी मार्कंडेय ऋषींना प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांची उत्तरे द्रोणपुत्र पिंगाक्ष, विबोध, सुपुत्र व सुमुख देतात याने या पुराणाची सुरुवात होते. पाच पांडवांची पत्नी द्रौपदी एकटी कशी? तिच्या लहान मुलांना का मारले गेले? ह्या प्रश्नांची चर्चा यात केली आहे. पराक्रमी बलदेवाला तीर्थयात्रा करून ब्रह्महत्येच्या पापाचे निवारण का करावे लागले ह्याची कथा दिसते. हरिश्चंद्राचे आख्यान या पुराणात आले आहे. हरिश्चंद्राच्या निमित्ताने असाधारण असा त्यागाचा, वचनपूर्तीचा दुर्मिळ आदर्श उभा केला आहे. ब्रह्मवादिनी मदालसेची कथा येते. यानंतर वर्णाश्रम धर्म कथन, नित्य-नैमित्यिक श्राद्धकल्पाचे वर्णन केले आहे. दत्तात्रेयांच्या अवताराची कथा या पुराणात आली आहे. योगशास्त्राचे निरूपण देखील यात आले आहे. सृष्टी, प्रलय, भुवनकोश, मन्वंतरे, द्विपांचे भौगोलिक विवरण येते. वंश वर्णनात इक्ष्वाकु वंश, सोमवंश, यदुवंश यांचे वर्णन येते. हैहय चरित्र, अलर्क चरित्र, नऊ प्रकारच्या सृष्टिचे पुण्यमयी वर्णन, कल्पान्तकालाचा निर्देश, यक्ष-सृष्टि निरूपण, रुद्र आदि की सृष्टी, द्वीपचर्या इत्यादि वर्णने महत्त्वाची आहेत.
सुरथ, समाधी व सुमेधा यांच्या संवादातून मधुकैटभ, महिषासुर, शुम्भ, निशुम्भ यांच्या वधाची कथा येते. प्रकृतीस्वरूपिणी देवी हीच विश्वाची प्रेरक शक्ती आहे हा मूळ हेतू या पुराणाचा आहे. यात नंदा, रक्तदन्तिका, शताक्षी, शाकंभरी, दुर्गा, भीमा, भ्रामरी हे देवीचे सात अवतार मानले आहेत. चण्डाचा वध करून देवीला चण्डिका नाव कसे पडले याची कथाही यात येते. दुर्गासप्तशती या नावाने प्रसिद्ध असलेले देवीमहात्म्य या पुराणाच्या तेराव्या अध्यायात आलेले आहे. सर्वमंगला अशा देवीची निर्मिती सर्व देवांचे तेजस्वी असे अंश एकत्र होऊन झाली असेही वर्णन याच्या ७९ अध्यायात दिसते. अग्नी, सूर्य यांचीही स्तोत्रे या दिसून येतात. राजा अविक्षिताचे चरित्र, नल राजाचे चरित्र, रामचंद्राची कथा, श्रीकृष्णाचे बालचरित्र अशी इतर आख्यानेही यात आहेत. श्रीकृष्णाच्या बाललीला, त्यांच्या मथुरा, द्वारका येथील लीला, सगळया अवतारांची कथा यामध्ये येतात.
या पुराणात केवळ एकच वक्ता नाही. १ ते ४२ अध्यायांपर्यंत वक्ता जैमिनी व श्रोता पक्षी आहे. ४३ ते ९० अध्यायांपर्यंत वक्ता मार्कंडेय ऋषी व श्रोता क्रप्टुकि आहे व नंतरच्या अध्यायांमध्ये वक्ता सुमेधा व वक्ता सुरथ-समाधी आहेत. अठरा पुराणात सातव्या स्थानावर असलेल्या ह्या पुराणाच्या शेवटी मार्कंडेय ऋषींनी पुराण श्रवणाचे फळ सांगितलेले आहे. या पुराणाचे जो श्रवण करतो त्याची पृथ्वीवरील वंश परंपरा तशीच राहाते. त्या मनुष्याची पापापासून मुक्ती होते. परम योगाची प्राप्ती होते. त्यास हजार अश्वमेध व शंभर राजसूय यज्ञाचे फळ मिळते. पार्जिटरने याचे इंग्रजी भाषांतर केले असून प्रारंभीच्या काही अध्यायांचे जर्मन भाषांतरही झालेले आहे.
पहा : पुराणे व उपपुराणे
संदर्भ : शास्त्री, धर्मेंद्रनाथ,मार्कंडेय पुराण, शिक्षा साहित्य प्रकाशक, १९८२.
समीक्षक : सुनीला गोंधळेकर