आठवणींचे पक्षी : प्र. ई. सोनकांबळे यांचा आत्मकथनात्मक आठवणींचा लेखसंग्रह. दलित साहित्यातील एक महत्त्वाचे आत्मकथन म्हणून ते ओळखले जाते. जीवनातील खडतर जातवास्तवाचे अनुभव प्र. ई. सोनकांबळे यांनी या लेखसंग्रहातून मांडले आहेत. या आत्मकथनात दलित जीवनाच्या मूलगामी दुःखाचे चित्रण येते. प्र. ई. सोनकांबळे यांच्या बालपणाची आणि शिक्षण काळातील हाल-अपेष्टांचे दर्शन प्रामुख्याने या आत्मकथनामध्ये घडते.१९६४ साली मिलिंद महाविद्यालयाच्या वार्षिकांकात प्रथमतः या आत्मलेखनातील लेख प्रसिद्ध झाला.म.ना.वानखेडे यांच्या प्रोत्साहनामुळे हे लेखन घडले असल्याचे सोनकांबळे सांगतात.आरंभी यात १५ लेख होते. नंतरच्या आवृत्तीत ही संख्या २८ झालेली आहे.

प्रस्तुत आत्मकथनातील सर्व लेख सुटेसुटे असले तरी त्यात एक प्रकारची  सुसंगतता आहे. आई मेल्यानंतर पोरका झालेला ‘परलाद’ ते प्राध्यापक व्यवसायात पडलेले प्र. ई.सोनकांबळे असा विस्तृत जीवनपट या आत्मकथनामध्ये मध्ये आहे.बालपणापासून कष्ट ते बहिणीकडे आश्रित म्हणून राहत असताना पडेल ती कामे करण्याचा जीवनाभुव त्यात आहे.अत्यंत गरीब परिस्थितीमुळे चिंचोके, मृत जनावरांचे मांस त्यांना खावे लागले आहे. चतकोर भाकरीसाठी मेलेले कुत्रेही ओढून टाकावे लागले आहे. पोटाची भूक भागवण्यासाठी प्र. ई. सोनकांबळे यांना अनेक लहान-मोठी कामे करावी लागली आहेत. महारोगी म्हातारीच्या ताटलीत जेवण्याचा आणि संडासमागे जाऊन भाकरीचा तुकडा खाण्याचा मन विषण्ण करणारा प्रसंगही यात आहे.अस्पृश्य समाजात जन्माला आल्याने सोनकांबळे यांना वारंवार अपमान, अवहेलना सहन करावी लागली आहे.जातीयता आणि आर्थिक विषमतेवरचे खोलवरचे चित्रण या आत्मकथनात आहे.जातीयतेच्या -उपेक्षेच्या आणि अवहेलनेच्या असंख्य अडचणीतून जीवनसंघर्षाचे रूप या आत्मकथनातून प्रकटले आहे.

मराठवाड्यातील उदगीर भागातील बोलीचा वापर, हा या आत्मकथनाचा महत्त्वाचा विशेष आहे. बोली भाषेमुळे यातील आठवणींना जिवंतपणा प्राप्त झालेला आहे. सोनकांबळे यांच्या अनुभवविश्वाला साजेशी ही भाषा असून कोणताही संकोच न बाळगता मोठ्या धिटाईने व मोकळेपणाने त्यांनी आठवणींचे कथन केले आहे. प्रचंड अन्याय सोसूनही सोनकांबळे कोणाविषयी मनात अढी बाळगत नाहीत. उलट मदत करणाऱ्या सहानभूती दाखविणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख ते अतिशय नम्रपणे करतात.एकप्रकारचा अखिल मानवसृष्टीविषयीचा सहानुभाव,सयंत जीवनदृष्टी व प्रभावी गद्य हे या आत्मपर लेखनाचे विशेष होत.

बाबुराव बागूल यांनी या आत्मकथनाला ‘दलित जीवनाचे करूण नाट्य’ संबोधले आहे. शोषणवादी व्यवस्थेविरुद्ध चिडून आगपाखड करण्याऐवजी सोनकांबळे यांनी दुःख,वेदनांचे प्रभावी चित्रण केले आहे. त्यामुळे हे आत्मकथन वाचकांच्या मनाचा ठाव घेते.दुःखाचे विविध पदर,त्याकडे पाहण्याची दृष्टी आणि अभिव्यक्तीसाठी योजलेली अस्सल बोलीभाषा यामुळे हे आत्मकथन मराठी साहित्यात लक्षणीय ठरले आहे.या आत्मकथनाचे अनेक भारतीय भाषांत भाषांतरही झाले आहे.

संदर्भ :

• मुलाटे वासुदेव, दलितांची आत्मकथने : संकल्पना व स्वरूप, स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद, १९९९.