सी. रामचंद्र : (१२ जानेवारी १९१८— ५ जानेवारी १९८२). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक व पार्श्वगायक. मूळ नाव रामचंद्र नरहर चितळकर. ‘सी. रामचंद्र’ हे संक्षिप्त नाव त्यांनी सिनेदिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरून धारण केले. आपल्या निकटवर्तीयांत ते ‘अण्णा’ म्हणून प्रसिद्ध होते. आर्. एन्. चितळकर, श्यामू, राम चितळकर, सी. रामचंद्र व अण्णासाहेब अशा विविध नावांनी त्यांनी संगीतदिग्दर्शन व पार्श्वगायन केले. त्यांचा जन्म पुणतांब्याचा (जि. अहमदनगर ). पुणतांब्याजवळील चितळी हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीस होते. वडिलांची ठिकठिकाणी बदली होत असल्यामुळे त्यांचे बालपण डोंगरगड, नागपूर, विलासपूर, गोंदिया अशा निरनिराळ्या ठिकाणी गेले. शालेय शिक्षणात त्यांना फारसे स्वारस्य नव्हते; पण संगीताची खूप आवड होती. नागपूरच्या ‘श्रीराम संगीत विद्यालया’त त्यांनी संगीताचे पहिले धडे गिरविले आणि उत्तम गाणारा मुलगा असा लौकिक मिळविला. गांधर्व संगीत महाविद्यालयात त्यांनी पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या हाताखाली गायकीचे धडे घेतले. चित्रपटांतल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकून त्यांच्या स्वरलिप्या (नोटेशन्स) बनविणे हाही त्यांचा एक छंद होता.
चित्रपटात काम करण्याचीही सी. रामचंद्र यांना ओढ होती. नागानंद ह्या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले; परंतु तो चित्रपट यशस्वी झाला नाही. प्रसिद्ध चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक सोहराब मोदी ह्यांच्या ‘मिनर्व्हा मूव्हिटोन’ ह्या संस्थेच्या संगीत विभागात हार्मोनियमवादनाचे काम त्यांना मिळाले आणि संगीतदिग्दर्शनाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. तेथे हूगन आणि मीरसाहेब ह्या संगीतकारांशी त्यांचा संबंध आला. हूगन हे पाश्चात्त्य वाद्यांवर हिंदुस्थानी संगीत वाजवून दाखवीत. त्यांच्या संगतीने सी. रामचंद्रांनी मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेलांतून इंग्लिश वादकांचे वादन ऐकले. पश्चिमी संगीतातील उडती लय देशी गाण्यांना देता आली तर ती खूप लोकप्रिय होतील, ह्याचा अंदाज तेथे त्यांना आला. हूगन ह्यांनी तयार केलेल्या गाण्यांच्या चालींच्या स्वरलिप्या तयार करण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्या करताना स्वत:ला सुचलेले नवीन काही ते त्यांत घालत असत. हूगन ह्यांच्याकडून त्याबद्दल कधी आक्षेप आला नाही. मीरसाहेबांचे बनारसी पद्धतीच्या गायकीवर प्रभुत्व होते. चाली कशा बांधतात ह्याचे प्रात्यक्षिकच ‘मिनर्व्हा मूव्हिटोन’मध्ये सी. रामचंद्रांना मिळाले. संगीतकार अनिल विश्वास ह्यांनी हिंदी संगीतात पाश्चात्त्य संगीताचे स्वर बेमालूमपणे मिसळण्याचे तंत्र आत्मसात केले होते. त्यांच्या चालींचे संस्कारही सी. रामचंद्रांवर झाले.
हिंदी स्टंटपटांतून काम करणारे अभिनेते भगवान पालव ऊर्फ मा. भगवान ह्यांच्याशी झालेल्या मैत्रीमुळे त्यांना जयक्कोडी हा तमिळ चित्रपट संगीतदिग्दर्शनासाठी मिळाला. त्यांचे संगीत असलेला हा पहिला चित्रपट. त्यानंतर वनमोहिनी हा आणखी एक तमिळ चित्रपट त्यांना मिळाला. मा. भगवान यांच्या सुखी जीवन ह्या चित्रपटातील ‘सारे जहाँसे अच्छा’ ह्या गीतामुळे संगीतकारांच्या जगात त्यांच्या नावाचा बोलबाला झाला. ‘जयंत देसाई प्रॉडक्शन्स’ चे जबान, मनोरमा, ललकार, चंद्रगुप्त असे काही चित्रपटही त्यांनी केले. पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कवी प्रदीप ह्यांच्यामुळे शशीधर मुखर्जी ह्यांच्या ‘फिल्मिस्तान’ ह्या चित्रपटसंस्थेत सी. रामचंद्रांचा प्रवेश झाला. या चित्रपटसंस्थेच्या शहनाई ह्या चित्रपटाला त्यांनी दिलेले संगीत-विशेषतः त्यातील ‘आना मेरी जान संडे के संडे’ हे गाणे अत्यंत लोकप्रिय झाले. ह्या चित्रपटामुळे त्यांचे नाव भारतभर झाले. अनेक चित्रपट संगीतदिग्दर्शनासाठी त्यांच्याकडे आले. मा. भगवान ह्यांच्या अलबेला ह्या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले. त्यातील ‘भोली सूरत दिलके खोटे’, ‘शोला जो भडके’ , ‘शाम ढले खिडकी तले’, ‘मेरे पिया गये रंगून’ ही गाणी अतिशय गाजली. त्यांना रसिकांनी खूप प्रतिसाद दिला. विशेषत: ‘धीरे से आजा रे अखियनमे निंदिया’ हे अंगाई गीत हिंदी चित्रपटांतल्या गाजलेल्या अविस्मरणीय अंगाई गीतांपैकी एक मानले जाते. त्यानंतर फिल्मिस्तानच्या अनारकलीने यशाचा उच्चांक गाठला. या यशात सी. रामचंद्रांच्या संगीताचा वाटा खूप होता. ‘ये जिंदगी उसीकी है’ हे त्यातले लता मंगेशकर यांनी गायलेले गीत अवीट गोडीमुळे अजरामर ठरले. आझाद, इन्सानियत, तिरंदाज, यास्मिन, शहनाई, नवरंग, नास्तिक, झांझर, शिनशिनाकी बबला बू, दुनिया गोल है हे त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखालील काही उल्लेखनीय चित्रपट होत. त्यांपैकी झांझर व दुनिया गोल है यांची निर्मिती त्यांनी १९५५ मध्ये अभिनेते ओमप्रकाश यांच्याबरोबर ‘न्यू साई प्रॉडक्शन्स’ तर्फे केलेली होती. तिरंदाज व यास्मिन या चित्रपटांच्या संगीतात त्यांनी अरबी संगीताचा कौशल्यपूर्ण वापर केला होता. पाश्चात्त्य संगीताचा बाज, सुरावट व वाद्यवृंद हिंदी सिनेसंगीतात आणण्याचे व लोकप्रिय करण्याचे श्रेय मुख्यत्वे सी. रामचंद्र यांच्याकडे जाते. त्याच वेळी भारतीय संगीतातील गोडवा व सुरावटही त्यांनी आपल्या संगीतातून जपली.
सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली काही हिंदी चित्रपटगीते उत्कृष्ट व अविस्मरणीय ठरली. उदा. ‘जाग दर्दे इश्क जाग’ , ‘जिंदगी प्यार की दो चार घडी होती है’ (अनारकली ), ‘आधा है चंद्रमा रात आधी’ (नवरंग ), ‘देख तेरे संसार की हालत’ ( नास्तिक ), ‘ कैसे आऊँ जमुना के तीर’ (देवता ), ‘कितना हसीन है मौसम’ (आझाद ), ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ (समाधी ), ‘इना मिना डिका’ (आशा ), ‘कटते है दुख मे ये दिन’ (परछाई या चित्रपटातील लता मंगेशकरांनी गायिलेली ठुमरी) व ‘तुम क्या जानो, तुम्हारी याद मे’ (शिनशिनाकी बबला बू मधील लता मंगेशकरांची ठुमरी), ‘आँखो मे समा जाओ, इस दिलमें रहा करना’ (यास्मिन ), ‘जलनेवाले जला करे’ (खिडकी ) इत्यादी.
सी. रामचंद्र यांनी हिंदीबरोबरच काही मराठी, तमिळ, तेलुगू व भोजपुरी चित्रपटांनाही संगीत दिले. सुरुवातीच्या काळात आर्. एन्. चितळकर या नावाने त्यांनी काही मराठी चित्रपटांत भूमिका केल्या व गाणीही गायिली. १९६० च्या दशकात त्यांनी धनंजय व घरकुल या मराठी चित्रपटांना संगीत दिले व त्यांत प्रमुख भूमिकाही केल्या. घरकुल चित्रपटाची निर्मिती सी. रामचंद्रांनी केली होती. घरकुलमधील गाणी, विशेषत: ‘पप्पा सांगा कुणाचे’ व ‘मलमली तारुण्य माझे’ ही गाणी, लोकप्रिय झाली. जुन्या होतकरू कलाकारांना एकत्र आणून सी. रामचंद्रांनीच स्वरसाज चढवलेल्या सदाबहार गीतरचनांवर आधारित ‘भूलाये ना बने’ ह्या विलोभनीय कार्यक्रमाची निर्मिती त्यांनी केली.
भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू ह्यांच्या उपस्थितीत सी. रामचंद्र यांनी लता मंगेशकर ह्यांच्या आवाजात दिल्ली येथे २७ जानेवारी १९६३ रोजी सादर केलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ ह्या गीताला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा त्यांच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. कवी प्रदीपजींनी भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या ह्या भावोत्कट गीतात देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण ठेवण्याचे आवाहन सर्व भारतीयांना केलेले आहे. हृदयस्पर्शी व प्रेरणादायी असे हे गीत आजही पूर्वीइतकेच लोकप्रिय आणि आवाहक आहे. सी. रामचंद्रांनी माझ्या जीवनाची सरगम हे आपले आत्मचरित्र लिहिले आहे (१९७७).
मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.