बेनेगल, श्याम : (१४ डिसेंबर १९३४). एक ख्यातकीर्त भारतीय दिग्दर्शक आणि पटकथाकार. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन न मानता त्यातून प्रेक्षकांची अंर्तदृष्टी विकसित करणारा विचार दिला पाहिजे अशी बांधिलकी मानणाऱ्या दिग्दर्शकांत त्यांना मानाचे स्थान आहे.

श्याम बेनेगल यांचे पूर्ण नाव श्यामसुंदर श्रीधर बेनेगल असे आहे. त्यांचा जन्म हैद्राबाद मध्ये त्रिमुलागिरी येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर बेनेगल स्वतः एक छायाचित्रकार होते. लहानपणापासूनच श्याम बेनेगल यांना चित्रपट पाहाण्याची खूप आवड होती. त्यांच्या या छंदाला कुटुंबियांनीही प्रोत्साहन दिले. त्याकाळी प्रभात, मेहबूब आणि न्यू थिएटर्स सारख्या स्टुडिओंनी निर्माण केलेले चित्रपट त्यांच्या कुटुंबातील सारे सदस्य आवडीने पहात असत. त्यामुळे बालवयातच त्यांनी चित्रपट क्षेत्राचा ध्यास घेतला. उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी मिळवल्यानंतर ते मुंबईमध्ये लिंटास या मोठ्या जाहिरात कंपनीमध्ये कॉपिरायटर म्हणून काम करू लागले. त्यावेळी अनेक जाहिराती आणि लघुपट बनवताना चित्रपटाच्या तांत्रिक अंगांचा त्यांना भरपूर अनुभव मिळाला. १९६२ मध्ये  त्यांनी गुजरात सरकारसाठी महिसागर धरणाची माहिती देणारा घेर बेठा गंगा हा गुजराती भाषेतील पहिला लघुपट बनवला. त्यानंतर त्यांनी पुण्यातील ‘फिल्म्स अँड टेलीव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ येथे काही काळ शिकवले. त्यांनी या मान्यवर संस्थेचे अध्यक्षपदही भूषविले आहे.

१९७० ते १९७२ दरम्यान श्याम बेनेगल यांना ‘होमी भाभा अधिछात्रवृत्ती’ मिळाली आणि त्या अंतर्गत त्यांनी न्यूयॉर्क आणि बोस्टन येथील लहान मुलांशी संबंधित दूरदर्शन क्षेत्रातही काम केले. भारतात परतल्यानंतर त्यांनी १९७४ मध्ये अंकुर हा त्यांचा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. बेनेगल यांच्यावर तरुणवयात आंध्रप्रदेशात त्याकाळी सुरू असलेल्या तेलंगणा राज्यनिर्मिती चळवळीचा मोठा प्रभाव पडला होता. यातूनच एक सर्वसमावेशक सामाजिक विचारांची बैठक त्यांच्या मनात तयार झाली. अंकुर चित्रपटात त्यांनी सरळ साध्या कथेतून ग्रामीण भारतातील जातीयता, वर्गवर्चस्व आणि स्त्री-पुरुष भेदाभेद यांमुळे निर्माण झालेली मानवी मनाची गुंतागुंत सादर करीत प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. अंकुरचे बरेच कौतुक झाले आणि चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने  सन्मानितही करण्यात आले. अंकुरनंतर आलेल्या निशांत (१९७५) आणि मंथन (१९७६) या चित्रपटांतूनही त्यांनी ग्रामीण सामाजिक जीवनाचा पट उलगडत वास्तववादी चित्रपट निर्माण करण्याचा आपला हेतू ठोसपणे मांडला. याचबरोबर बेनेगल यांनी आजपर्यंत विविध विषयांवरील चरणदास चोर (१९७५), भूमिका (१९७७), कोंदुरा/अनुग्रहम (१९७८), जुनून (१९७९), कलयुग (१९८१), आरोहण (१९८३), मंडी (१९८३), त्रिकाल (१९८५), सुसमन (१९८७), अंतर्नाद (१९९१), सूरज का सातवा घोडा (१९९२), मम्मो (१९९४), सरदारी बेगम (१९९६), द मेकिंग ऑफ महात्मा (१९९६), समर (१९९८), हरीभरी (२०००), जुबेदा (२००१), नेताजी सुभाषचंद्र बोस (२००५), वेलकम टू सज्जनपूर (२००८), वेल डन अब्बा (२००९) इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. भारताच्या राष्ट्रीय फिल्म विकास निगम (एनएफडीसी) और बांग्लादेशच्या फिल्म विकास निगम (बीएफडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित मुजीब : द मेकिंग ऑफ अ नेशन  या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे (२०२३). हा चित्रपट बांग्लादेशाचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांच्यावर आणि बांग्लादेशाची निर्मिती यांवर आधारित आहे.

सत्यजित राय आणि मृणाल सेन या महान दिग्दर्शकांनी निर्माण केलेल्या समांतर चित्रपट चळवळीतून प्रेरणा घेत श्याम बेनेगल यांनी कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपट शैलीला एकत्र आणणारा  एक वेगळा मध्यम मार्ग चोखाळला आणि थबकलेल्या समांतर चित्रपट चळवळीला नवी दिशा दाखवली. समाजव्यवस्थेच्या परिघावर फेकल्या गेलेल्या व्यक्ती आणि समुदायांच्या कथा त्यांनी वेळोवेळी प्रामुख्याने मांडल्या. अशाप्रकारच्या समाजघटकांबद्दल भारतीय प्रेक्षकांच्या मनात सहानुभूती जागवत मानवतावादी दृष्टिकोन घडवण्याचा प्रयत्न केला. वेगळ्या प्रकारचे चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न करताना त्यांनी कथेच्या निवेदन शैलीतही वेगळे प्रयोग करून पहिले. उदा., सूरज का सातवा घोडा हा चित्रपट. चित्रपट निर्माण करण्यासाठी नेहमीच मोठ्या प्रमाणावर निधी उभा करावा लागतो. बेनेगल यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी चित्रपट निर्मितीसाठी लागणारा निधी गोळा करताना नेहमी चाकोरीबाहेरचा विचार केला. सध्या चित्रपट निर्माण करण्यासाठी जी ‘क्राऊड फंडिंग’ ही कल्पना प्रचलित आहे, ती त्यांनी १९७६ सालीच मंथन या चित्रपटाच्या निर्मितीसाठी वापरली होती. त्यावेळी गुजरात मधील ५ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्येकी २ रुपये वर्गणी काढून त्यांचीच गोष्ट सांगणारा हा चित्रपट निर्माण केला होता.

बेनेगल यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकावर आधारित भारत एक खोज नावाची ५३ भागांची मालिका दूरदर्शनसाठी दिग्दर्शित केली. उच्च निर्मितीमूल्य असलेली ही मालिका बरीच लोकप्रिय झाली. भारतीय रेल्वेवर आधारित यात्रा आणि सत्यम शंकरमंची यांच्या अमरावती कथालु या तेलुगू कथासंग्रहावर आधारित अमरावती की कथायें तसेच कथासागर आणि संविधान या मालिका त्यांनी दूरदर्शनसाठी दिग्दर्शित केल्या आहेत. तसेच जवाहरलाल नेहरू आणि सत्यजित राय यांच्या जीवनावरील उत्तम लघुपटांची निर्मिती केली आहे.

श्याम बेनेगल यांच्या पत्नीचे नाव नीरा आणि मुलीचे नाव पिया आहे. नीरा बेनेगल या बेनेगल यांच्या काही चित्रपटांच्या निर्मात्या आहेत. तसेच त्यांनी बेनेगल यांच्या काही चित्रपटांची वेशभूषा देखील केली आहे. पिया बेनेगल या व्यावसायिक वेशभूषाकार आहेत.

आजवर श्याम बेनेगल यांना चित्रपट क्षेत्राशी संबंधित अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २००५ साली चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीत वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या श्याम बेनेगल यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ (१९७६) आणि ‘पद्मभूषण’ (१९९१) पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. ‘मुंबई अकॅडमी ऑफ मुविंग इमेजेस’ या चित्रपट महोत्सवाचे अध्यक्षपद तसेच ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ  इंडिया’ या चित्रपट संस्कृतीच्या प्रसार करणाऱ्या शिखर संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली होती. त्यांना २०१८ सालच्या ‘मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये भारतातील डॉक्युमेंटरी चळवळीतील अमूल्य योगदानासाठी त्यांना व्ही. शांताराम लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कारही देण्यात आला आहे.आजही ते वेगवेगळ्या स्तरांवर चित्रपटसृष्टीशी निगडित आहेत.

समीक्षक : संतोष पाठारे