सैगल, कुंदनलाल : (४ / ११ एप्रिल १९०४–१८ जानेवारी १९४७). अखिल भारतीय कीर्तीचे थोर गायक आणि चित्रपट अभिनेते. त्यांचा जन्म जम्मू येथे एका मध्यमवर्गीय सुशिक्षित पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील अमरचंद हे जम्मू-काश्मीर संस्थानात मामलेदार होते. त्यांची आई केसरबाई धार्मिक वृत्तीची व संगीतप्रेमी होती. या दांपत्याच्या चार मुलांपैकी कुंदनलाल हे तिसरे अपत्य होय. त्यांच्या बालपणी त्यांची आई त्यांना धार्मिक समारंभांना घेऊन जात असे. तिथे भजन, कीर्तन यांसारख्या पारंपरिक शैलीत गायल्या जाणाऱ्या भक्तिगीतांचे संस्कार बालवयातच कुंदनलाल यांच्यावर झाले. तेथील रामलीलेच्या कार्यक्रमात कुंदनलालना अधूनमधून सीतेची भूमिका करण्याची संधी मिळत असे. अमरचंदांच्या सेवानिवृत्तीनंतर हे कुटुंब पंजाबमधील जलंदर येथे स्थायिक झाले. कुंदनलाल यांचे शालेय शिक्षण अर्धवट राहिले.

गायनाचे निसर्गदत्त वरदान लाभलेल्या सैगल यांना सलमान युसूफ नावाच्या पीराकडून संगीताचे प्राथमिक धडे मिळाले. याव्यतिरिक्त संगीताचे पद्धतशीर शास्त्रोक्त शिक्षण त्यांना घेता आले नाही. गझल, ठुमरी, पंजाबी लोकसंगीत यांच्या संस्कारांतून त्यांची गायकी घडत गेली. अर्थार्जनासाठी त्यांनी काही काळ रेल्वेत टाइमकीपरची नोकरी केली. पुढे रेमिंग्टन टाइपरायटर कंपनीत टाइपरायटर-विक्रेत्याचे कामही त्यांनी केले. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारतात अनेक ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळाली.

१९३१ साली कोलकात्यात असताना सैगल यांनी अनेक छोट्या-मोठ्या मैफलींमध्ये गाणी गायली. त्यांच्या गायनाने प्रभावित होऊन बी. एन्. सरकार यांनी सैगल यांना ‘न्यू थिएटर्स’साठी करारबद्ध केले. १९३२ मध्ये सैगल यांची भूमिका असलेले मोहब्बत के आँसू (उर्दू चित्रपट), सुबह का ताराजिंदा लाश हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले; पण ते फारसे चालले नाहीत. मात्र १९३३ मध्ये प्रदर्शित झालेल्या पूरन भगत या चित्रपटामुळे गायक-अभिनेते अशी त्यांची ख्याती सर्वदूर पसरली. या चित्रपटातील रायचंद (आर्. सी.) बोराल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी गायलेली भजने लोकप्रिय ठरली. चंडीदास या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी होती. दिग्दर्शक पी. सी. बरुआंच्या देवदास (१९३५) या चित्रपटातील सैगल यांची नायकाची भूमिका अत्यंत गाजली व त्यांच्या गाण्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. या चित्रपटातील ‘बालम आवो बसो मोरे मन में’ व ‘दुख के अब दिन बीतत नहीं’ यांसारखी त्यांची गाणी प्रसिद्ध झाली. सैगल यांनी बंगाली भाषेवर प्रभुत्व मिळवले व ‘न्यू थिएटर्स’निर्मित सात बंगाली चित्रपटांत भूमिका केल्या, तसेच तीस बंगाली गीतेही गायली. ‘न्यू थिएटर्स’ची निर्मिती असलेले सैगल यांचे यशस्वी चित्रपट असे: दीदी (१९३७; हिंदी आवृत्ती – प्रेसिडेंट); देशेर माटी (१९३८; हिंदी आवृत्ती – धरती माता); साथी (१९३८; हिंदी आवृत्ती –स्ट्रीट सिंगर); जीवनमृत्यू (१९३८; हिंदी आवृत्ती –दुष्मन) इत्यादी. त्याचबरोबर ‘एक बंगला बने न्यारा’ (प्रेसिडेंट), ‘करू क्या आस निरास भई’ (दुष्मन), ‘सो जा राजकुमारी सो जा’ (जिंदगी, १९४०), ‘बाबूल मोरा’ (स्ट्रीट सिंगर) इ. लोकप्रिय गाण्यांनी त्यांनी रसिकांची मने जिंकली. त्यांनी भारतीय चित्रपटसंगीताच्या लोकप्रियतेचा पाया घातला. १९४० पर्यंत सैगल ‘न्यू थिएटर्स’मध्ये होते. या काळात बोराल, पंकज मलिक व तिमिर बरन या ज्येष्ठ संगीत दिग्दर्शकांची अनेक गाणी सैगल यांनी गायली. सैगल १९४१ च्या डिसेंबरमध्ये मुंबईत आले व ‘रणजित मुव्हिटोन’ या चित्रपटनिर्मिती संस्थेत दाखल झाले. त्यांची गाणी व अभिनय असलेले या संस्थेचे अनेक चित्रपट यशस्वी ठरले. त्यांपैकी भक्त सूरदास (१९४२) व तानसेन (१९४३) हे चित्रपट खूप गाजले. तानसेनमधील ‘दिया जलाओ’ हे शुद्ध कल्याण रागात त्यांनी गायलेले गीत अविस्मरणीय ठरले. ‘न्यू थिएटर्स’च्या मेरी बहना (१९४४) या चित्रपटातील ‘दो नैना मतवारे’ व ‘ऐ कातिब ऐ तकदीर मुझे इतना बता दे’ ही त्यांची गाणीही लोकप्रिय झाली. सैगल यांचा शाहजहाँ हा चित्रपट १९४६ मध्ये प्रदर्शित झाला. त्यातील ‘गम दिए मुत्त किल’, ‘जब दिल ही टूट गया’ यांसारखी आत दर्दभरी गीते रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी होती. परवाना (१९४७) हा त्यांचा अखेरचा चित्रपट त्यांच्या मरणोत्तर प्रदर्शित झाला.

सैगल यांच्या गायकीची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या गायनातील उत्स्फूर्तता व सहजता, आर्त दर्दभरा आवाज आणि प्रत्येक गीत भावपूर्णतेने गाण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली. त्यामुळे त्यांची गाणी रसिकांच्या हृदयाला भीडत. सैगल यांनी विविध गायनप्रकार कौशल्याने हाताळले. गझला, भजने, ठुमरी, अंगाई गीत, बालगीत अशी अनेक प्रकारची गाणी त्यांनी सहजतेने व सफाईने गायली. गझल व भजन हे त्यांच्या विशेष आवडीचे प्रकार, ‘चाह बरबाद करेगी’ (शाहजहाँ), ‘ऐ कातिब-ऐ तकदीर’  (मेरी बहना) या त्यांच्या दर्जेदार गझला, तसेच ‘राधेरानी देय डालो ना’ (पूरन भगत), ‘जीवन का सुख आज प्रभु मोहे’ (धूप छाँव) व ‘मैंया मोरी मैं नही माखन खायो’ (भक्त सूरदास) ही त्यांनी गायलेली भजने अविस्मरणीय ठरली. त्यांनी गायलेले ‘सो जा राजकुमारी’ हे अंगाईगीत तसेच ‘बाबूल मोरा’ ही भैरवीतल्या करुण स्वरांनी बांधलेली रचना यांचाही समावेश त्यांच्या उत्कृष्ट गीतांत केला जातो. मुकेश, महंमद रफी, किशोरकुमार या गायकांवर सुरुवातीच्या काळात सैगल यांच्या गायनशैलीचा प्रभाव होता.

१९३५ मध्ये सैगल यांचा विवाह आशाराणी यांच्याशी झाला. त्यांना मनमोहन, बीना आणि रीना ही तीन मुले.

सैगल यांनी आपल्या पंधरा वर्षांच्या कारकीर्दीत एकूण ३६ चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांपैकी २८ हिंदी वा उर्दू, ७ बंगाली व १ तमिळ चित्रपट होता. तसेच त्यांनी एकूण १८५ गाणी गायिली. त्यांतील १४२ चित्रपटगीते व ४३ अन्य प्रकारची (भजने, गझला, होरी इ.) गीते होती.

सैगल यांचे मद्यपानाच्या अतिरेकामुळे जलंदर येथे वयाच्या ४३ व्या वर्षी निधन झाले. बोलपटांच्या प्रारंभकाळात स्वत:चे अव्वल स्थान अल्पावधीत सिद्ध करणारा व आपल्या गाण्यांचा प्रभाव प्रदीर्घकाळ टिकवून ठेवणारा महान गायकनट म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत सैगल यांचे स्थान कायम टिकून राहील. त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टारही मानले जाते. बी. एन्. सरकार यांनी सैगल यांच्या जीवनावर आधारित अमर सैगल हा अनुबोधपट १९५५ मध्ये प्रदर्शित केला. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिट काढले आहे (१९९५).

संदर्भ :

  • Menon, Ragnava R, K. L. Saigal : The Pilgrim of the Swara, New Delhi, 1989.
  • दत्त, शरद, कुंदन : सहगल का जीवन और संगीत, २००८.